भोग आणि ईश्वर ८७
कालच्या मुदतठेव आणि कर्ज या तर्कानंतर काही प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे. मुळात ही गोष्ट आपल्याला आता जाणवते. ही जाणीव महत्वाची आहे. कारण ही जाणीव आपल्याला थोडी गोंधळात टाकते. ती जाणीव आधी नव्हती ते खूप छान होतं. अज्ञानात सुख होतं. आता जाणीव झाल्यावर गोंधळ वाढला. कसा तो बघा.
एक म्हणजे मी ज्यावेळी सुख उपभोगत असतो, त्यावेळी आता हा विचार येईल की ही मुदतठेव मोडून घेतलेला आनंद आहे आणि दुःख भोगत असताना आपण ही कर्जाची परतफेड करत आहोत अशी भावना येणं म्हणजे मूळ सुखात आनंदाची आणि दुःखात वेदनेची भावना आली तरी विचित्र मनःस्थिती होऊ शकते. अजून एक प्रश्न निर्माण होतो की, माणूस हा भावनाप्रधान प्राणी आहे आणि विधात्यानेच विचार भाव भावना हे देऊन ते व्यक्त करण्याची बुद्धी व शक्ती दिली आहे. मग नक्की काय योग्य आणि काय अयोग्य.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, या सर्व जाणिवा भगवंताने, आत्ममार्गी होऊन, स्व जाणून, त्या स्वचा अर्थात आत्म्याचा उद्धार करण्यासाठी दिलेलं आहे. त्या विचारांचा, विचारांच्या ताकदीचा, बुद्धीचा, वापर आपण स्व आणि ईश्वर हे जाणून घेण्यासाठी दिलेली शक्ती किंवा वरदान आहे. पण मायेच्या प्रभावाने माणूस मूळ उद्देशापासून भरकटत गेला, कर्म गतीच्या फेऱ्यात अडकून बद्ध झाला आणि मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला.
म्हणजेच जसं दानवांनी मिळालेल्या वरदानाचा दुरुपयोग, एकप्रकारे, मनाप्रमाणे वागून, पण मूळ उद्देश विसरून संसारात पूर्ण रममाण होऊन, ध्येयापासून मैलोगणती लांब जाऊन केला, त्याप्रमाणे आपण करत गेलो आहोत. परंतु दानवांप्रमाणे आपण विध्वंसक मार्गावर नसल्या मुळे, परम दयाळू परम ईश्वर हा प्रत्येक काळात कोणत्याना कोणत्या मार्गाने संत महंत, ऋषीमुनी, वेदपुराणं, सद्गुरु याद्वारे नित्य आपल्याला आपल्या मुख्य ध्येयाची आठवण आणि त्या ध्येयाप्रत जाण्याच्या सहजसाध्य सहजसुलभ मार्गाची आठवण करून देण्यासाठी उदाहरण घालून देतो.
म्हणूनच आता आपल्याला झालेल्या मुदतठेव आणि कर्ज जाणिवेचा उपयोग आपण, घडून गेलेल्या कर्माचं जे फल आता उपभोगत अथवा भोगत आहोत, त्याच्या विचारासाठी न करता, त्या जाणिवेला, येथून पुढे घडणाऱ्या कर्मात, जागृत ठेवू. म्हणजेच इथून पुढील प्रत्येक कर्मात ही जाणीव जागृत ठेवू की,आपण ठेव वाढवतो की कर्ज. एक उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल.
मागे एका लेखात आपण क्रिया व प्रतिक्रिया यांचा कर्म बद्धतेशी आणि नवीन कर्मसाखळी निर्माण करण्याशी असलेल्या संबंधाबद्दल बोलताना बघितलं की, आपण एखाद्या घटनेवर, प्रसंगावर, व्यक्तीच्या रागावर वा एखाद्याने आपल्याला रागाच्या भरात प्रोत्साहित केल्या नन्तर आपणही दिलेल्या त्याचप्रकारच्या प्रतिक्रिये मुळे पुन्हा बद्ध होतो हे पाहिलं. पण, या कर्ज ठेव तर्कामुळे आज तो संबंध शंभर टक्के लक्षात आला असेल.
आता ही झालेली जाणीव नित्य जागृत ठेवून आपण प्रत्येक क्षण याचंच चिंतन करूया की, मी माझ्या प्रतिक्रियेने व कर्माने ठेव वाढवतोय की कमी करतोय आणि कर्ज कमी करतोय की वाढवतोय. याचं भान ठेवून जीवन जगत गेल्यास, अनावधानाने वा जाणतेपणाने घडणाऱ्या चुका बऱ्याच प्रमाणात टाळता येतील आणि बुद्धी, मन आणि आत्मा संयत अश्या शांततेचा अनुभव, नित्य करेल.
उद्या आपण जाणतेपणी वा अजाणतेपणी, याजन्मी वा गतजन्मांत घडलेल्या, स्मरणात असलेल्या वा विस्मरणातील प्रमाद किंवा चुका यांच्याबद्दल चर्चा करूया.
नाम नित्य घेत रहा, कारण नाम, सर्व काही सुलभ करेल. भेटूया उद्याच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment