राम अनुज भरत भाग ५६
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
सुमित्रा, लक्ष्मणा च्या जन्माच्या आठवणीत हरवून गेली.
बाळरूप लक्ष्मण याच्या कळवळून रडण्याने, संपूर्ण राजपरिवार, चिंताक्रांत झाला होता. राजवैद्य झाले, बाहेरचे सर्व उपचार झाले. मुनिवर वसिष्ठ ऋषींच्या ब्रम्हवृंदाने, मंत्र उपचार करून झाले. पण तरीही, बाळ रूप लक्ष्मण काही केल्या, आपल्या दुःस्थीतीतून बाहेर येत नव्हता. त्याचवेळी महर्षी वसिष्ठ, नामकरण दिन आणि त्या कार्याची माहिती घेऊन व चारही बाळांची जन्म टिपणे घेऊन, राज महालात पातले.
त्यांच्या कानावर ही वार्ता, येतायेताच, पोचली होती. त्यांनी तोपर्यंत चारही टिपणांचा अभ्यास केला होता. त्यांनी आल्या आल्या सूचना केली की, या बाळाला, ज्येष्ठ बालक असलेल्या तेजस्वी बालका शेजारी आणून ठेवा. अत्यंत सुशोभित, सुवर्ण रत्नजडित पाळण्यात, शांत गंभीर भावात निजलेल्या, बाळरूप रामाच्या अत्यंत निकट, त्याचं पाळण्यात बाळरूप असलेल्या लक्ष्मणाला निजवताच, बाळ शांत होऊन, जणू काहीच झाल नव्हतं अश्या स्थितीत, अती दमण्याने, त्वरित निजला सुद्धा.
निजल्यामुळे पुन्हा एकवार,बाळाला उचलताच, आधीच्या प्रमाणे अतीव वेदनेने कळवळून आक्रंदन करून, रडायला सुरुवात केली. पुन्हा त्याला बाळरूप रामाच्या बाजूला निजवताचं बाळरूप लक्ष्मण शांतपणे निजला. महर्षी वसिष्ठ म्हणालेच.
" याचा जन्म ज्येष्ठ भ्राता असलेल्या या तेजस्वी बालका सह राहण्यासाठी आहे. जिथे हा ज्येष्ठ बालक जाईल, तिथे हा बाळ, असणार. हे विधिलिखित आहे. आपण त्यांना अलग करू शकत नाही."
त्यानंतर आजपर्यंत लक्ष्मण कधीही रामापासून वेगळा घडला नाही, राहिला नाही. रामलक्ष्मण हे दोन देहरुप भिन्न भासले तरीही, अंतरंगी दोन्ही एकच आहेत. अजून सुद्धा मातेला स्मरतंआहे की, त्या दिवसानंतर, लक्ष्मण रामाच्या समीप रहात असे. कौसल्या मातेने, त्याला रामा हून, वेगळे कधीच मानले नाही.किंबहुना कौसल्या देवींचा अधिक स्नेह,लक्ष्मण याच्यावर आहे.याची साक्ष, लक्ष्मण याचं आता पर्यंतचं जीवन आहेच.
पण विशेष करून,वनवासाला निघताना कौसल्या देवींच्या चरणांवर रामाने मस्तक ठेवताच, त्याला अश्रुयुक्त नेत्रांनी आणि त्याच डबडबलेल्या स्वरात, देवी कौसल्या, रामाला बजावून म्हणाली
"रामा, तू चौदा वर्षांच्या वनवासा पश्चात माघारी येशील, तेंव्हा लक्ष्मण तुझ्या सोबत मला दिसला पाहिजे. लक्ष्मण सोबत नसेल, तर तूसुद्धा माघारी येऊ नकोस."
या आज्ञेत, कठोरता कमी पण, लक्ष्मणावरील देवींचां अत्याधिक स्नेह दर्शित झाला.
याच अतिशोकाकुल स्थितीत माता कौसल्या सुद्धा, गत कालाचा विचार करत होती. राम आणि लक्ष्मण, माझा अत्याधिक स्नेह प्राप्त दोघेही, आज काळाच्या एका फटकाराने, चौदा वर्षे दृष्टीस पडणार नाहीत. याच विचारात मातेला, राम व लक्ष्मण यांचं नेहमी सोबत असणं, कौतुका स्पद वाटलं.
तरीही त्यातसुद्धा तिला रामापेक्षा जास्त चिंता लक्ष्मणाची होती. कारण आपल्या शीघ्रकोपी वृत्तीने,लक्ष्मण कोणत्या संकटाला आमंत्रित करेल, याची शाश्वती नव्हती. परंतु धीर गंभीर, स्थिर व शांत स्वभावाच्या रामाला, लक्ष्मणाचा हा स्वभाव ज्ञात असल्यामुळे,राम त्याला सांभाळून घेईल, असा एक दृढ विश्वास भाव, मातेच्या हृदयी स्थिर होता.
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०३/०८/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment