Skip to main content

अध्यात्म विराम १५५

अध्यात्म विराम १५५

मृत्युसमयी ही उपरती येऊन आणि पस्तावून काहीही उपयोग नसतो. कारण जे घडायचं ते कर्म घडून गेलेलं असतं. नंतर फक्त मानसिक त्रास आणि मरणांती वेदना, इतकचं हाती उरतं. या सर्वांच्या मागे असते ती देहाची उच्च भावना आणि त्यापोटी घडणारी अनेकानेक कर्म. मुळातच आपण हे जाणतो की, फक्त देह असलेल्यांना कामना करून, त्या पूर्ण करून घेण्याची क्षमता आणि उपलब्धी ईश्वराने साध्य करून दिलेली आहे. एकदा देह सोडला की, आत्मतत्वाला मरणाच्या समयी आलेली जागृती, तीव्र होते. किंबहुना त्याच समयी आत्मा जागृत होतो. कारण आता त्याला हा देह सोडायची वेळ आलेली असते.

गर्भात असताना जो सोहम जाणिवेत असतो,ज्ञात असतो तो जन्मापश्चात कोहम् मधे परिवर्तित होतो. हाच कोहम ते सोहम चा प्रवास म्हणजे पारमार्थिक जीवन आणि कोहम मधून कोहम मधेच व्यतीत झालेलं जीवन म्हणजे प्रपंच.हीच जागृती मृत्यू समयी, अनेकांना होते. अनेकांना यासाठी म्हटल की प्रापंचिक आयुष्यात कुठे तरी काही तरी प्रभू नामाचं कर्म, हातून थोडफार जरी झालं असेल, तरच ही जाणीव निदान मृत्यूच्या समयी जागृत होण्याची हरिकृपा घडून येते वा येऊ शकते. पण ज्यांनी संपूर्ण आयुष्य फक्त वासनामय, अंधःकारमय, भ्रष्ट, अपवित्र आणि नीचतंम आयुष्य व्यतीत केलं आहे, त्यांना ही जागृती मरण्याच्या समयाला सुद्धा प्राप्त होत नाही.

प्राप्त होत नाही, हे मुद्दाम म्हटल मी, कारण अशी जाणीव जागृत होणं हे सुद्धा हरीच्या, ईश्वराच्या आणि सद्गुरूंच्या अमर्याद कृपेची परिणती आहे, हे नक्कीच. हीच कृपा प्राप्त व्हावी, यासाठी आयुष्यात कधीतरी, कुठेतरी, काहीं तरी पुण्य जोडणं अत्यंत महत्वाचं आहे. हे पुण्य ईश्वरी नाम, योगयाग, यज्ञ पूजा,अर्चना, दानधर्म इत्यादी अनेक मार्गातून एखाद्या वा अनेक मार्गांनी हे, देहात प्राण असे पर्यंत करणं क्रमप्राप्त आहे. प्राण असेपर्यंत म्हणजे अर्थातच श्वास असेपर्यंत. आता श्वास असे पर्यंत म्हणजे अंत समयी, मरणाच्या समयी सुद्धा यातील कोणतं पुण्यकर्म आहे, जे आपण जोडू शकतो. 

तर ते म्हणजे ईश्वरी नाम आणि ईश्वरीय वासनांचे व कामनांचे चिंतन करण्याचं साधन करणे. यात दोन मुद्दे येतात. एक म्हणजे मरण समयाला पुण्य जोडण्याची किमया साधणं आणि त्यासाठी ईश्वरीय वासना आणि कामना यांचं चिंतन करणं. मुळात आपण पुण्य जोडणं का म्हणतो, हे आधी समजून घेऊया, म्हणजे त्यानंतर पुढे जायला सुलभ जाईल. आपण आयुष्यभर इतर सर्व वासना, कामना यांच्यामधे रत असतो. तिथे मुद्दाम काही जोडून घ्यावे लागत नाही. तर कोहम स्थितीत मनाचा तो स्थायीभाव असतो.त्यामुळे मनच वासना, कामना याना स्वतःला जोडून घेत घेत, देहाला त्या कर्मात रत करते, गुंगवून टाकते. कारण गरजा जरी देहाच्या असल्या तरी, त्यांना जागृती आणि मूर्त रूप मनाच्या माध्यमातून प्राप्त होतं. 

वासना व कामना म्हणजे फक्त वाईट हा अर्थ आपल्या मनाने आपल्या जाणिवांमधे भरून ठेवलेला आहे. पण शुद्ध मनाच्या शुद्ध भावना, वासना व कामना सुद्धा असतात ही या नाण्याची दुसरी बाजू आहे. सकारात्मक, सत्कर्माच्या, सद्वृत्तीच्या,ईश्वरीय ओढीच्या वासना व कामना, या दुसऱ्या बाजूत येतात. पण मनाचा नैसर्गिक ओढा, हा पहिल्या बाजूकडे असतो. म्हणून तो वेगळा जोडावा लागत नाही. पण दुसऱ्या बाजूच्या, ईश्वरीय, सद्भावनेच्या वासना व कामना मुद्दाम मनाकडे जोडाव्या लागतात. जिथे हे कार्य मनाची शुद्ध आणि सात्विक बाजू करते आणि इथे आत्म्याची जागृती हे कार्य घडवून घेते. 

जोडण्याचा मुद्दा ध्यानात आला असेल तर, उद्याच्या भागात दोन्ही बाजू, एक मरण समयाला पुण्य जोडणं आणि ईश्वरीय वासनांच चिंतन करणं, हे उद्या जाणून घेऊया 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...