राम अनुज भरत भाग ५९ च्या आधी थोडं मनोगत
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
या लेखा पूर्वी माझी मनोभूमिका मांडणं क्रमप्राप्त आहे, असं मला वाटतं. म्हणून ती मनोभूमिका मांडतो आहे.
मुळात रामायण हा भावाविष्कार आहे. ज्यामधे, त्यातील प्रत्येक पात्राचे, भाव आणि त्यातून आलेले संबंध, हृदयंगम चित्र उभे करतात. सर्वांना ज्ञात असेल की, रामायण हे प्रत्यक्ष घडण्याआधी, महर्षी वाल्मिकी यांनी साधारण हजार एक वर्षे आधी लिहिलं गेलं आहे. त्यानंतर, त्यानुसार घटना घडत गेल्या आणि रामायण, लिहिल्या नुसार सार्थ झालं. त्यामुळे त्यातील घटना जरी, तश्याच्या तश्या घटित झाल्या तरी, त्यामागील प्रत्येक पात्राचे भाव आणि कार्यकारण भूमिका ही मूळ लेखनाहून भिन्न असू शकते.
त्यामुळेच कैकयी विषयी, जे भाव, प्रत्यक्ष रामायणात खल पात्र म्हणून मांडण्यात आलेलं आहे. त्याहून थोडी भिन्न भूमिका, संत तुलसीदास विरचित रामचरित मानस यात मांडली आहे. कारण संत तुलसीदास यांनी मानसिक पातळीवर किंवा मनोव्यापारातून राम चरित्र मांडलं आहे. त्यामुळे त्यात त्यांनी कैकयी, नंतर पश्चात्ताप पावते अश्या प्रकारची भूमिका मांडली आहे. एक लक्षात घ्या त्याच घटने मागे असलेली, कर्त्याची भूमिका, खरतर आपण अनुमानित करू शकतो. पण त्यापर्यंत पूर्णत: पोचता येणं, हे ईश्वरालाच साध्य होईल.
परंतु मैथिली शरण गुप्ता यांनी, त्यांच्या रामायण अविष्कारात कैकयीचं पात्र पूर्णतः भिन्न मांडलं आहे. ज्यामधे, फक्त त्या क्षणापुरती कठोर भूमिका घेतलेली कैकयी, पूर्ण वेगळी आणि रामावर निस्सीम प्रेम करणारी दाखवली आहे. कारणच तसं आहे की, कैकयी ही मूलतः श्रीराम यांच्यावर, भरताहून अत्याधिक प्रेम करणारी माता होती. परंतु नियतीच्या मार्गात, जे घटित लिहिलेलं आहे, ते घडून येण्यासाठी, अनेकदा, काही महत्वाच्या पात्रांना, आपला मूळ भाव धर्म सोडून, वेगळी तात्कालीन भूमिका, घ्यावी लागते.
किंवा त्यांची बुद्धी तात्कालीन घटनात भ्रष्ट किंवा भ्रमिष्ट झालेली पाहायला मिळते. माझी भूमिका यात अजून थोडी भिन्न आहे. अनेकदा, ईश्वराने योजलेल्या कार्यात, घटना घडून येण्यासाठी किंवा विधीच्या विधानानुसार वळण मिळण्यासाठी, एखाद्या पात्राला अज्ञानवश किंवा बुद्धि पूर्वक, विरुद्ध भूमिका किंवा वळण देणारं मुख्य पात्र म्हणून, कार्य करावं लागतं. अश्या व्यक्ती, हे कार्य जाणूनबुजून करतात. अगदी प्रसंगी खल भूमिका आणि टोकाचा विरोध घेणारी भूमिका घेतात. तशीच भूमिका भीष्म पितामह यांनी महाभारतात घेतली. त्यांना माहीत होत जिथे कृष्ण तिथेच जय. पण सर्व खल एकत्रित येण्या साठी,त्यांची भूमिका महत्वाची होती, तीच त्यांनी बजावली.
कैकयी ही एक उत्तम बुध्दिमत्ता असलेली आणि राजकारण व धर्मकारण यांची जाण व ज्ञान असलेली व्यक्ती होती. तिला हे देखील ज्ञात होतं की, राम जन्म का आहे. त्या जन्माचं निहित कार्य काय आहे. त्यामुळे जर राज्याभिषेक घडला तर रामाला निहित व विहित कार्य करता येणार नाही. याचं कारण रावणाला आगळीक करून, श्रीरामांना आपल्या कडे पाचारण करणं क्रमप्राप्त होतं. हे तरच घडेल जर राम राजा न होता, रावणाच्या आवाक्यात, प्रदेशात आणि आगळीक करण्या योग्य स्थितीत जाईल. म्हणूनच तीन पवित्र ठिकाणं रामांनी निवडली.
चित्रकूट, दंडकारण्य आणि पंचवटी. या तीनही तपोभूमी होत्या. जिथे रावणाचे आप्त अर्थात राक्षस गण होते. कारण या तीनही भूमीत यज्ञ याग, तप जाप आदी धर्म कार्य करणारे ऋषीमुनी निवास करत होते. त्यामुळे हे धर्मकार्य भंग करण्यासाठी आलेले होते आणि येत होते. खर आणि दूषण यांसह त्यांच्या चौदा हजार सैन्याचा वध व नाश रामानी एकट्याने केला. उद्देश, रावण अंगावर यावा. यानुसारच शुर्पणखा भंजन हा देखील त्याच खेळातील एक डाव होता. जो यशस्वी.झाला.
पण हे सर्व तरच घडून येणार होतं, जेंव्हा राम अयोध्येचे सर्व मानसिक पाश सोडून, अयोध्येतील राजपाट सोडून बाहेर पडतील. विश्वामित्र महर्षी यांच्या मागणी वेळी, राजा दशरथ यांनी मोठ्या मुश्किलीने, अनुमती दिली. त्यामुळे ते आपण हून या कार्यासाठी अशी अनुमती देतील, हे अशक्य होतं. अभिषेक होण्यापर्यंत गोष्टी गेल्यावर, सर्व देव, सुरवर इंद्र आदी भयभीत झाले. कारण राम जन्मच मुळात मर्यादा पालन यास्तव आहे. त्यामुळे, जोपर्यंत कारण घडत नाही, तोपर्यंत, श्रीराम, रावणाला मुद्दाम मारायला जाणार नाहीत, हे सर्व देवांना ज्ञात होतं. त्याप्रमाणे ते कैकयीला सुद्धा ज्ञात होतं.
म्हणूनच रामावर निरतिशय आणि निस्सीम प्रेम करणारी माता, ही एकच व्यक्ती होती, जिच्यावर नियती अवलंबून होती. कैकयी ने तेच केलं, जे नियतीला अपेक्षित होतं. एक लक्षात घ्या, ज्यावेळी एखादी बुद्धिमान व्यक्ती, राजकारण आणि धर्मकारण यामधे जगावेगळी आणि अनपेक्षित भूमिका घेते, त्यावेळी ती पूर्णतः हेतुपुरस्सर घेतली जाते, जाणूनबुजून घेतली जाते. तेच घडवण्यात कैकयी महत्वपूर्ण ठरली आणि तिने युगानुयुगांची बदनामी पत्करून, विधि लिखित घडवून आणलं.
म्हणूनच इतकं होऊनही श्रीराम यांनी कधीही कैकयी ला दोषी मानलं नाही आणि वनवासात निघाल्यापासून तिच्याशी नीट वागण्याची सूचना, विनंती वारंवार केली. अन्यथा प्राणप्रिय पित्याच्या मृत्यूला कारणीभूत कैकयीला क्षमा केली नसती. पण नियती आणि विधीचे विधान यावर पूर्ण विश्वास असलेल्या श्रीरामांना, माता कैकायीच्या वर्तनात व कार्यात कोणतीही विसंगती, चूक, दोष वा प्रमाद वाटला नाही. कारण त्यांचा अंतिम उद्देश रावणवध, हा त्यातून साध्य होत होता.
माझ्या ५९ वा त्यापुढील लेखात किंवा या आधीच्या जानकी पुनः वनवास या लेखमालेमधे सुद्धा कैकयीची हीच मनो भूमिका मी ग्राह्य धरली आहे आणि मांडली आहे.
©® संकल्लना, मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०८/२०२३
श्रीराम जयराम जय जयराम
Comments
Post a Comment