श्री गणेशाय नमः
नाम अवतार कलियुगी - १
पुराणात अस सांगितलय की ही संपूर्ण सृष्टि ब्रम्हदेवाच्या कल्पनेतून साकारा आली. अर्थात ब्रम्हदेव स्वतः क्षीरसागरी स्थित महानारायणांच्या नाभितून प्रस्थापित झाले. म्हणजेच हे विश्व महाविष्णुच्या कल्पनेतून आणि संकल्पातून जन्माला आल. स्वतः भगवंताना संपूर्ण सृष्टि निर्माण केल्यानंतर सुद्धा समाधान प्राप्त झाल नव्हतं . काहीतरी कमतरता होती. ती जाणवत होती. तीरासारखी हॄदयात बोचत होती. अपूर्णत्व डाचत होत. हा खेळ भगवंतानी स्वतःत रममाण होण्याचा कंटाळा आला म्हणून म्हणा किंवा हे जग ही भगवंताची छाया आहे म्हणा अथवा भगवंतानी मन रमवण्यासाठी केलेली निर्मिति म्हणून म्हणा पण व्यवस्था तर निर्माण झाली होती.
तरीही उणीव भासत होती. आणि लक्षात येत नव्हतं की काय कमी आहे या सर्व व्यवस्थेत. कल्पनेतूनच निर्माण झालेल्या या जगात मग कल्पनेतून एका सजीव प्राण्याची निर्मिति झाली. अपूर्ण असलेल्या या जगात एक असा सजीव आला जो भगवंताच्या कल्पनेचा गाभा होता. या सजीव प्राण्याची चैतन्यशक्ति स्वयम भगवंतांच्या मूळ शक्तितून स्फूर्ति घेऊन आली. चौर्यान्शी लक्ष रुपात प्रकट झालेला हा जीव जगात संचार करू लागला. काही काळासाठी का होईना पण स्वयम्भू परमेश्वर निवांत झाले.
पण पुन्हा समाधिस्त भगवान क्षीरसागरी अस्वस्थ झाले. आणि यावेळी कल्पनेतून एक असा जीव निर्माण झाला ज्याचा श्रीविष्णुना आत्यंतिक आनंद झाला. पूर्ण आनंदात भगवंतानी आपलीच निर्मिति पुन्हा पुन्हा अवलोकिली आणि मग या निर्मितित आपला स्वतःचा अंश आत्मा स्थापित केला. कर्म पूर्ण केल्याचा आनंद त्याना प्राप्त झाला. ही सर्व प्रक्रिया घडताना , एक विशेष उद्देश त्यांच्यां नजरेत आणि संकल्पात होता. कारण भगवंतांच हे वैशिष्ट्य आहे कोणतीही गोष्ट , संकल्प वा निर्मिति विनाकारण वा विना उद्देश केलेली नाही. याचसाठी त्यानी आता सरते शेवटी निर्माण केलेल्या या सजीव प्राण्यात अशी काही व्यवस्था निर्माण केली की बस उद्देश सफल झाला हा आनंद आणि समाधान प्राप्त झाल. मूळ कल्पना प्रत्यक्ष्य साकार स्वरुपात समोर आली आणि पुन्हा भगवंत क्षीरसागरी समाधिस्थ झाले.
पण अशी काय व्यवस्था निर्माण केली स्वयंसिद्ध महाविष्णुनी की या निर्मितिचे पूर्ण समाधान मिळालं.
अर्थात पाहूया पुढील भागात.
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
०१/१०/२०१७
Comments
Post a Comment