Skip to main content

अध्यात्म विराम १५४

अध्यात्म विराम १५४

काल आपण खूप महत्वाचं चिंतन केलं.माझ्या आता पर्यंतच्या लेखनातील सर्वोत्कृष्ट चिंतन, कालच्या भागात घडलं. अर्थातच ही माझ्या सद्गुरूंची माझावर झालेली अनन्य कृपा आहे, हे निर्विवाद. आज त्याच विषयाला पुढे नेऊया. ऋण रुपात देहप्राप्ती ही संकल्पना खरतर पचनी पडणं पहिलं गरजेचं आहे.ते पटल्यावर,सनातन धर्मातील दहन विधीच्या शास्त्रोक्त, वैज्ञानिक आणि पारमार्थिक अश्या तीनही उद्देशांची पूर्तता, या एकाच विधीमध्ये साधण्याचा योग आणि कार्य आपल्या सनातन बुद्धिमान वैज्ञानिक ऋषींच्या बुद्धीची आपल्याला कल्पना येईल. आता या ऋणाची सुरुवात देहात येण्याची इच्छा व परि स्थिती जेंव्हा एकत्र येतात त्याक्षणी सुरू होते. 

या ऋणात आत्मा बांधण्याआधी ईश्वर या आत्मतत्वाला काही कार्य करण्याची आज्ञा देऊनच पाठवतो.तुला काही काळासाठी मी निर्माण केलेलं हे घर,भाडेतत्वावर देताना, आपल्यात असा करार असेल की,तिथे गेल्यावर स्व पासून माझ्यापर्यंतचा प्रवास करून, हेच शुद्ध आत्मतत्त्व मला परत आणून द्यायचं. त्याबद्दल तुला मी वैकुंठ वास घडवून, तुझ्या पुण्यायीच्या परताव्या पर्यंत इथे निजानंदी रत राहण्याची व्यवस्था घडवून देईन. ईश्वर आणि आत्मा यांच्यातील हा अलिखित संवाद, देहात आल्यावर आत्मा पूर्ण विसरून जातो. विधात्याची ही व्यवस्था मुद्दाम निर्माण केली गेली आहे आणि हाच खरा पेच आहे, हा पेच सोडवण म्हणजे परमार्थ साधणं आहे. या करारा न्वये आपण खरतर विधात्याने ऋणबद्ध आहोत.हे ऋण तेंव्हाच फिटतात, जेंव्हा हा आत्मा परम आत्म्याला प्राप्त करतो. 

हे सर्व साध्य करण्यासाठी, सिद्धपुरूष कार्यरत आहेत. जे याच परमेश्वराचे ऋण फेडून ऋण मुक्त झालेले सिद्धात्मे आहेत. आपल्या साध्यासाठी, हे सिद्धपुरूष आहेत. आपल कार्य साधक होऊन, या मार्गावर स्वचा अर्थात देहातील आत्म्याचा शोध घेऊन,या मार्गात प्राप्त होणाऱ्या सिद्धिंचा सदुपयोग करून, आत्मतत्वाला जागृत करणं हे आहे. यासाठी मुळात देह आणि त्यात स्थित आत्मा या दोन भिन्न गोष्टी आहेत,हे आधी मनाला समजावून सांगणं अत्यंत आवश्यक आहे. हे मनात खोलवर रुजलं तरच मनाचा इच्छित सहभाग आणि सहकार्य मिळू शकतं.

मनाच्या सहकार्याची व सहभागाची आवश्यकता यासाठी आहे की, देह आणि आत्मा या दोन्हींमध्ये मन हा एक सांधा, पूल किंवा दुवा आहे . त्याचा उपयोग करूनच आत्मा, देहाचा उपयोग इच्छित कार्यासाठी करून घेऊ शकतो. त्याचसाठी मी म्हणजे नक्की कोण, याचा शोध घेणं महत्वाचं आहे. याचसाठी साधक होऊन साधना करून, योग साधावा लागतो.पण त्यासाठीची मूळ पायरी मी म्हणजे देह नाही, तर मी म्हणजे आतील आत्मा आहे, हा भाव दृढ धरून राहणं महत्वाचं आहे. देहाच्या मोहात, लोभात, मायेच्या प्रभावात मन देहाचे भोग, उपभोग यांच्याच ओढीने, अनेक अयोग्य कर्म करण्यात गुंतत जातं.

हा गुंता एकाच जन्मात इतका वाढतो की आपण जन्मो जन्मी या गुंत्यात किती वाढ करून घेतो, याचा अंदाज आपल्याला येणारही नाही. जर हा अंदाजच आला नाही, तर आपण त्याचं परिमार्जन किंवा परतफेड करण्याची गोष्टी खूप दूर आहे. देहाच्या भोगात लुप्त झालेलं मन, जागृत होतं ते सरतेशेवटी मृत्यू समयाला. त्या वेळी देहा तील आत्मतत्त्व जागृत झालेलं असतं आणि संपूर्ण आयुष्यभर देह आणि मन यांनी जे जे सत्कृत्य दुष्कृत्य केलेलं आहे, त्याची आठवण आत्मा मनाला करवून देतो. म्हणूनच बऱ्याच जणांना प्रत्यक्ष मृत्यू समयी उपरती, जागृती येऊन, आपला पूर्ण जीवनपट दिसतो.

काय काय चुका केल्या, अहंकाराने काय काय चुकीचं, प्रमादात्मक देहाने केलं, गर्व, स्व आणि देहाचे जे जे चोचले पुरवले, त्याची आठवण आत्मा, मनाला त्या क्षणी करवून देतो. आपण काय चुकीचं वागलो आणि त्याने काय नुकसान प्राप्त केलं, हे सुद्धा त्या क्षणात आत्मा मनाला जाणवून देतो. किती शुद्धता राखली आणि कुकर्मांची किती अशुद्धतारूप जाळी मनाला चिकटली, ते देखील, मृत्यू समयी जागृत आत्मा मनाला दाखवून देतो 

पण अश्या वेळी पस्तावून काहीही साध्य होत नाही, होऊ शकत नाही. घडायचं ते आधीच घडून गेलेलं असतं. यावर उपाय काय आणि ही उपरती अश्या वेळी येण्या आधी काय केलं तर हे टाळता येईल, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...