अध्यात्म विराम १६४
प्रापंचिक व पारमार्थिक असा भेद खरतर करण्याची आवश्यकता नाही. याचं कारण, मुळात विधात्याने माणूस घडवताना आणि आत्मांश त्यात स्थपित करून, मनाची व्यवस्था करताना, हा प्राणी संसार, प्रपंच करेल किंवा प्रपंचातून हा परमार्थाकडे वळवावा लागेल अशी काही योजना डोक्यात ठेवली नसावी. पण मायेचा फेरा आणि त्यायोगे शत्रूंचा घेरा यामधे माणूस अनेक प्रकारचे प्रयोग, उद्योग, करणार. त्यामधे प्रपंच हा एक उद्योग असणार, याची पूर्ण कल्पना, विधात्याला होती. मुख्य म्हणजे प्रपंच हा फक्त विवाहादी करून, केलेला प्रपंच असा संकुचित अर्थ, इथे अभिप्रेत नाही.
तर मठादी व्याप वाढवून सन्यस्त माणूस सुद्धा अनेक व्याप ओढवून घेणार, हे विधाता जाणून होता. म्हणूनच अनेक प्रकारच्या व्यापात मग्न, मानवाला, त्या त्या क्षेत्रातून, व्यापातून सोयीस्कर व सुलभ अशी ईश्वरा समीप जाण्याची सोय व त्या मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा मिळत राहण्यासाठी, नवविधा भक्ती मार्ग योजून, त्या पैकी एकाचा तरी अवलंब करून, माणूस ईश्वराच्या वाटेवर काहीतरी प्रगती करू शकेल, हा त्यामागे उद्देश होता.
प्रपंच आणि परमार्थ याचा व्यापक अर्थ असा आहे की, मायेच्या सामर्थ्याने लिप्त माणूस जे करेल तो प्रपंच आणि त्या मायेच्या जाळ्यातून, बाहेर पडण्या साठी, जे काही करेल तो परमार्थ असा सहज, सोप्पा व सुटसुटीत अर्थ याचा आहे. जीवन जगण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे प्रपंच करणे आणि त्या जगण्याला ईश्वर प्राप्तीसाठी सुसज्जित व कृतार्थ करणे म्हणजे परमार्थ. आता यातून पुढे आलेला अर्थ म्हणजे, मी ज्यावेळी माझ्या स्वतःसाठी अर्थात देहासाठी जगतो, तो झाला प्रपंच आणि माझ्यातील आत्मतत्त्व असलेल्या मी या व्यापक मी ला शोधणे, म्हणजे परमार्थ होय.
म्हणजे भौतिक मी भोवती फिरतो तो प्रपंच आणि सोहम भावातीत असलेल्या शुद्ध, सात्विक आत्मारुपी मीच्या शोधार्थ केलेला प्रवास म्हणजे परमार्थ. हा पारमार्थिक शोध प्रवास अंततः शुद्ध मनाच्या मार्गाने,शुद्ध आत्म्याच्या द्वारी येऊन, ईश्वराच्या, मोक्षाच्या व कर्मविहिन होण्या पर्यंत होतो. म्हणजेच मायेच्या आधीन राहून केलेलं कर्म अर्थात प्रपंच झाला आणि तेच मन, तीच जाणीव ईश्वराच्या आधीन राहून, कर्म करणं म्हणजे परमार्थ करणे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की, जीवनातील प्रपंचाचा सहज सुलभ अर्थ, मायेच्या माध्यमातून सापडणं हा झाला प्रपंच
पण त्या जगण्याचा,जीवन प्राप्तीचा,ईश्वराच्या अस्तित्वाचा, देहात येण्याचा,, जाणिवांच्या प्राप्तीचा खरा अर्थ उलगडत जाणं म्हणजे परमार्थ साधणं. या सर्व प्रवासात अनेकानेक जन्म, काळाच्या परिघाची अनेक वर्तुळ पार होतात. संचीतांच्या गाठी सैल न होता, अजून घट्ट होत जातात. प्रपंच ते परमार्थ आणि परमार्थ ते ईश्वर प्राप्ती, या मधे अनेक टप्पे लागतात.
मुळात मायेच्या पडद्याला पार करण्याची बुद्धी होणं, किंवा मायेचा खेळ समजणं, त्यानुसार काया, वाचा, मन व बुद्धी या चारही मार्गांनी कर्म घडण्यात अमुलाग्र बदल घडण, ही खूप मोठी प्रक्रिया आहे. जन्मोजन्मीची कर्माची वाटचाल आणि एखाद्या जन्मात घडलेली ईश्वर सेवा, यांचा ताळमेळ बसवणं, ही साधी गोष्ट नाही आणि यातून पुढे जाणं हे सहजसाध्य सुद्धा नाही. यावरच आपल पुढचं चिंतन सुरू ठेवू.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment