भोग आणि ईश्वर ७१
काल विस्ताराने सर्व विश्लेषण केल्यानंतरही प्रश्नाचा वा शंकेचा एक भाग शिल्लक राहतो. आज त्यावर विचार करूया. सर्व देव हे तत्वतः श्रीमहाविष्णू यांच्याकडूनच अधिकार प्राप्त करून, त्यांच्याच माया योगात कार्य करून सृष्टीच्या चलनात आपला सहभाग देतात. त्या अधिकारान्वये प्राप्त सिद्धी अथवा शक्तीचा यथासांग उपयोग करून भक्तांचा प्रतिपाळ आपल्या शक्तीने व क्षमतेने करतात.
त्यांना त्या त्या अधिकारातील अमर्याद शक्ती प्राप्त असते. ज्यायोगे ते त्या त्या शक्तीचे दाता, धाता अर्थात त्या अर्थाने विधाता संबोधले जाणं क्रमप्राप्त आहे. पण हे शक्तीचं हस्तांतरण हे कायमस्वरूपी असल्यामुळे त्यांना त्या कार्याची इष्टदेवता हा मान व सन्मान उचितपणे दिला गेला व जातो. याचकारणाने श्रीगणेश ही बुद्धीची, देवता गणली जाते.
पण असा अधिकार हा फक्त त्या शक्तीपूरता मर्यादित नसल्यामुळे इतर अनेक सिद्धी त्या इष्टदेवतेला ज्ञात असतात. किंबहुना बाह्यांगाने ते स्वरूप मूळ श्रीविष्णु रूपापासून भिन्न असलं वा प्रकट झालं असलं तरी अंतर्यामी ते श्रीविष्णु स्वरूपाशी एकरूप असतंच. एक उदाहरण घेऊन याचा खोलात विचार करूया. एखाद्या कार्यालयात अनेक संगणक एका मुख्य संगणकाशी अर्थात सर्वरशी स्थानिय जोड प्रणाली अर्थात लॅनने जोडलेले असतात.
जितके कर्मचारी तितके उपसंगणक त्या मुख्य संगणक प्रणालीशी जोडलेले असतात. बहुतेक कार्यालयात उप संगणकात कोणतीही माहिती साठवण्याची व्यवस्था अर्थात हार्डडिस्क नसते. ती मुख्य संगणकात असते, तरीही सर्व उपसंगणक आपलं कार्य व्यवस्थित पार पाडतात. परंतु त्या सर्व कामकाजाची नोंद मुख्य संगणकात साठवली जाते आणि वेळोवेळी ती त्या त्या उपसंगणकाना पुरवली जाते, त्यातील बदल परत परत, प्रत्येक सेकंदाला वा त्याच्या सुक्ष्मतील सूक्ष्म क्षणाला, अपडेट केले जातात.
इथपर्यंत सर्व सांगितल्यानंतर, परमोच्च ईश्वर, त्याच्याकडून अधिकारप्राप्त शक्तीस्वरूप इष्टदेवता, त्यांचे अधिकार, त्या अधिकारांच्या मर्यादा व अमर्यादीत्व, त्यावरील बंधन आणि सरतेशेवटी मुख्य ईश्वराचं महत्व या गोष्टी ध्यानात आल्या असतील. हेदेखील लक्षात आलं असेल की, वास्तविक त्यांना प्रदान शक्ती या परम ईश्वराचंच मर्यादीत स्वरूप आहे आणि जरी आपण एखाद्या देवतेला विशिष्ट कार्यासाठी वा सिद्धीसाठी भजलं व पूजलं तरीही त्यांना त्या सिद्धी बाहेरील गोष्टी करता येतात वा देता येतात,
कारण सरतेशेवटी ते एकाच विराट स्वरूपाचं मर्यादित रूप आहे. म्हणूनच कोणत्याही इष्टदेवतेला केलेली पूजा, अर्चना, प्रार्थना ही प्राप्त होणार मुख्य सर्व्हर अर्थात महाविष्णूंना आणि कोणत्याही इष्टदेवतेकडून सिद्धी प्राप्त झाली तरी ती मूळ श्रीविष्णूं या महासंगणकातूनच प्रदान केली जाते.
मला नुकताच एक प्रश्न विचारला गेला की आपण एखादे सद्गुरू केले अथवा अनुग्रह न घेता सुद्धा एखाद्या गुरूंना आपलं मानून साधना, नाम, जप सुरू केला आणि हे करत असतानाच दुसऱ्या गुरूंची माहिती, त्यांच्याबद्दलचं लेखन वाचलं तर आपलं चित्त विचलित होऊन आपण त्या गुरुकडे ओढले जातो का. याबाबत माझं वैयक्तिक मत असं आहे की,
मुळात सर्व गुरुतत्व एकच आहे, फक्त ते भिन्न रुपात व भिन्न काळात प्रकट झालं. प्रत्येक गुरूंनी काही विशिष्ट तपसाधना करून सिद्धी प्राप्त करून गुरुपदाचा अधिकार प्राप्त केलेला असतो. प्रत्येक गुरूंना आपल्या मर्यादा अथवा सीमारेषा ज्ञात असतात आणि त्याबाहेर न जाण्या विषयी ते निश्चित जागरूक असतात. तरीही ज्ञानप्राप्ती पोटी,माहितीसाठी इतर गुरूंचे साधक व भक्त आपल्या कडे आले असतील तर त्याना योग्य ते मार्गदर्शन करून पुन्हा त्यांच्या गुरुमार्गावर नेऊन सोडण्याची क्षमता व मर्यादा त्यांच्याकडे असते.
प्रत्येक गुरूंमधील संबंध हे अत्यंत आपुलकीचे भक्ति भावाचे व परम सूक्ष्म असे असतात. एखाद्या साधकांच्या मनात असा किंतु आलाच तर ते दुसरे गुरू त्या साधकाला आपल्या मूळ गुरुपासून अलग होऊ देणार नाहीत, तशी बुद्धी त्याच्या ठायी उत्पन्न होणार नाही याचं भान त्यांना असतं आणि तशी काळजी ते घेतात. कारण हे संबंध हे माय व मावशी या प्रकारातले असल्यामुळे मावशी आईच्या प्रेमाची जागा घेत नाही आणि मावशीच्या प्रेमाने आईच्या मनात असूया वा असुरक्षितता येत नाही.
सरतेशेवटी हे ध्यानात ठेवावं की, मुलाने गर्दीत, संकटात, वा आनंदाच्या भरात हात सोडण्याचा प्रयत्न केला तरीही आई कधीही मुलाचा हात सोडत नाही. तीच भावना सद्गुरूंची असते. त्यामुळे निश्चीन्त मनाने ज्ञानग्रहण करावं आणि साधना आपल्या गुरूंची , सर्व भार त्यांच्यावर सोडून, त्यांच्याच मार्गाने करावी.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment