Skip to main content

राम अनुज भरत भाग ७७

राम अनुज भरत भाग ७७

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

प्रदीर्घ काळानंतर इतकी निरव शांतता व जलप्रवाहात विहार करण्याचा आनंद, भरत घेत होता. या शांततेत विचारांचं मंथन सुद्धा आता हळूहळू बाहेरच्या स्तरातून, मनाच्या आतल्या पटलाकडे जात होतं. मनातील वर्तमान आंदोलनं आता स्थिरावण्याची स्थिती येत होती. भाव आता अधिक खोलीतून जाऊन, पटलावर येत होते. किंबहुना, काहीं काळापूर्वी आपण, याचं विचारांच्या प्रवाहात, अविचारीपणाने वागलो, वावरलो का, असा विचार वारंवार मनाच्या वरच्या पातळीवर येत होता.

पण अत्यंत विचारी, बुद्धीमान, ओजस्वी आणि वेद शास्त्र यांचा प्रकांड पंडित असलेला भरत, असा विचारांच्या वादळातून, वहावत जाऊन, अविचारी कृती करण्याचा निर्णय घेणारा नव्हता आणि नाही, हे त्याच्या मनाला जाणवत होतं. परंतु मग आता पर्यंत, काळाचा काही भाग, हा भरत जे काही करून गेला त्याचा भावालेख, मनाच्या पटलावर, असा कसा चितारला गेला असेल, हा विचार भरताच्या मनात येत होता. अत्यंत कुशाग्र बुद्धी असलेला भरत, जवळपास, आपले ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांची अजोड प्रतिकृती होता. 

किंबहुना काही बाबतीत, आपल्या ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या पेक्षा काकणभर पुढेच होता. म्हणूनच, विचारांचा जलप्रवाह, या गंगेच्या जलात उतरल्यावर, त्या गंगेच्या जलाच्या शीतलतेमुळे, शांत झाला आणि मुळातील, अद्वैत भाव जागृत झाला. मधल्या काही दिवसातील द्वैताच्या आंदोलनाचा अर्थ, शोधण्याचा यत्न, भरताचं, मूळ मन करत होतं. परंतु, हे सर्व, काल पुरुषाच्या भाग्य लेखेतील काही अजब अघटीत आहे. म्हणूनच यामधे नक्कीच काहीतरी अलौकिक योग घडणार आहे. असा होरा भरताच्या मनाने बांधला.

कारण, ज्येष्ठ भ्राता श्रीराम या एका अक्षाभोवती फिरणारं, भरताचं जग, विश्वनियंता, इतक्या सहजी एका फटकाऱ्याने विखरून टाकण्याचं धैर्य बाळगणार नाही. कारण कळी काळाला गवसणी घालण्याची ऊर्जा, ओज आणि चेतना ज्यांच्या बाहुत आहे, त्या श्रीराम प्रभूंना, नियती, इतक्या दूर घेऊन गेलीच नसती. भरताच्या उच्च बुद्धीमान व स्वप्रकाशित, आत्मतेजाचा हा प्रकाश, आता पुन्हा जागृत झाला. किंबहुना तो सुप्त झालाच नव्हता.

परंतु नियती कधीकधी, आपल्या भविष्यातील भाग्यकारक ग्रहस्थितीप्रत जाण्यासाठी, सद्य किंवा वर्तमान काळात काही कुयोग घडवून आणते. कारण तरच पुढील उत्तम ग्रहयोग जुळून येऊ शकतात. सारी पाटाच्या खेळात सुद्धा, योग्य घरात जाण्यासाठी सागोटीला (सोंगटी), रिक्त स्थानातून जावेच लागते. याव्यतिरिक्त मार्गातील काही अनावश्यक, सागोटींना सुद्धा, आपले स्थान सोडून, स्थान भ्रष्ट व्हावे लागते. 

हाच नियतीचा युगानुयुगे अव्याहत चालणारा खेळ, यावेळी पुन्हा, समोर आलेला दिसतो. अन्यथा अखंड आणि अविरत सुरू असलेली, रघुकुलाची ही राज्य व्यवस्था, इतक्या सहजी, अस्ताव्यस्त झाली नसती. कारण अनेक शुभयोगाची आणि धैर्यवान, धर्मशील राजांची उज्वल परंपरा लाभलेली ही अयोध्या भूमी आणि राजसिंहासन, अश्याप्रकारे राजाहिन झालं नसतं. इतकी पुण्याई या भूमीत , येथील सिहासनात आणि या राज घराण्याच्या रुधिरात नक्कीच आहे. तरीही हे अतर्क्य घडून आलं त्याअर्थी, नियतीची एखादी अनोखी खेळी सुरू आहे, हे नक्कीच. 

म्हणूनच, ज्येष्ठ भ्राता श्रीराम प्रभू यांनी, इतक्या ठामपणे माझ्या विनंतीला नकार दिला. परंतु या पूर्वापुण्ययीच्या आधारे, पादुका राज्यसिंहासनी, स्थापित करण्यासाठी देण्याची प्रार्थना मान्य करण्याची अनुमती, ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांनी दिली. त्यामूळेच सद्य स्थितीत मन, विचार यांना विनाकारण, अश्वाप्रमाणे, दौडत न नेता, नियतीच्या या भविष्यातील सुत्राला बांधून ठेवून,सर्व इच्छा, आकांशा यांना ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांच्या या दिव्य चरण पादुकांशी वाहून, नित्य प्रभूनाम घेत, पुढील चौदा वर्षे प्रतीक्षा करावी, हेच उत्तम आणि तशीच प्रभू श्रीराम आणि नियती यांची इच्छा असावी. त्याकारणे तसेच करणे श्रेयस्कर होईल.

विचारांच्या आणि गंगेच्या प्रवाहात हरवलेला भरत, जलात विहार करत, पलीकडील किनारी कधी पोचला, त्यालाही कळलं नाही. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२५/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...