Skip to main content

अध्यात्म विराम १६२

अध्यात्म विराम १६२
 
आपली कर्मगती ही येणाऱ्या फलानुसर होते की आपल्या कर्मानुसार फलप्राप्ती घडते, हा एक प्रश्न आहे. जो एक गहन प्रश्न आहे. याचा जरा विचार करूया. आत्मा जेंव्हा अनंताकडून या ब्रम्हांडात येतो, त्यावेळी त्याला मायेच्या आधीन होऊनच गर्भवास घ्यावा लागतो. कारण माया ही सर्वथा गैर किंवा योग्य नसते. किंबहुना ती देह, बुद्धी व मन यांच्यात सर्व प्रकारच्या कामना, वासना, इच्छा जागृत करते. त्याला फलाषा म्हणता येईल. म्हणजे अमक्या प्रकारच्या फळाची इच्छा किंवा आशा निर्माण करून देणं, हे मायेचं काम. त्यानुसार प्रेरणा घेऊन, त्यासाठी अपेक्षित कर्म करणं, हे देह, बुद्धी व मन यांचं कार्य आहे. 

मायेच्या सहाय्याने आधी मन उद्दिपित होतं. त्यातून निर्माण होणाऱ्या इच्छा या वासना व कामना यांमध्ये परिवर्तित होतात. जे फलप्राप्त करण्याची इच्छा, वासना मायेने जागृत केली असेल, त्याबद्दलच कर्म घडतं. अर्थात कर्मानुसार फलप्राप्ती हा एक भास असतो, जो क्षणिक सुख व दुःख यांचा लाभ वा हानी घडवून आणतो. पण अंततः जे फल प्राप्त होतं, ते मायेच्या आधीन राहून मानवाने केलेल्या कर्माची परिणती किंवा परिणाम असतो पण ते कर्म मानवाने माये आधीन केलेलं असूनही, माया त्यापासून पूर्णतः अलग असते किंवा अलग राहते. उदाहरणार्थ एखाद्या कामिनीची इच्छा मनात जागृत झाल्यानंतर, तिला प्राप्त करण्याची ओढ जागृत होते. 

त्यानुसार कर्म घडतं आणि तिची प्राप्ती होऊ सुद्धा शकते. पण हीच प्राप्ती योग्य मार्गाने असेल तर, मनाला संतोष प्राप्त होतो. त्याला रीतसर प्रपंच असं नामाभिधान जगाने दिलेलं आहे. पण जर ही प्राप्ती गैर मार्गाने वा वाम मार्गाने घडली असेल तर मात्र, याला व्यभिचार असं नाम जगाने, शास्त्राने दिलेलं आहे. आता ही प्राप्ती प्रापंचिक असेल तर प्रापंचिक लाभ व हानी प्राप्त होते आणित्याची कर्मानुसार सांचीतात भर पडते. पण ही व्यभिचारी प्राप्ती असेल तर मात्र क्षणिक सुखाची प्राप्ती होईलही या प्रापंचिक किंवा व्यभिचारी, मिळालेल्या सुख दुःखाला मूळ फल म्हणता येईल. 

पण त्यातून सांचितात जमा होणारी पूंजी किंवा जोखीम हे खरं फल असतं, हे यातून सिद्ध होतं. म्हणजेच इच्छित फल आणि अंतिम फल अशी दोन भागात, मायेआधीन घडलेल्या सर्वच कर्मांची विभागणी करता येईल. अर्थात या चिंतनातून प्राप्त नवीन माहिती ही की, कर्मफळाची मुख्यतः दोन अंग असतात. इच्छित फल आणि अंतिम कर्मफल. मायेच्या आधीन राहून, निर्माण इच्छेनुसार वासनेतून मिळालेलं फल आणि त्या कर्मातून निर्माण झालेलं अंतिम फल. आता तात्पुरत्या प्राप्त झालेल्या फळाने मानव आनंदी किंवा दुःखी होतो. पण अंतिम फल प्राप्ती ही कधी समोर येईल, हे संचितानुसार ठरतं आणि खरी मेख इथेच असते.

आपण क्षणिक प्राप्त फलानुसार, आपली मानसिक भूमिका बनवतो, पण ज्यावेळी अंतिम फल समोर येतं, त्यावेळी त्याची संगती मूळ कर्माशी जोडता येत नसल्या मुळे, आपण भोगांनी व्यथित होतो किंवा उपभोगांनी हर्षित होतो. यातून लक्षात येणारी गोष्ट म्हणजे संगती जोडता न येणारे भोग किंवा उपभोग हे मायेच्या आधीन राहून,आपणच केलेल्या आधीच्या कोणत्या तरी कर्माचं फलस्वरुप असतं, हे तर सुनिश्चित आहे. 

पण आता हे ध्यानात आल्यानंतर, निदान आपले भोग आणि उपभोग हे आपणच आधीच्या केलेल्या कर्माचा परिणाम आहे, हे लक्षात आल्यावर येणारी आपली प्रतिक्रिया, ही खूप वेगळी आणि संयत असणार किंवा असावी. हीच गोष्ट आपल्याला साधू संत सज्जन युगानु युगे सांगत आहेत. मायेच्या याचं कर्तृत्वावर आणि आपल्या उद्दिपित वासना चक्रावर पुढील चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत मायेचा निर्माता आणि मायेच्या पार असलेल्या ईश्वरी नामाचा जप करतच राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...