भोग आणि ईश्वर ८३
कालच्या भगवंताच्या उत्तराच्या विचारात, मन शांत केल्यावर, त्याच शांततेत काही काळ तसच बसून, त्या विचारांचं चिंतन व मंथन करताना काही गोष्टी जाणवल्या. खरच भगवंताने बुद्धी दिली देहात अर्थात स्थूलरूपात, आत्मा सुक्ष्मरूपात आणि मन दिलं या दोन्ही स्थूल आणि सूक्ष्म यांना जोडण्यासाठी. विचार करा जीवनाचा प्रवास कर्मफल भोगत असताना भोगाकडून भोगमुक्तीकडे वाटचाल आहे.
भोग हे कर्मफलाचं साक्षात प्राप्त रूप अर्थात स्थूल कर्माचं स्थूल फलस्वरूपात प्रकटीकरण आहे. पण मायेच्या प्रभावात केलेल्या सर्व कर्माच्या परिणामात जे प्राप्त होईल ते अनेक रुपात समोर येतं. तो स्थूल परिणाम अनेक प्रकाराने आपल्या समोर येतो आणि आपण त्या परिणामांच्या प्रभावाने, अजून वाहवत जाऊन, या सागरात पूर्ण अडकून जातो. जन्म जन्मांतरीच्या या स्थूल देहरुप भोग चक्रातून जाताना, कधीही हा विचार येत नाही की मी इथे का?.
आपल्या मनात नेहमी विचार येतो मी इथे कसा?. जर का हा विचार आला की कळेल हा संघर्ष सर्व स्थूलरूप देहातून सुरू होतो आणि युगेयुगे जन्मजन्म स्थुलातच सुरू राहतो. पण भगवंत तर निर्गुण आहे म्हणजे सुक्ष्मरुप आहे. म्हणजेच आपला प्रवास स्थूलरूप देहाकडून सुक्ष्मरुप भगवंताकडे आहे. म्हणजेच स्थुलातून सुक्ष्माकडे नेणारं साधन आपल्याला पाहिजे, जे हा उद्देश साध्य करू शकेल.
ते सुक्ष्मरुप साधन अर्थात सर्वात सूक्ष्म, तरीही स्थूलाला सुक्ष्माकडे नेण्याची शक्ती त्यात आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. इतकं सूक्ष्म की निर्गुण निराकार परमेश्वराचं प्रतीक आणि म्हटलं तर स्थूलरूप देहातील आत्म्याच्या निकट जाणारं, त्या आत्म्याला अनंतरूप परमात्म्याला भेटवू शकणारं. यासाठी परमेश्वराने मन नावाचं एक सुक्ष्मरुप इंद्रिय प्रदान केलं, ज्याच्या सहाय्याने नामाचाच सुक्ष्मरुप आधार घेत, ते मन, बुद्धी आणि आत्मा यांचा सांधा बनून देहाचा उद्धार करू शकतं.
म्हणूनच आपण एक वाक्य नेहमी म्हणतो की, मनात आणलं तर माणूस काहीही करू शकतो. त्याचं महत्वाचं कारण की मनच सर्व गोष्टीचं कारक आहे, ऊर्जा आहे. मनच बुद्धीला कार्यप्रवृत्त करतं आणि शरीराला कर्मात बद्ध करतं. म्हणूनच परम ईश्वर भगवंताने मनाची निर्मितच केली नाही, तर गीतेत साक्षीदार राहून सांगितलं की इंद्रियांमध्ये मी मन आहे. म्हणजे मन हे अमर्याद शक्तीचं साक्षात रूप आहे. जसं वाफेच्या शक्तीने इंजिन चालतं, त्याचप्रमाणे मनाच्या शक्तीने देह बुद्धी कार्यसिद्ध होतात.
म्हणजेच स्थूलाकडून सुक्ष्माकडे जाण्याचा मन हा एकमेव मार्ग आहे आणि त्या मनाला बुद्धी व आत्मा यांची साथ घेणं गरजेचं आहे, कारण मुक्तीचा मानवी देह हा एकमेव मार्ग आहे. याच पद्धतीने हा प्रवास, ही यात्रा योग्य दिशेने सुरू राहू शकते.
चिंतन करा, उद्याच्या भागात पुढे विचार करू.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment