Skip to main content

अध्यात्म विराम १६५

अध्यात्म विराम १६५ 

प्रपंच आणि परमार्थ यावरील आपलं चिंतन पुढे नेताना एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते, ती म्हणजे, विश्व निर्माता, संपूर्ण जगताचा प्रपंच करतो आहे आणि आपण अर्थात मानवाने,मी पणाचा प्रपंच सोडून आत्मतत्वाचा प्रपंच अर्थात परमार्थ साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तवात या उलट आपण करतो. आपण आयुष्यभर देह म्हणजे मी हे गृहीत धरून, त्या भोवती सर्व काही बांधतो, रचतो किंवा निर्माण करतो. पण हे सर्व मायेच्या प्रभावाने घडतं. मायेच्या अधिपत्याखाली, जे समोर आहे, तेच सत्य मानायची सवय, समजायला लागल्यापासून आपल्याला लागते किंवा लावली जाते.

आत्मतत्त्व हे एक चिरंतन सत्य आहे आणि तेच या विश्वाचा खरा आधार आहे. किंबहुना हे तत्वच, या संपूर्ण जगाचा मूलाधार आहे. याच तत्वाच्या शक्तीला, ऊर्जेला, गतीला आणि बलाला प्राप्त करण्यासाठी किंवा जागृत करण्यासाठी, निज तत्वाला बाजूला सारून, खरा मी ओळखण्याची आवश्यकता आहे. हेच अनेक संत, महंत, ज्ञानी, सत्पुरुष यांनी आपल्या जीवनातून जगाला सांगितलं आणि दाखवून दिलं आहे. यासाठी काही साधे सोपे नियम त्यांनी मानवाला घालून दिले आहेत. ज्यांचं पालन केल्यास, आत्महित साधलं जाऊन, मूळ उद्देश साध्य करण्यात आपण मार्गस्थ होऊ.

त्यातील काही आपण पाहूया. मुळात जे भोग आले वा येतील ते आपल्याच पूर्वकर्मानुसार आलेले आहेत, हे आपल्या मनाला पटवून दिलं पाहिजे. भोग व उपभोग हे दोन्ही परिणाम आहेत, फलित आहेत आणि कायम स्वरूपी नाहीत, हे ध्यानात धरावं. म्हणजे दोन्ही काळा नुरूप व योग्य वेळी निघून जाणार आणि त्यांची जागी इतर भोग वा उपभोग घेणार, हे नक्की. यातील काहीही कायमस्वरूपी नसल्यामुळे, आपण मनाने दोन्हींमध्ये गुंतता जामा नये. मन, बुद्धी आणि हृदयस्थ आत्मा हे तिन्ही एका चिरंतन आणि आदी व अंत नसलेल्या सगुण रुपातील निर्गुण परम ईश्वराला समर्पित करावे. 

सगुणातील निर्गुण यासाठी म्हटलं की, मूळ निर्गुण तत्वात सिद्ध असलेल्या परम तत्वाला, आपण कल्पनेत सगुण रुपात आणलं आहे. पण हे कल्पनेने साकारलेलं त्याचं रुपसुद्धा, अंतिम स्वरूप नाही, हे ध्यानात घेतल पाहिजे. आता इथे प्रश्न निर्माण होईल,आपण अनेक रुपात भजतो पूजा अर्चना करतो, अनेक भजन कीर्तन, प्रवचन आदी मधून त्याला साकारतो, तो तसा नाही. मग आपण जे भक्तीभावाने करतो, ते कुठे जातं. किंवा त्याचं काय. यावर असं म्हणता येईल की, आपण प्रेमाने भक्तीने, भावपूर्वक जे साधन, भक्ती करतो, ते जरी बाह्यांगी, त्याच्या सगुण रुपाकडे बघून करत असतो. 

तरीही सर्व मूर्तीत, प्रतिमेत आणि मनातील अंतरंगी वास करत असलेलं, तत्व एकच आणि निर्गुण असल्यामुळे, बाह्यांगी कोणत्याही रुपातील ईश्वराला साक्षी ठेवून केल्याचं फल सर्वांना एकाच अंतिम तत्वाकडून प्राप्त होतं. म्हणजेच ज्याप्रमाणे कोणत्याही नदीत वर्षाऋतूत पडलेलं पाणी अंततः समुद्राला जाऊनच मिळतं, त्या प्रमाणे, कोणत्याही सगुण रुपात भजलेल्या व पुजलेल्या, ईश्वराला अर्पण केलेला भक्तिभाव, अंततः एकाच निर्गुण रुपातील परम ईश्वराला,अर्थात सर्व तत्वांचा आदी, उद्गाता धर्ता, निर्माता असलेल्या परम तत्वातील ईश्वराकडे पोचतो. 

म्हणजे यातून एक बोध होतो तो म्हणजे ईश्वराच्या सगुण रुपातील भक्ती ही एकप्रकारे गंगोत्री अर्थात भक्तीच उगमस्थान आहे, हेच सत्य आहे आणि अंतिम स्थान हे निर्गुण रुपातील तत्वाला भजण्याचं मर्म हे खरं मर्म आहे किंवा प्रपंचाकडून परमार्थाकडे म्हणजेच जीवनाकडून मोक्ष व मुक्ती यांच्याकडे जाण्याचं खरं मर्म आहे. 

यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...