राम अनुज भरत भाग ७४
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
भरताने, मांडवीकडे पाहिलं. दोघांची दृष्टादृष्ट झाली. मांडवीच्या नेत्रात अनेक प्रश्न होते. कदाचित मूळ संस्कार जनक राजाच्या घराण्याचे असल्यामुळे, अव्यक्त भाव जास्त सहज व्यक्त करण्याचं साधन हे लोचन असावेत. कारण तो काळसुद्धा अव्यक्तातून बरेच भाव व्यक्त करण्याचा होता. अल्प, स्वल्प कथनातून, गुह्य गोष्टी, गहन अर्थ सांगून, समोरच्या व्यक्तीला त्याचा अर्थ शोधण्यासाठी उद्युक्त करून, भावार्थ जाणून घ्यायला लावायचा, तो काळ होता.
त्यामुळे मांडवीच्यां मनात काय चाललं असेल, हे अव्यक्त असूनही जाणून, भरत म्हणाला
"नियतीने, ज्या कार्यासाठी आपला जन्म घडवून आणला आहे, त्या कार्याची सुरुवात आता झाली आहे. या कार्यात प्रत्येकाला काही दायित्व दिलेलेच आहे.प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्यासाठी जो कार्यभाग घडवला आहे, तो कदाचित अधिक असाधारण असणार. अन्यथा ज्येष्ठ भ्राता विनाकारण देवी सीतेला सोबत घेऊन गेलेच नसते. पण भ्राता लक्ष्मण आणि ऊर्मिला यांची स्थिती अधिक खडतर आहे, हे नक्कीच.
याचं माझ्या लेखी कारण हे की, प्रत्यक्ष जगत्पती श्रीराम यांचं दायित्व ज्याच्या शिरावर आहे, त्या व्यक्तीला, सर्वात महत्तम दायित्व आहे. कारण जगताचे पालनकर्ता श्रीराम, याना संपूर्ण चौदा वर्षे सांभाळून, त्यांना कमीतकमी भाग भोगावा लागेल, हेच लक्ष्मण पाहणार. कारण मी त्याला पूर्ण ओळखतो. संकटाची एक काडी सुद्धा श्रीराम यांच्या पर्यंत पोचणार नाही, हे असाधारण आणि अशक्य प्राय दायित्व, त्याच्या शिरावर आहे. अन्यथा ज्येष्ठ भ्राता तर जगतात अजेय आहेत.
त्यांना अशक्य काहीही नाही. पण याचा अर्थ असाही होतो की, जे कार्य, त्या शिरांवर आहे ते, अत्यंत दुर्धर व अती गुह्य असेल,तेवढंच त्यांच्या पर्यंत गेलं पाहिजे. हा उद्देश लक्ष्मण चौदा वर्षे पर्यंत सांभाळून साध्य करणार, हे नक्की. म्हणूनच त्याने चौदा वर्षे जागृती आणि त्या बदल्यात, उर्मिलेसाठी चौदा वर्षे निद्रा प्राप्त करून घेतली, ही अत्यंत गुह्य गोष्ट आहे. कदाचित यामागे नियतीची इच्छा व काही गुह्य योजना, नक्की असणार. अन्यथा अश्या अद्वितीय आणि अशक्य प्राय घटना, प्रसंग आणि गोष्टी घडत नाहीत.
भरताने, इतके बोलून, सहेतुक, मांडवी कडे पाहिले. मांडवी साश्रू नयनांनी म्हणाली.
" आर्य, आपण म्हणता या सर्व अतर्क्य वाटणाऱ्या घटनांमध्ये, मी आणि शृतकिर्ती त्यातही, सौभाग्य शाळी आहोत. कारण आम्हाला, निदान ज्ञान आहे की, आमचे पती कुठे आहेत. पण उर्मिला ताई आणि जानकी ताई यांची कथा पूर्ण असहनीय आहे. उर्मिलाताईला तर हेही ज्ञात नाही की, पती कोणत्या स्थितीत आहे आणि कोणत्याही स्थळी आहे. कारण यासाठी आवश्यक, मती आणि जागृती, या दोन्ही बाबत ती सुप्तावस्थेत आहे. आणि जानकी ताई, वनात कुठे कुठे फिरत असेल, काय परिधान करेल, काय अन्न तिला ग्रहण करायला मिळेल, हे तिलाही माहीत नाही.
आपण नियतीचे आभार मानूया की आपल्याला तेच दायित्व, नियतीने दिले, ज्यासाठी आपण उपयुक्त आणि पात्र आहोत."
यावर भरत उत्तरला
"मांडवी, तुझी समज आणि मती, खूप गहन गोष्टींचे अर्थ, सहज उलगडून सांगते. तू एका वाक्यात,कदाचित खूप मोठा गाभा कथन केला आहेस. हे सत्य आहे की, नियती प्रत्येकाच्या पात्रात, तितकेच दायित्व सोपवते, ज्यासाठी त्या व्यक्तीला, या जगतात धाडण्यात आलं आहे. तेवढ्या दायित्वत, ती व्यक्ती उपयुक्त कार्य करतो झाली तर, पुढील प्रत्येक जन्मात, अधिका धिक कार्य दायित्व, त्या आत्म्याला, आत्मा प्रवासात, प्राप्त होत जाते.
ही प्राप्ती, व्यक्तीच्या आत्म् उद्धार आणि आत्म शुद्धी, यांच्या सम प्रमाणात वृद्धिंगत होत जाते किंवा घटत जाते. म्हणून आत्म्याच्या उद्धराच्या प्रदीर्घ यात्रेत आपण, मानलं तर नगण्य दायित्व प्राप्त आहोत आणि म्हटलं तर उच्च दायित्व प्राप्त आहोत. कारण अती उच्च दायित्व प्राप्त ज्येष्ठ भ्राता श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण, यांचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरावा की न ठरावा, हे पूर्ण पणे आपल्या हाती आहे. या अनुरोधाने, आपलं दायित्व अत्यंत उच्च आहे.
कारण मला, या अयोध्येचा कार्यभार, परम पावन श्रीराम यांचा प्रतिनिधी म्हणून पार पाडायचं आहे. हे माझ्या मती, शक्ती यांच्या पलीकडे असलेलं दायित्व आहे. पण भ्राता श्रीराम जिथे असतील, तिथून शक्ती रुपात,हे कार्य माझ्या कडून,नक्कीच यशस्वी करवून घेतील.त्याचप्रमाणे तुझ्या दायित्वात, देवी सीता आणि ऊर्मिला, यांचे दायित्व एकत्रित लिहिले आहे. म्हणून, तुझेही दायित्व, अती उच्च आहे. दोघांनाही नियतीने,शृंखलेच्या अश्या भागात गुंफले आहे की, एखादी कडी निखळली तरी पूर्ण शृंखला भग्न होऊ शकते. म्हणून, दोघांनी आपले कार्य महत्तम समजून, पार पाडणे, गरजेचे आहे."
अत्यंत मितभाषी मांडवी, आपल्यावरील दायित्वाचा भार सहर्ष पेलण्यास समर्थ आहे,हे भरत जाणून होता. त्यामुळे इतक्या संवादाने, मांडवी ने काय करणं अपेक्षित आहे, हे तिला नक्कीच उमगल असेल. अर्थात तसही, राजा जनक यांच्या चारही कन्या, उच्च संस्कारित असल्या कारणाने, त्यांना प्रसंगाचे गांभीर्य आणि त्या प्रमाणे आपले दायित्व, याची उत्तम जाण असल्या मुळे, त्या पूर्ण सजग आणि दक्ष होत्या.मांडविचा निरोप घेतल्या वर, भरत, शत्रुघ्न आणि शृतकिर्ती याना एकत्र बोलावून म्हणाला.
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२२/०८/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment