अध्यात्म विराम १५७
देहात येताना सोहम जाणणारा आत्मा देहात आल्या पश्चात कोहमच्या नादात जगात हरवून जातो. कधी या जन्मी केलेल्या कधी या जन्मात न केलेल्या कर्मांची फळं भोगता भोगता, संसाराच्या वाटेवर, आयुष्याच्या व वयाच्या तिसऱ्या आणि महत्वाच्या अंकात प्रवेश करतो आणि पुढचं चित्र दिसायला लागतं आणि प्रपंचातून निवृत्त झालो म्हणून ईश्वराच्या वाटेवर लागतो. म्हणजे इथे देहाच्या, मनाच्या वासना, कामना शमल्यामुळे, ईश्वराच्या स्मरणाकडे वळतो अश्यातला अजिबात भाग नाही. पण आता देहाची साथ नसल्यामुळे, मनातील काही वासना व कामना आता शमतील याची शाश्वती नसल्याने, सर्व सामान्यतः ईश्वराच्या स्मरण मार्गाकडे वळतो.
हे कटू वाटलं तरी निर्विवाद सत्य आहे. फार थोडे असतात, जे फार आधीपासून या मार्गाचा निदान विचार करतात आणि त्यात फार थोडे, प्रत्यक्ष ईश्वरी कर्म करतात. किंवा काही थोडेच असतात, जे खरच मनाने निवृत्त होऊन मग, या मार्गाकडे वळतात. यामध्ये ईश्वरी कृपेची प्रेरणा असतेच यात शंकाच नाही कारण जन्माला येताना ईश्वराने दिलेला टास्क लक्षात राहणं, हे असीम कृपेचं लक्षण आहे. अर्थात यासाठीची तयारी किंवा पार्श्वभूमी मागील काही जन्मात केलेली असावी लागते. तरच या जन्मात त्याची आठवण मनात दृढ राहते आणि त्याप्रमाणे योग्य कर्म घडते. पण... आणि हा पण खूपच महत्वाचा ठरतो.
कारण ईश्वरी वासनांची बीजं, जी पहिल्या जन्मात पेरलेली असतात ती, आत्मा परम लोकांतून ब्रम्हलोका तून आणि तिथून भुलोकात येतो तेंव्हा विरतात. तेंव्हा मार्गात माया आणि तिचा खेळ, त्या जीवाला, उन्नत श्रेणी वरून नीचतम श्रेणीत आणून सोडतात. इथेच खरी चुकांची सुरुवात होते. या चुका साध्या चुका ते घोडचूका ते अक्षम्य अपराध इथपर्यंत जीवाची अधोगती करतात. वास्तविक आत्मा स्वतः मूळ रुपात शुद्धच असतो. पण त्यावर कर्माच्या, गर्वाच्या, लोभाच्या, मत्सराच्या, अज्ञानाच्या काजळीची पुटच्या पुट चढतात आणि तोच शुद्ध आत्मा, अशुद्ध होतो आणि या सर्व पसाऱ्यात स्वत्व हरवून बसतो.
हे स्वत्व, शुद्धता प्राप्त करण्याचा मार्ग फक्त आणि फक्त, भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग, याग, दान धर्म या पुण्य कार्यातून जातो. म्हणून जोपर्यंत जीव, या मार्गाकडे जाण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत ती काजळी निघण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आता या मार्गाचा विचार सुद्धा मनात येण्याचा जिथे प्रश्न निर्माण होत नाही, तिथे तो ईश्वरी वासनांचा मार्ग जोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा योग साधण्याची बुद्धी, समय, संधी आणि योग, या चारही गोष्टी जुळून येतात, जर आपल्या पूर्वायुष्यात किंवा पूर्व जन्मात कधीही आपण नवविधा भक्तिच्या कोणत्याही एका पायरीवर कधीतरी काही क्षण जरी उभे राहिलेले असू, तरच.
म्हणूनच संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी म्हटलंय, देवाचीये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या.यावर सुद्धा उद्या चर्चा करूया. कारण बुद्धी असेल तर समय नसतो, समय असेल तर बुद्धी होत नाही, हे दोन्ही असेल तर संधी मिळत नाही आणि हे तीनही असेल तर योग येत नाही. म्हणून या चारही गोष्टी जुळण्यासाठी आपण कधी तरी काहीतरी पुण्य जोडणं गरजेचं आहे. अगदी, ईश्वरी नामाच,कार्याचं,थोडतरी श्रवण घडलेलं असेल तर, पुढील पायरीवर स्वतः सद्गुरू वा ईश्वर नेण्यासाठी योजना घडवून आणतात.
याचाच बोध देणारी एक लघुकथा आपण उद्याच्या भागात चिंतनात घेऊन, हाच विषय अजून पुढे नेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment