भोग आणि ईश्वर ७८
गेल्या भागापर्यंत आपण हे पाहिलं की मन स्वस्थ बसू शकत नाही. त्याला काही ना काही खाद्य हे लागतं. हे जर असं आहे तर मग मनाला नित्य सकारात्मक, उच्च विचारांचं आणि सत्शीलपणे राहण्याचं विचाररूप खाद्य आणि चिंतनरुप नैवेद्य का देऊ नये. नैवेद्य शब्दाने जरा आश्चर्य वाटलं असेल.
पण खर आहे. मन ही अशी गोष्ट आहे की तीच नराचा नारायण आणि नराचा रावण करू शकते. म्हणजेच नीट मार्ग
धरून जेंव्हा तेच मन देह आणि आत्मा यांचा संयोग घडवून आणतं, त्यावेळी त्या देहातील आत्मा हा श्रीकृष्णाचा सखा अर्जुन, श्रीरामाचा सखा हनुमंत, विभीषण, सुग्रीव होतो
आणि ज्यावेळी तेच मन विकारी आणि वासनेत मग्न होऊन अंतरात्म्याला विसरतं आणि देहाच्या साथीने काम क्रोध अहं आणि वृथा दुराभिमान यांच्या अग्नीत रममाण होतं, त्यावेळी तेच मन रावण, कंस, जरासंध कर्ण आणि दुर्योधन होतं.
आपण या दोन्ही आत्यंतिक पातळीवर जाऊ शकणार वा जाणार नसलो तरीही आपण जन्मजन्मांतरीच्या कर्मबंधनात स्वतःलाच जखडून पुन्हा पुढील जन्मी याच विचारात जन्म घालवू की, हा भोग माझ्या नशिबी का. म्हणूनच या सर्वातून वेळीच बाहेर पडून, देहभोग भोगून, वर्तमान व भविष्यातील कर्मव्यवस्था सुधारून या व पुढील जन्मांच्या प्रारब्ध व संचितात सुधारणा निश्चित करू शकतो. म्हणून त्या सर्वांची पहिली पायरी, मनाला एक कायमस्वरूपी, सकारात्मक, नित्य छंद, जडवून देण्याचं, कर्म करत राहू शकतो.
जर असा छंद जडवून मनाला वाममार्गावरून सन्मार्गाला लावायचंच आहे, तर मग त्या छंदातून मन आणि आत्मा दोन्हींची उन्नती साधणारा मार्ग का शोधू नये, जो शाश्वत, परीक्षित, अत्यंत कमी श्रमात अनंत फलदायी असेल. आता असा कायमस्वरूपी, सकारात्मक आणि पुन्हा पुण्य वृद्धिंगत करणारा छंद कोणता, जो फार कोणताही त्रास सहन न करता वा देहाला फार कष्ट न देता, उचित परिणाम साधत असेल आणि मनाला भटकू देणार नसेल तर असा छंद म्हणजे नामस्मरण.
कलियुगातील सद्य कालखंडात देवाचं स्मरण हा एकमेव पुण्य साधण्याचा मार्ग परिणामकारक आणि फलदायी असा सांगण्यात आला आहे. याच मार्गाने जाऊन सामान्य आणि असामान्य अश्या, अनेक मानवदेहधारी आत्म्यांनी आपलं जीवनईप्सित साध्य करून मोक्षाप्रति केली आहे. कदाचित त्यांचा आपल्याला ज्ञात असलेला हा जन्म अनेक जन्मांच्या पुण्याईचं फल असू शकेल.
पण आपणही त्या मार्गावर चालायला सुरुवात करूया, जेणेकरून कुठेतरी या जन्मात संचित संपून पुण्यसंचय सुरू होईल. कारण भगवंताचं नाम हे इतकं पुण्यकारक आहे की, अनेक जन्मांच्या पापांचे मेरूपर्वत भस्म करण्याचं सामर्थ्य नामात आहे. नाम हे भगवंताला भक्ताशी नित्य बद्ध करून ठेवतं आणि जेंव्हा भगवंत भक्तासमीप असतो त्यावेळी तिथे फिरकण्याची मायेची हिंमत होत नाही.
म्हणजेच नाम भक्ताला मायेपासून मुक्ती देऊन मायेच्या पाशातून सोडवून भगवंताच्या हृदयापर्यंत पोचवते.
नाममहती ही अलौकिक आहे. त्यावर अजून सखोल विचार करूया पुढच्या भागात.
आता नित्य नामचिंतन करा, भगवद्विचार येतील म्हणून नामचं घेऊन पुढे जा, अनेक प्रश्नांना मार्ग सापडतील.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment