अध्यात्म विराम १६८
ज्याच्या सततच्या उच्चारणाने भवादी सारे ताप, दैन्य दूर होतं आणि प्राणी जन्मजन्माच्या बंधनातून विमुक्त होतो, त्या उच्चारणाला नाम म्हटल जातं. नाम हे मुळातच निर्गुण आणि निराकार आहे. ते अनादी आणि अनंत आहे. याच्या महतीसाठी आणि ती गाण्यासाठी, ती सांगण्यासाठी कित्येकांनी आपले जन्म वेचले आहेत. याच नामाच्या ध्यानात साक्षात श्रीशंकर निमग्न होऊन, समाधिस्थ स्थितीत हजारो वर्ष सहजी ध्यानात असतात. याचं नामाच्या सामर्थ्याने रावणाचे पापांचे पर्वत जळून, रावण देह समाप्ती पश्चात, वैकुंठाला गेला.
नामात निर्गुण तत्व असल्या कारणाने, नाम घेणाऱ्यांना, त्यांच्या वैचारिक, सांपत्तिक, चित्ताची शुद्धता या कसल्याही गुण अवगुणांना न पाहता, ते नाम उचित लाभ प्राप्त करून देते. नाम निर्गुण निराकार असल्याकारणाने निरपेक्ष असतं. त्यामुळे भावातीत असतं. घेणाऱ्याला त्याच्या देहाच्या, बुद्धीच्या, इंद्रियादी जडतत्वांच्या कोणत्याही मर्यादा वा बंधनं यांचं आवरण न पडता, नाम आपलं सर्व कार्य सुलभतेने पार पाडतं. नाम हे सर्वार्थाने परिपूर्ण तत्व असल्यामुळे, नाम घेणाऱ्याच्या सर्व अपूर्णता, ते नाम पूर्ण करून देतं.
निर्गुण तत्वामुळे नाम प्रत्यक्ष ईश्वराच्या निर्गुण रूपाच्या समीप असतं, त्यामुळे या मर्त्य जगतातील, ब्रम्हांडातील कोणत्याही नकारात्मक, वाईट व गैरहेतूने ग्रस्त लहरी त्यांना बाध्य करू शकत नाही. नाम हे सर्व रोगांवरील अक्सिर इलाज आहे. पण या वाक्याचा जरा खोलात जाऊन विचार करूया. आता नाम सर्व रोगांवर आक्सिर इलाज म्हणजे काय, हे समजण्या आधी आपण व्याधी काय त्याचा आधी विचार करूया. भवरोगाची बाधा ही माणसाला मायेच्या प्रभावाने होते.
मानवी देहात ईश्वराने चार मुख्य गोष्टी मूळ स्वरूपात स्थापित करून दिल्या आहेत. त्या चार गोष्टी आहेत, आत्मा, मन, बुद्धी आणि अहंकार. यातील बाकीच्या तीन ज्ञात आहेत. पण अहंकार म्हणजे काय याचा जरा विचार करूया. अहंकार हे अनेक विकार, नकारात्मक गोष्टी, साही शत्रू, त्यांचे परम मित्र, आपल्या मनात येणारे सर्व वाईट विचार, लोभ,मोह, मद मत्सर, दंभ, क्रोध काम आदी सर्व यामधे येतात. पण या सर्वांचा पालनकर्ता आणि मूळ हा अभिमान किंवा अहं असल्यामुळे त्यांना या एका शब्दात एकत्रित करून बांधण्यात आलेलं आहे. याचं अहं चा मायेचा मोह जडण म्हणजे भावरोग जडण.
हा अभिमान आपल्या सर्व भावंडांसह मायेला पाचारण करतो किंवा माया याच्या आकर्षणाने येऊन, मन आणि बुद्धी यांसह देहाला ग्रासून सर्व इप्सित घडवून आणते. ज्यायोगे मायेच्या आवरणापायी माणूस अनेक चुकीची कर्म करून, त्यात बद्ध होती आणि हा साचा सोडवून घेण्यासाठी, मार्ग शोधत पुन्हा पुन्हा भटकत गुंता निर्माण करतो.
आता नाम यामधे काय करतं ते जाणून घेऊ. हाव किंवा हव्यास हा इच्छेला प्रेरित करतात आणि देह बुद्धी मन याना कर्म प्रवृत्त करतात. नाम भवरोग दूर करत याचा अर्थ हा मायेचा पडदा आणि त्याद्वारे इच्छेला नियंत्रित करणारी कार्यशक्ती, नाम योग्य मार्गाला लावत.
म्हणजेच मायेचा अयोग्य कार्यातील भ्रम दूर करून, मनाला, बुद्धीला नियंत्रित, संयत आणि विचार प्रवृत्त बनवतं. म्हणजेच प्रत्येक कार्यातील मनाची प्रेरणा फक्त सकारात्मक कार्याकडे वळवून, अयोग्य व हीन दर्जाची अभिरुची अर्थात आवड, ओढ, इच्छा, संवेदना, भाव, बंध इत्यादी कमी कमी करतं,मानवी इच्छेला सकारात्मक चेतना प्रदान करते.
पण हे कार्य कसं होतं, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment