अध्यात्म विराम १५६
वासनांचं विश्व हे मनाच्या खोल कप्प्यात दडलेलं असतं. त्यातून जी वासना, कामना मनाच्या पृष्ठभागावर येईल, ती आपला हेतू साध्य करण्यासाठी, पूर्ण क्षमतेने, देह, काया, वाचा व बुद्धी या चारही साधनाना कार्याला लावते. साध्य करणे हे मनाचं ध्येय असत व त्यासाठी आपल्या हातात असलेल्या सर्व साधनांची आणि प्रयत्नांची परा काष्ठा करायला चारही साधनांचा मुक्त वापर मन करतं. यात मनाला प्राप्त होतं ते समाधान, आनंद. हे समाधान आणि आनंद अनेक प्रकारचे असतात किंवा असू शकतात. यामधे प्राप्त समाधान व आनंद हा वासनांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे.
म्हणजे वासना ही नैसर्गिक आणि नियंत्रित असेल, तर प्राप्त समाधान व आनंद हे संयत असतात आणि ते वासनांना शांत केल्यावर, तृप्त होतात. ही संयत वासना भोगण्याची वृत्ती माणसाच्या कर्मगतीशी निगडित असते. म्हणजे उपभोगांची प्रवृत्ती जास्त असेल तर,त्याव्यक्तीच्या भविष्यात दुःख आणि भोग लिहिलेले आहेत, हे नक्की. कारण अती वासना व कामना या अंती दुःखाला आमंत्रण देतात, हे नक्की. म्हणजे मग आपण दुःख भोगलं की, आपणच विचार करतो की, मी काय पाप केलं होतं. जर संचितात कर्मफल गती खडतर असेल, तर आपण वासना व कामना यांच्या तीव्रतेला सहजी नियंत्रित करू शकत नाही.
म्हणजे आपण एकप्रकारे दुःख भोग याना आमंत्रित करतो, असच यातून दिसतं. त्यांना परतवून लावण्याची क्षमता आपल्यात नाही. सर्वसामान्य जीव हा माया, लोभ, संचित, वासना व कामना यांच्या हिंदोळ्यावर आपली कर्मगती पुढे पुढे नेत असतो. आता हा सर्व डोलारा फक्त आणि फक्त आपल्या कर्माच्या जीवावर पुढे न्यायचं म्हटलं तर अनेक जन्मांची तयारी करावी लागते. तशी ती सर्वसामान्यपणे केलीच जाते.कारण बहुतांश जीवांना ज्ञातच नसतं की, हा कितवा जन्म आणि असे अजून किती जन्म आहेत.कारण आपल्या संचिताचा हिशोब कोणीही ठेवत नाही.
दुःख भोग आले की, आपल्या प्रारब्धाला नावं ठेवून, पुन्हा चांगल्या सुखाच्या दिवसांकडे डोळे लावून बसणं, हे सर्वसामान्य जीवाच आयुष्य असतं. अश्या आयुष्यात भोगाकडून ईश्वराकडे असा विचार सुचायला प्रारब्धात आणि वर्तमान कर्मात काही पुण्य जोडलेलं असणं अत्यंत जरुरी आहे. अन्यथा साध्या देवाच्या आठवणीने बसल्या जागी नमस्कार करायला सुद्धा सुचणं भाग्याचं लक्षण आहे. कारण आपलं देहात येणं आणि देहातून जाणं जिथे ईश्वरी कृपेचा परिणाम आहे, हे माहीत असताना सुद्धा आपण अहं आणि ग यांनधे स्वतःला हरवून मोकळे होतो.
ज्याने सर्व जग निर्मिलेलं आहे, त्यालाच आपण तू कोण हे विचारून त्याच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करतो. तरीही तो आपल्या आयुष्यात कोणतीही दखल देत नाही आणि सृष्टीच्या नियमांना स्वतः कोणतीही बाधा आणत नाही वा येऊ देत नाही.
परावच आपण पाहिलं की, परम शुद्ध अंश असलेल्या आत्म्याला, ऋणा च्या माध्यमातून देह पुरवून, त्या देहाच्या सहाय्यानेच त्या ईश्वराला प्राप्त करण्याचा एक अवघड टास्क ईश्वराने आपल्याला बांधून दिलेला आहे. पण आपण जन्माच्या पहिल्या क्षणापासून ते टास्क विसरलो आहोत. म्हणूनच मरणाच्या समयाला ईश्वर जोडणं आणि वासनांच्या या पसाऱ्यात ईश्वरी वासना कशा काय जोपासता येतील, यावर उद्या विचार करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment