Skip to main content

राम अनुज भरत भाग ७८

राम अनुज भरत भाग ७८

(आजचा भाग लिहून अक्षरशः स्वर्गसुखाची अनुभूती प्राप्त झाली. वाचकांनी सुद्धा त्याचं भावाचा लाभ घ्यावा)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

विचारांच्या व गंगेच्या प्रवाहात हरवलेला भरत, जलात विहार करत, पलीकडील किनारी कधी पोचला, त्यालाही कळलं नाही. त्या विस्तीर्ण जलाशयाचा वेध एकवार त्याच्या नजरेने घेतला आणि तो विचार करता झाला की, हा जलप्रवाह, अखंड, अविरत, कोणत्याही आपत्तीत, परिस्थितीत विहरत असतो. याला कोणतीही बाधा आवरू शकत नाही किंवा बांधू शकत नाही. नित्य हा खळाळत वहात असतो. म्हणूनच यातील जल स्वच्छ, सुंदर, स्फटिकासमान आहे.

म्हणजेच याच्या स्वच्छ नितळ जलाचं रहस्य, याच्या नित्य वाहण्यात आहे. मनाचं असच असायला पाहिजे. जर ते मन घटनेच्या, प्रसंगांच्या, क्षणांच्या बांधात अडकलं तर, ते गढूळ पाण्यासमान होईल आणि मग अश्या मनात येणारे विचार, हे नक्कीच पथदर्शी, पारदर्शक नसतील आणि मन, मस्तिष्क यांना देखील अस्वच्छ करतील. अश्यावेळी त्या मनात येणारे,सर्व विचार हे मन,देह आत्मा यांना अचिंतनीय विचारात गुंतवून ठेवतील. त्यातून तो जीव अधोगतीच्या मार्गानेच जाईल. 

परंतु, प्रवाहित, जलाप्रमाणेच, प्रवाहित असलेलंमन, हे उत्साह, उमेद, ऊर्जा आणि शक्ती यांचा स्त्रोत असेल. म्हणूनच ज्येष्ठ भ्राता श्रीराम हे, या गुणांच्या आधारे, सुसंपन्न विचारांचे धनी आहेत. एकाच विचारात, एकाच स्थावर भावात ते न अडकता, अविरत नित्य, प्रत्येक क्षणांच्या प्रवाहात जलप्रवाहासम पुढे जातात. आपण वाऊगे त्यांना, राज्य, सिंहासन, परंपरा यांच्या शृंखला मालेत, बद्ध करण्याचा वृथा प्रयास करत होतो. ते मात्र, हे जाणत होते की, जे घडत आहे, त्याचा अनाठायी विचार न करता, पुढे जात राहून, पुढचा विचार करावयास हवा. 

त्यानुसारच त्यांनी, घडून गेलेल्या अनिष्ट घटनांचा, त्यात सहभागी व्यक्तींचा, कोणताही वृथा विचार न करता, त्या घटना, नित्य कर्मफल नियतीचा भाग समजून, अहित कारक विचार मागे टाकून, हितकारक भविष्याचा विचार करून, कर्म मार्गावर, प्रवृत्त राहणं, हे योग्य आहे, हे ज्येष्ठ भ्राता यांनी जाणलं. त्यायोगे ते किती श्रेष्ठ आणि उच्च विचारांचे ठरतात. या विचाराने, भरताच्या मनात, प्रभू श्रीराम यांच्या विषयी, अलौकिक कौतुक भाव, जागृत होऊन, वृद्धिंगत होत गेला. 

पलिकडील किनाऱ्यावर, भरत काही काळ, स्थिरावला. विचार व मनाच्या या चिंतनात रममाण भरत, विचारांना पूर्ण नियंत्रित करण्याच्या ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या कौशल्यावर आणि गुणांवर, कौतुकाने शरण गेला. ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्याबद्दल आदर भाव अत्युच्च पातळीच्या शिखर सीमेवर पोचला.आपले दोन्ही कर जोडून, आपल्या मनातील प्रभू प्रतिमेला, अर्थात प्रेमस्वरूप श्रीराम यांना शरणागत भावाने वंदन करता झाला. 

त्याच स्थितीत श्रीराम यांच्या नामाचं उच्चारण, आपल्या वैखरिने करत, तसाच काही क्षण, श्रीराम यांच्या समीप असल्याच्या प्रचीतीची अनुभूती घेत, स्थिरावला. मनात भ्राता श्रीराम यांचं स्मरण, आत्मा त्या नामाच्या प्रतिमे समोर नत आणि वंदित भावात आणि वाचा, बुद्धी आणि संपूर्ण देह, त्याच नामाच्या उन्मनी अवस्थेत रत, ही भावसमाधीची स्थिती, भरताने प्राप्त केली. 

किंबहुना आजपर्यंतचा, भरताचा अनुभव व त्या अनुभवाची अनुभूती, अशीच होती की, ज्यावेळी, श्रीराम नामाच्या स्मरणात देह, वाचा, बुद्धी, मन व त्यायोगे अंतरात्मा स्थिर असतो, त्या भाव समाधी अवस्थेत, आत्म्याला एका विलक्षण अश्या आत्म अनुभुतीची प्रचिती प्राप्त होत असे. सर्व भौतिक विचार, तिथे बांधलेल्या अश्वा प्रमाणे स्थिरावत आणि मन, देह व बुद्धी त्या नामाच्या अंतरंगात विलक्षण स्वर्गीय सुखाचा अनुभव करत असे. 

या भाव समाधी अवस्थेत असेच स्थिर आणि स्थित राहून, या अवर्णनीय प्रचीतीला पुन्हा पुन्हा प्राप्त करावे, हाच विचार बुद्धीत आणि मनात स्थिरावत असे. या भावा वस्थेत हरवून गेलेल्या भरताला, आपल्या ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या अद्वैत स्वरूपाची मोहिनी का लागावी, हा प्रश्न, नित्य सतावत असे. भरताला स्मरत होतं त्याप्रमाणे, बालपणापासून,आपण ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना समोर बसवून, घटिकाच्या घटिका, त्या रूपाच अवलोकन करत होतो. 

त्यात आश्चर्यकारक अलौकिक गोष्ट ही होती की, आपण याप्रमाणे अवलोकनात समाधिस्थ असताना, ज्येष्ठ भ्राता, आपल्या पापणीची उघडझाप, स्थिर करत असत. जेणे करून माझ्या अर्थात या भरताच्या समाधीचा भंग होऊ नये. त्या उन्मनी अवस्थेनंतर कित्येकदा आपण ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना प्रश्न करत होतो की, 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२६/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...