Skip to main content

राम अनुज भरत भाग ५९

राम अनुज भरत भाग ५९

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

आपल्या या विचारात माता कैकयी यांच्या नेत्रातून ओघळणारे अश्रू सुद्धा आता शुष्क झाले आहेत, हे शृतकिर्ती च्या ध्यानात आलच नाही. विचारांचा पदर सुटला आणि जेंव्हा ध्यानात आलं, त्यावेळी माता कैकयीला अशक्त पणामुळे, घडलेल्या सर्व घटनांमुळे आणि त्याहीपेक्षा अत्याधिक दुःख, राज्यातील जनतेने दिलेली,धिक्कार व निषेध पूर्ण दूषणं आणि त्याहीपेक्षा अत्याधिक वेदना, पुत्र भरत यांनी झिडकारून अव्हेरल्या मुळे, जो सार्वत्रिक अपमान घडला, त्यामुळे झालेला मनःस्ताप, मानभंग, हे अनेक दुःखाहून, अती वेदनादायक होतं. 

कैकयी मातेला कश्या प्रकारे समजावून सांत्वन करावं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, शृतकिर्तिला. तरीही ज्येष्ठ दिर आणि आता कुटुंब प्रमुख असलेले श्रीराम, यांची आज्ञा वजा सूचना, मान्य केल्यावर, काय आणि कसं हा प्रश्नच उरत नव्हता. म्हणून, शृतकिर्ति ने प्रश्न केला. 

" माता कैकयी, आपण थोडं काही अन्न ग्रहण करावं.अती कृश होऊन, अनेक आजार बळावतील." 

माता कैकयी,अन्य काहीही करण्याच्या स्थितीत नव्हतीच आणि इच्छाही नव्हती आणि बळ सुद्धा नव्हतं. कारण जे झालं, त्याला आपण कारणीभूत आहोत, हा न्यून मनात पूर्ण घर करून होता. गेल्या कित्येक दिवसात कोणीही तिच्याशी काहीही संवाद केलेला नव्हता. त्यामुळे कोणी ख्याली खुशाली विचारण्याचा प्रश्नच नव्हता. जे केलं ते पुत्र प्रेमाने की अशुद्ध मतीने, हे देखील, समजणं, सद्य स्थितीत, अशक्य होतं. त्यामुळे ज्याबद्दल स्वतःच्याच मनात जिथे असा संभ्रम, विभ्रम व भ्रम आहे, त्याबद्दल मन स्वतः स्वतःचं समाधान किंवा सांत्वन तरी कसं काय करणार. 

याच अपराधी, दुर्बल आणि न्यूनगंड स्थितीत माता कैकयी, विमनस्क अवस्थेत, म्हटलं तर, खोल विचारात, म्हटलं तर विचारशून्य बसून होती.अनेक तिरस्करणीय नजरांचे, तीक्ष्ण भाले, मनाला, हृदयाला, काळजाला भिडलेले, हताशपणे पहात.नियतीच्या एका फटकाऱ्यात, जिने होत्याचं नव्हतं केलं, जिने, स्वतःहून स्वतःकडे वैधव्य बोलावून घेतलं, जिने सुखाची सर्व दानं पडलेला सारीपाट आपणहून, स्वबुद्धिने, स्वकर्माने,स्वहस्ते उधळून लावला, जिने फुलांचा बिछाना, स्वतःच काट्यात नेऊन बांधला, तीच मी कैकयी. 

जिच्या मस्तकी, असलेला सुखाचा सुवर्ण रत्नजडित मुकुट, जिने स्वहट्टाने भिरकावून दिला, दूर काळाच्या सीमे पलीकडे, पुन्हा कधीही प्राप्त न होण्यासाठी. इतक्या विचारात बुडून, विचारहीन झालेली कैकयी, शृतकीर्तिच्या प्रश्नाने, जरासुद्धा, प्रतिकृत झाली नाही. शृतकीर्ति ही अत्यंत लाघवी आणि संस्कारी व सुस्वभावी असल्यामुळे, तिने, कैकयीची ही भावावस्था जाणली. म्हणूनच तिने, त्यांच्या खांद्यांना हलकेच स्पर्श करून, पुन्हा पृच्छा केली की, 

" माता आपण काहीही अन्न ग्रहण न केल्यामुळे आणि अतीविचाराने कृश झाला आहात. आपण काही अन्न ग्रहण करावं आणि काही मधुरस प्राशन करावं. कारण ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांनी आपली काळजी घेण्याचं दायित्व, आर्य शत्रुघ्न यांना दिलेलं आहे. अर्थात त्यामुळे ते आम्हा उभयतांचं दायित्व आहे. पण त्याहीपेक्षा जास्त, आपण परिवार सदस्य म्हणूनही, मी आपल्याला आग्रह पूर्वक सांगते आहे की, मी जे देते आहे, ते आपण ग्रहण करावं." 

माता कैकयीने खुणेनेच, काहीही न देण्यासाठी, हात जोडून विनवले. त्यांचे दोन्ही हात धरून, शृतकिर्ती म्हणाली.

" आपण ज्येष्ठ आणि माता आहात. आपण असं कर जोडून, सानांना नमन करणं, आमच्यासाठी अयोग्य आहे. " 

अत्यंत गहिवर येऊन, तरीही अश्रू न येणाऱ्या, आवाजात माता कैकयी म्हणाली.

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०७/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...