राम अनुज भरत भाग ६६
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
राजकुमार भरत याने आता केलेली आज्ञा ही, प्रत्यक्ष रुपात श्रीराम यांनीच केलेली आज्ञा आहे, याची जाणीव, श्रीराम पादुका प्राप्तीमुळे भ्राता भरत याच्याबद्दल निश्चित धारणा, समस्त अयोध्येच्या ध्यानीमनी, लोचनी मस्तिष्क, हृदय आणि अंतरात्मा, यामध्ये स्थिर झाली होती. कारण परत येऊन, अभिषिक्त होण्यास जरी, प्रभू श्रीराम यांनी, विनम्रपणे नकार दिला असला तरी, पादुका रुपात, राज्य पदीं स्थापित करण्याचा,भ्राता भरत याचा मनोदय, प्रभूंनी अत्यंत हर्षाने,प्रेमभराने,स्वीकृत केलेला असल्याकारणाने भरतासह समस्त राजपरिवार,सारे अयोध्या वासी, कृतार्थ आणि समाधानी होते.
भ्राता भरत याला, यामध्येच आपल्या दुःखाच्या, पापाच्या ओझ्याचं परिमार्जन, दिसत होतं. या कृतार्थ भावातच ही चौदा वर्षे सहज नाही, पण समाधानात निश्चितच जातील. अयोध्या वासी यासाठी आनंदी होते की, प्रभू नाही तरी, निदान त्यांच्या चरण कमलातून प्राप्त झालेल्या, त्यांच्या प्रतीक स्वरूपाच्या, पादुकांची प्राप्ती झाली आणि त्यांची विधिवत स्थापना करून, त्यांच्या नावानेच, राजकुमार भरत, प्रतिनिधी म्हणून राज्य कारभार पाहणार असल्या कारणाने, एकप्रकारे, श्रीरामांचं अस्तित्व पादुकारुपात, अयोध्येच्या निकट, नंदीग्राम इथे असणार आहे.
इकडे चित्रकूट पर्वत सानिध्यात, आपल्या पर्णकुटी बाहेर, विश्राम करत बसलेले श्रीराम हे, राजकुमार भरत याच्या झालेल्या भेटीचा,त्याचा माता कैकयीवर असलेल्या क्रोधाचा आणि त्यामुळे, भरत आणि माता कैकयी, याना झालेल्या मनस्ताप, दुःख, अवहेलना यांच्या विचारात मग्न आहेत. देवी सीता देखील आपल्या विचारात मग्न आहेत. लक्ष्मण या दोघांना अश्या विचारमग्न स्थितीत पाहून, जाणून आहे की, ज्येष्ठ भ्राता श्रीराम आणि माते समान देवी सीता, कोणत्या विचारात मग्न असू शकतील. त्यांना त्याबद्दल लक्ष्मण पृच्छा करतो की,
" हे ज्येष्ठ भ्राताश्री, आपण कोणत्या विचारात मग्न आहात. "
आपल्या विचार शृंखलेतून बाहेर पडत आणि अनुज लक्ष्मण याच्याकडे प्रसन्न मुद्रेने पहात, भ्राता श्रीराम म्हणाले
" हे रघुकुल भूषण लक्ष्मणा, मी अनुज भरताची, माघारी येण्याची इच्छा तर, पूर्ण करू शकलो नाही, पिताश्री महाराज दशरथ यांच्या आज्ञेच्या मर्यादा पालनामुळे. परंतु, त्याला माझ्या चरणातील पादुका, प्रतिनिधी रुपात दिल्यामुळे, माझा भरत, पुढील चौदा वर्षे, त्या पादुकांच्या आधारे, राज्याची सूत्रे हाती घेईल आणि त्या पादुकांमध्ये माझं अस्तित्व पाहिलं.
त्याचप्रमाणे, एक प्रतिनिधी म्हणून अयोध्येचे राज्य सुरळीत पाहिल. या त्याच्या आनंदाने, मलाही, कृतकृत्य झाल्यासारखे वाटत आहे. येथून पुढील काळात, चौदा वर्षे समाप्तीपर्यंत, निदान एक अल्पसे समाधान घेऊन पुढे जाता येईल. माझा. भरत एका मानसिक धक्क्यातून, सावरून, कालपटलावर, अग्रेषित होत राहील. "
यावर देवी सीता म्हणाली.
" आपण कोणत्याही जटिल समस्येवर, सहज उपाय काढून, राज्य, देह, काळ, वचन व आज्ञा यांच्या मर्यादा राखू शकता. ही तशी सहजसाध्य बाब नाही, हे तर नक्कीच. ही आपल्या आत्म्यातील, शुद्धतेची, संयमाची, धैर्याची, स्नेहाची, निश्चलतेची, साध्यता आहे. जी आपल्यातील शक्ती व चेतना यांचेच प्रतीक आहे."
भ्राता लक्ष्मण दोन्हींचे संवाद विनम्र भावात ऐकत असताना, म्हणाला
" होय भ्राताश्री, काकुस्थ श्रीराम, आपण ज्येष्ठ भ्राता भरत याचं, अंततः समाधान करून, मगच त्याला माघारी धाडलत, हे उत्तम झाले. कारण मी खूप लहान पणापासून पाहतो आहे की, आपण त्याला समाधानी करून, मगच संतोष पावता. हेच आपल्या आनंदाचं गुह्य आहे काय."
प्रभू यावर मंद स्मित करून म्हणाले.
" हे सुमित्रा नंदन, स्वतःच्या आनंदाने तोषणे, हा एक नैसर्गिक, नियम आहे. किंवा ती एक सहजानुभुती आहे. पण माणूस म्हणून आपलं वेगळं अस्तित्व, या जगतात, देहाच्या आणि बुद्धीच्याच नव्हे तर मनाच्या जोरावर, दाखवलं गेलं पाहिजे. देहाचा आणि बुद्धीचा आनंद हा अत्यंत स्वाभाविक आनंद आहे.
प्रभू, एकाग्रचित्त ऐकणाऱ्या लक्ष्मणाला, तितक्याच तन्मयतेने पुढे म्हणाले.
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१४/०८/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment