अध्यात्म विराम १६३
काल आपण पाहिलं त्याप्रमाणे, मायेच्या, वासनेच्या, इच्छांच्या खेळाच्या आधीन राहून केलेल्या कर्मात, एक फल तात्पुरतं प्राप्त होतं किंवा चाखायला मिळतं. पण दुसरं फल हे या कर्माचा खरा परिणाम स्वरूप, नंतर प्राप्त होतं,ते आपलं खरं संचित असतं किंवा आहे.उदाहरणार्थ, जर आपण योग्य त्या वयामध्ये आपला आहार, विहार व व्यायाम यावर नीट लक्ष ठेवून कार्य केलं नाही,तर तात्पुरता आनंद, त्या वयात, सुख, चैन, खाण्यापिण्याची मौज इत्यादी रुपात आणि माध्यमातून, नक्कीच प्राप्त होईल. पण नंतरच्या वयात याचा परिणाम, मधुमेह, शारीरिक कमजोरी, अवयवांची शिथिलता, हालचालीत जाणवणारं वय आणि इतर अनेक व्याधी, हे खरं कर्मफल असेल.
म्हणजेच बहुतेक प्रकारच्या तात्पुरता, क्षणिक आनंद आणि सुख देणाऱ्या क्षणांच्या मागे पुढे, अनेक भोग हे मुख्य कर्मफल रुपात येतात आणि ते आपणच लिहिलेले असतात,हे तर आता लक्षात आलं असेल.म्हणजे मायेच्या आधीन राहून,केलेल्या कर्मातून अंतिम भोग प्राप्त होतात याचाच दुसरा अर्थ असा की, मायेच्या आधीन राहून, कर्म करताना आज प्राप्त होणारे उपभोग, नंतरच्या कायम स्वरूपी किंवा दुःखात्मक, नकारात्मक भोगाना पाचारण करते. हे आमंत्रण आपणच करतो.
आता या चक्राला भेदणारा उपाय काय किंवा काय केल्याने, हे द्वीकर्मफल टाळता येईल. मुळात ही द्वीकर्मफल प्रक्रिया आणि तत्व जर पटलं असेल तर, आपण पुढचा विचार करूया. ही द्वीकर्मफल परिणती सर्वच कर्माच्या बाबत असते का. याच्या उत्तरात असं म्हणता येईल की, मायेच्या आधीन राहून, उपभोग्य काही प्राप्त करण्याच्या उद्देशाने किंवा काही गैरकर्म करण्याच्या मिषाने व त्वरित सुखाची प्राप्ती व्हावी, हे मनात योजून केलेल्या कोणत्याही कर्माला हा द्वीकर्मफल सिद्धांत लागू होतो. तात्विक अर्थाने किंवा तर्क शास्त्राने, आज जे इंद्रिय, विषय, वासना, काम क्रोध, मद, मत्सर, असूया, द्वेष, दंभ, अहंकार, हिंसा, असत्य, कुपथ्य, या प्रेरणांनी आणि राजसी व तामसी गुण युक्त होऊन केलेल्या कर्माने प्राप्त झालेले सुखमय, आनंदमय, मोहमय, लोभमय क्षण हे या द्वीकर्मफल सिद्धांतात येतात.
इंद्रिय सुख, विषयसुख, वासनांचा आनंद प्राप्त व्हावा या इच्छेने केलेली कर्मे, ही कोणत्याही मनुष्य प्राण्याला, अंततः भोग, दुःख व जन्म मरणादी भोग प्राप्त करून देतात. म्हणजे अंततः जे दुःखमय आहे, ते क्षणिक आनंद देते. मग तरीही मानवी मन यामागे का जाते, हा युगानयुगे अनुत्तरित प्रश्न आहे. पण या मायेपाठी माणसाने धावू नये आणि क्षणिक सुखाचा मोह आणि त्यायोगे क्षणिक फल प्राप्ती टाळावी, यासाठी अनेकांनी अनेक प्रकारांनी प्रयत्न केले. अनेक संत महंत, सद्गुरू, साधू यांनी या साठी आपलं पूर्ण जीवन खर्च करून, आदर्श निर्माण करून, ईश्वरी भक्तीची, सेवेची, साधनेची, योगाची जगण्याची पद्धती दाखवून, अनेकांना या मार्गात येण्यासाठी उद्युक्त केलं आहे.
त्यासाठी संसार, प्रपंच व नित्य जीवन कर्तव्य त्यागायची किंवा प्रापंचिक जबाबदारी सोडून द्यायची गरज नाही, हे सांगून व काहींनी प्रत्यक्ष जगण्यातून दाखवून दिलं आहे. अनेक संत महंत यांनी पूर्ण प्रपंचं करून, आपली नित्य कर्तव्य पार पाडूनही, ईश्वरी नामाच्या स्मरणाच्या माध्यमा तून, अनेक गोष्टी शिकवल्या व दाखवून दिल्या आहेत. उदाहरणार्थ आपण कर्तव्य करताना, फक्त आणि फक्त, ईश्वर स्मरणात जर तेच कर्तव्य पार पाडत गेलं, तर नक्कीच हा द्वीकर्मफल चक्राचा खेळ थांबवून, मायेच्या बंधनातून माणूस पार होऊ शकतो.
याचं मुद्द्यावर उद्याच्या भागात पुढे चिंतन सुरू ठेवू, तोपर्यंत त्या ईश्वराची करुणा आणि कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment