राम अनुज भरत भाग ६९
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
नियतीच्या फटकाऱ्यातून, कोणीही वाचलं नव्हतं. प्रत्येक जण या एका घटनेने, व्यथित आणि करुण अवस्थेत होते. मौन आणि मुक रुदन करत असलेल्या प्रत्येकाच्या मनात, राम प्रेमाचा आणि त्या प्रेमापायी विरहाचा डंख घेत होता. प्रत्येकजण विमनस्क अवस्थेत उपचार म्हणून, अयोध्येला आपल्या गृहाकडेः पुन्हा माघारी परत चालला होता. चित्र कूटाकडे निघताना,प्रत्येकाला आस होती की,श्रीराम, माझे प्रभू श्रीराम, भरताचा आग्रह, ओलांडू शकणार नाहीत आणि जिथे असतील, तिथून,भरतावरील प्रेमा साठी, माघारी नक्की येतील.
परंतु काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात, त्यावेळी नियतीचा हा निष्ठुरपणा, आपल्याला आघात करून गेला तरीही, त्यामध्ये, नियतीचा अंतिम उद्देश,अखिल जगताचं हित आहे, हे फक्त नियतीलाच ज्ञात असतं. काळाच्या उदरातील काही उत्तरं, नियती, आपल्या गूढ पद्धतीनेच देते. त्या उदरातील गर्भात, उद्याच्या भविष्यासाठी, काय गर्भजनन होत आहे, हे एक विधाता व त्याच्या पोटी जन्म घेतलेल्या नियतीचा गर्भ जाणत होता.
पण त्यासाठीच्या प्रसव वेदना, आज तरी अयोध्यावासी देत होते. त्यांच्या या विरहात, उद्याच्या उज्वल भविष्याचा भ्रूण वाढतो आहे,हे प्रत्यक्ष,परम पित्याच्या अनुज भरत, याला सुद्धा ज्ञात नव्हतं.याला कर्मफलांची अलौकिक सांगड म्हणावी लागेल. या कर्मफलाची परिणती, इतक्या विशाल प्रमाणात एकत्रित, संपूर्ण अयोध्या, राज परिवार याना भोगावी लागत आहे.
नंदीग्राम येथे, पर्णकुटी बांधून झाली आणि त्यामध्ये एका उच्च आसनाची व्यवस्था, करण्यात आली. त्यावर उत्तम उंची वस्त्रे मांडून, सिंहासन समान एक आसन निर्माण करण्यात आलं. त्या आसनावर श्रीराम पादुकांची स्थापना करण्यात येणार असल्या मुळे, कुलगुरू महर्षी वसिष्ठ मुनिवर यांनी मंत्रोपचार विधिनी, त्या आसनाची शुद्धता केली. त्यानंतर, भरताने, आपले शीश त्या आसना पर्यंत लवून,आतापर्यंत आपल्या मस्तकावर धारण केलेल्या श्रीराम पादुका, त्या आसनावर स्थापित केल्या.
तत्पश्र्चात त्या पादुकांची, त्या आसनावर, विधिवत, मंत्र उपचाराने, प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भरताने, त्या स्थापित पादुकांना, आपले दोन्ही कर जोडून, मनःपूर्वक, प्रणिपात केला आणि अत्यंत विनम्र भावाने म्हणाला
" हे जगतपिता, जगत्पालक, जगतोद्धारक, परम पूजनीय श्रीराम, आपल्याकडून प्राप्त केलेल्या, आपल्या चरण कमल स्पर्शित पादुका, आता विधिवत, अयोध्येच्या आसनावर,स्थापित केल्या आहेत. आपल्या कृपेने आणि अनुमतीने, आपणच, या पादुकांच्या माध्यमातून, या सार्वभौम अयोध्या राज्याचे, कर्ते धर्ते म्हणून कार्य पाहणार आहात. हा दास आपल्या आज्ञेने, त्यांची अमलबजावणी करेल, हे वचन आपल्याला देत आहे.
आपल्या परम पावन श्रीराम नामाने, या राज्याची धुरा, निव्वळ आपला एक दास म्हणून, मी सांभाळणार आहे. अन्यथा, या पदाला भूषवण्याची कोणतीही पात्रता, या दास भरताची नाही. परंतु आपल्या नामाने, हे दायित्व निभावून नेण्याची पात्रता या दास भरताच्या अंगी आलीच, तर तो आपला क्रुपा प्रसाद असेल. या क्षणापासून पुढे चौदा वर्षे, या पादुका रुपातील, आपल्याला संबोधित करूनच, प्रत्येक निर्णय व त्या निर्णयाची अंमलबजावणी हा भरत करेल.
या कारणाने, हा दास भरत, आपल्या चरणी, प्रार्थना करत आहे की, आपल्या पुनरागमनापर्यंत येणाऱ्या प्रत्येक क्षणी, आपण, आपल्या नाम रुपात, या पादुका माध्यमाने, पदोपदी, आपल्या अस्तित्वाने आणि पुण्य प्रभावाने, या भरताला, परिवाराला व आपल्या प्राणप्रिय अयोध्येतील प्रत्येक जनसामान्यांना, सांभाळून घ्या. आमच्या प्रत्येक क्षणाला आपण, आपल्या पादुकारूप अस्तित्वाने, इष्ट ते घडवून घ्या आणि अनिष्ट ते आपल्या प्रभावाने नष्ट करा. हा दास भरत आपल्या चरणी, सदैव लीन आणि अखंड ऋणी राहील. या दासाची एवढी विनंती आपण कृपा करून स्वीकाराल हा दृढ विश्वास भाव, आपल्या चरणी पोहोचत राहो. इतकीच विनंती मान्य करा. "
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१७/०८/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment