Skip to main content

राम अनुज भरत भाग ७२

राम अनुज भरत भाग ७२

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

गुरुदेव श्री वसिष्ठ महर्षी यांनी प्रस्थान ठेवल्यावर, त्यांच्या परतून चाललेल्या, देहाकृती कडे पाहून, भरताने पुन्हा एकवार वंदन केलं आणि तत्पश्चात आपल्या परिवाराकडे वळले.सर्वप्रथम माता कौसल्या,हिच्यापर्यंत येऊन, भरताने आपले दोन्ही कर आणि शीश, मातेच्या चरणांवर टेकवून, प्रसन्नतेने प्रणिपात केला. मातेच्या नेत्रात अखंड धारा होत्या. 

परंतु, ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांच्या चरण पादुका प्राप्तीने, त्यांच्या पादुकांच्या आसनस्थ झाल्याकारणाने, पण त्याहीपेक्षा, प्रत्यक्ष श्रीरामांनी आपल्याला, त्यांच्या पादुकांचं, या अखिल जगतात, प्रथम प्रतिनिधित्व दिलं, या मुख्य कल्पनेने, भरत आता चिद्घन आकाशाप्रमाणे, चिदानंदी रममाण झाल्यामुळे,आतून व बाहेरून पूर्ण शांत झाला होता.

त्यामुळे मातेच्या लोचनातील अश्रू धारा, आपल्या सुकोमल हातांनी पुसत पुसत मातेला म्हणाला.

" हे माता कौसल्या, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना घेऊन, येण्याचे पूर्ण प्रामाणिक प्रयत्न, आपल्या पुत्र भरताने केले होते. पण प्रभू श्रीराम यांच्या इच्छेपुढे, प्रत्यक्ष काळही काही करू धजावणार नाही. ते कळीकाळाचे स्वामी आहेत. पण त्यांनी माझी एक विनंती मान्य केली की हा भरत कधीही अयोध्येचे राज्य मागत नव्हता, त्यामुळे हा भरत राज्यावर बसणार नाही. महर्षी वसिष्ठ यांच्या विनंतीला मान देऊन, प्रतिनिधी स्वरूपात का होईना, पण त्यांच्या चरण पादुका या सिंहासनी स्थापित करण्याला,त्यांनी मान्यता दिली.

त्यांच्या चरण पादुकांचं प्रतिनिधी होण्याचं, या विश्वातील, नव्हे तर या ब्रम्हांडातील, अत्यंत दुर्लभ सौभाग्य मला प्राप्त झालं आहे.हा मी माझा सर्वात मोठा गौरव समजतो. म्हणून माते, या पादुकांच्या रुपात, प्रत्यक्ष श्रीराम येथे उपस्थित आहेत, हे जाण. म्हणजे हा आनंद, नित्य आणि क्षणोक्षणी प्राप्त होईल. अर्थात मी हे आपला पुत्र म्हणून सांगण्याचं धारिष्ट्य करतो आहे. अन्यथा एका मातेला, पुत्राच्या वियोगातून बाहेर पडायला, काही तर्क देणं, हे महा घनघोर पाप आहे. मातेचं दुःख प्रत्यक्ष भगवंत देखील दूर करू शकत नाहीत.

या उपरांत, जीचा पुत्र प्रत्यक्ष भगवंत आहे आणि तोच जिला सोडून दूर गेला आहे, अश्या मातेचं दुःख अत्यंत कठीण आहे. पण, श्रीरामांच्या, माझ्यावरील स्नेहाने, मी आपल्याला आश्वस्त करू शकतो की, भ्राता शत्रुघ्न आपली काळजी घेईल. त्याच प्रमाणे मी येथे, कायम स्वरूपी असेनच. त्यामुळे आपण मला भेटायला, कधीही येऊ शकता. 

अयोध्या नगरी, येथून फार दूर नाही. माझ्या सन्यस्त जीवन व्यतीत करण्याच्या निर्णयामागे, ज्येष्ठ भाता श्रीराम यांच्यावरील माझा अत्याधिक स्नेह आणि पिताश्री व देवी कैकयी यांच्या आज्ञेचे पालन करून, रघुकुलरीत पालन करण्याचं, त्यांचं धैर्य व निष्ठा, हे मुख्य कारण आहे. अन्यथा जगत्पालक श्रीराम यांच्या अनुपस्थितीत आपली सेवा करण्याचं सौभाग्य, मी नक्कीच प्राप्त करू शकलो असतो. 

परंतु यथा मती तथा गती, या न्यायाने, मला श्रीराम प्रभू यांच्या प्रमाणेच, सन्यासी व वन्य जीवन जगण्याची मती, झाली आहे. हा नक्कीच काही कर्मभोग योग असेल. नियतीचे काही काही भेद, आपण येणाऱ्या चौदा वर्षांच्या काळाची प्रतीक्षा करूनच, जाणू शकतो. " 

इतकं बोलून, भरताने शांत चित्ताने, मातेला, दोन्ही कर जोडून, प्रसन्न होऊन प्रणाम केला. मातेने, त्याचे बोल ऐकले आणि म्हणाली.

"पुत्र भरता, ज्या मातेच्या चार चार पूत्रांपैकी, तीन पुत्र नियतीने एका फटकाऱ्यात, काही काळासाठी दूर नेले, तिला प्रत्येक क्षण जगण्याची एकच आस असते की, काळाच्या या दुर्दैवी फेऱ्या नंतर ते पुत्र पुन्हा भेटतील. यातसुद्धा मला रामापासून घडलेल्या वियोगाचं दुःख आहे. पण चिंता नाही. कारण राम हा सामर्थ्य शाली आणि तरीही गंभीर आहे आणि पुत्र लक्ष्मण त्याची चिंता, जीवा पलीकडे करेल, हा विश्वास मला आहे. पण मला पुत्र लक्ष्मणाची अत्याधिक चिंता आहे.

कारण माझा पुत्र लक्ष्मण हा अत्यंत शीघ्रकोपी आहे. म्हणूनच मी रामाकडून, त्याचा सांभाळ, पित्याच्या मायेने करण्याचं वचन घेतलं आहे. कारण राम रघुकुल भूषण असल्यामुळे, वचनांचा पालनकर्ता आहे. सद्य स्थितीत, आमच्या जवळ पुत्र शत्रुघ्न असेलच. त्याचे लाड आम्ही चारही पुत्रांप्रमाणे करूच. त्याला सर्व मातांचा अनोखा स्नेह चौदा वर्षे प्राप्त होईलच. परंतु मला सर्वाधिक चिंता, पुत्रा तुझी आहे. कारण तुच असा आहेस, जो एकटाच इथे राहणार. तुझ्यासमीप कोणीही नाही. त्यात तू रामभक्त, त्यामुळे राम चिंतेत आणि रामचिंतनात तहान भूक सुद्धा विसरणारा बंधू आहेस." 

इतकं बोलून मातेला गहिवरून आलं. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२०/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...