अध्यात्म विराम १७१
नामाच्या महतीसाठी कित्येक उदाहरणं देता येतील. प्रत्यक्ष भक्त प्रल्हाद, देवर्षी नारद, महर्षी वाल्मिकी, भक्त सूरदास, संत कबीर, संत मीराबाई, महाराष्ट्रातील महान संत परंपरा, विभिषण इत्यादी अनेकानेक दाखले देता येतील. यांनी फक्त ईश्वर नामाच्या स्मरणात आपल्या देहासह आत्म्याचा उद्धार करवून घेतला. पण या सर्वांचं एक समान सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे देहाच्या, संचिताच्या आणि प्रारब्धात आलेल्या कोणत्याही भोगाला, त्यांनी अव्हेरलं नाही. आलेल्या भोगात त्यांनी कधीही सूट, कपात वा पळवाट मागितली नाही. त्यांनी प्रपंचातील अनेक अकल्पनीय व अपरिमित दुःख, भोग सहन करताना, कोणतीही पक्रार केली नाही.
किंबहुना आपल्या दुःखाच्या भोगाच्या अस्तित्वामुळे आपल्याला ईश्वरी नामाच्या साधनेचं स्मरण होतं आणि आपण त्या दुःख भोग यांमुळे हे ईश्वरी स्मरण अखंड करू शकतो,याची जाणीव त्यांच्या मनात नित्य असायची. किंबहुना ते दुःख हाच आपल्या साधनेचा प्राण आहे, हीच त्यांची नित्य भावना होती. महाभारतात आपण जाणतो की, कुंती मातेने, श्री कृष्णाकडे अपार दुःख आणि भोग मागितले. कारण त्याच काळात, या दुःख व भोग यांमुळे, हे श्रीकृष्णा तुझं स्मरण करण्याची सद्बुद्धी आमच्या मधे जागृत असते.
नामाच्या स्मरणांचा मुख्य फायदा हा असावा किंवा असला पाहिजे की, देहाची, अहं ची, लोभ क्रोध मोह काम यांच्या भुकेची जाणीव हळूहळू कमी झाली पाहिजे. पूर्ण नष्ट होणं हे ईश्वरी कृपेची अत्युच्च परिणती समजावी आता ही भुकेची जाणिव, सर्व ऐश्वर्य भोगून जागृत झाली तर ते अत्यंत नैसर्गिक आहे असं समजावं. पण असं ऐश्वर्य समोर असूनही, त्याबद्दल उदासीनता असणं हे परम भाग्याचं लक्षण समजावं. अश्या प्रकारच्या उच्च भावनांची प्राप्ती होण्यासाठी, आधी त्या नामाचं स्मरण करण्याची बुध्दी, जाणीव आणि उर्मी जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे.
ही जागृती होणं किंवा तशी बुद्धी होण्यासाठी व जाणीव जागृत होण्यासाठी, त्याच ईश्वराची कृपा होणं क्रमप्राप्त आहे. पण हा योग किंवा हे सद्भाग्य जुळून येण्यासाठी, ईश्वरी नामाच्या प्रभाव, चैतन्य, ऊर्जा आणि शक्ती यावर विश्वास व श्रद्धा असावी लागते. असा विश्वास व श्रद्धा येण्यासाठी, त्या नामाचं महत्व, त्याच्या परिणामांची आणि मनातून त्यांच्याबद्दल विश्वास वाटण्याची गरज आहे. पण हे देखील प्रारब्ध योगात आपण लिहिलेलं असणं आवश्यक आहे. कारण सर्व कर्मफल निष्पन्न असल्यामुळे, तशी बुद्धी तेंव्हाच जागृत होईल, जेंव्हा आपण क्षण एक क्षण तरी त्याचा नुसता विचार तरी मनात करायला हवा.
या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीची आठवण केल्याशिवाय पुढे जाणं चूक ठरेल. त्या ओवीत माऊलींनी स्पष्ट शब्दात सांगून ठेवलं आहे की, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधीयेल्या. माऊली, प्रत्यक्ष ईश्वर असल्यामुळे, जगताच्या, मानवाच्या उद्धाराचा राजमार्ग किती सहज आणि सोप्पा आहे, हे त्यांनी सांगून ठेवलं आहे. कारण प्रत्यक्ष ईश्वरच हे सांगू शकतो. फक्त ईश्वरच आपल्याकडे येण्याचा सर्वात सोप्पा मार्ग, जाणतो आणि त्याबद्दल तितक्याच अधिकार वाणीने सांगू शकतो.
प्रत्येक माणसाला, इश्वराकडे जाण्याचा मार्ग माहीत असणं किंवा जाणणं आवश्यक आहे. नव्हे तो प्रत्येक जीवाचा अधिकारच आहे. पण जीव मायेच्या बंधनात, प्रारब्धाच्या भोवऱ्यात अडकून पथ भ्रष्ट होतो आणि अनंत जन्मापर्यंत ईश्वराच्या प्राप्तीचा मार्ग त्याला सापडत नाही किंवा त्याबद्दल विचार करण्यासाठी तशी बुद्धी वा जाणीव देखील त्याला होत नाही. अश्या परिस्थितीत योगयाग, नवाविधा भक्तीचे मार्ग, ध्यान धारणा, समाधी सारखे अशक्यप्राय सिद्धी प्राप्तीचे कष्ट सर्वसामान्य जीवाला जमण अशक्य आहे.
याचसाठी माऊलींनी ह्या ओवीतून हे का सांगितलं आणि ते फक्त क्षणभर ईश्वरा पुढे उभ राहून कसं साध्य होईल, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment