अध्यात्म विराम १५३
मनाची स्थिती ही प्रपंचात आणि परमार्थात कशी असावी, यावर आपण चिंतन करत आहोत. मुळातच या भूतलावर या देहात, आपण पाहुणे आहोत. म्हणजे हा देह आपला मालकीचा नाही. त्यामुळे आपण त्या त्या भावनेने प्रपंच आणि परमार्थ करावा. हा भेद कसा काय ध्यानात धरायचा, याचा आता विचार करूया. समजा आपण एखादी गोष्ट, वस्तू, वास्तू भाडं देऊन वापरायला घेतली किंवा आणली की, ती स्वतःची नाही, हे कायम ध्यानात ठेवतो. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना, काळजीपूर्वक वापर करतो. कारण काही नुकसान झाल्यास, मूळ मालक आपल्याला त्याची भरपाई करून मागेल. बरेचदा तसा करार सुद्धा करून घेतला जातो, जो साक्षांकित केला जातो.
ज्यामुळे त्या आधाराने, मालक आपल्यावर नुकसान भरपाईसाठी तक्रार व दावा सुद्धा दाखल करू शकतो. कारण त्यावर त्याचा मालकी हक्क असतो. आता देहाच्या बाबत विचार करायचा झाला तर, ती व्यवस्था देवाने निर्माण केली आहे. त्यामुळे त्याबाबत ईश्वरच आपल्याला मालकी सांगू शकतो. पण अशी ईश्वराने कधीही, देहावर, मालकी सांगितल्याची नोंद किंवा घटना नाही. म्हणून माणसाला त्याची किंमत किंवा भेद समजत नाही. आता हा देह निर्माण केला पंचमहाभूत तत्वांचा वापर करून.
ही तत्व वास्तविक ईश्वराची निर्मिती आहे. यावर मानवाचा कोणताही मालकी हक्क वा अधिकार नाही.
म्हणून मृत्युसमयी आपल्याला हा देह पंचमहाभूत तत्वांना अर्थात अप्रत्यक्षपणे ईश्वराला पुन्हा परत करावा लागतो. सनातन हिंदू धर्मानुसार, आपण देहाचं दहन करून, अस्थिंच विसर्जन करून आणि निर्गुण तत्वांना तर्पण करून, पार पाडतो. ही पाठी राहिलेल्याची जबाबदारी मानली जाते.
यात मुक्तीपेक्षा सुद्धा ज्या पंचमहाभूत तत्वांकडून काही अंश घेऊन, हा देह निर्माण झाला, तो त्या तत्वांना पुन्हा परत करणं, ही एक मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच आपल्या धर्मात शास्त्रोक्त पद्धतीने ही प्रक्रिया मांडली आणि सांगितली गेली. जी आजही बऱ्याच अंशी पाळली जाते. ते मुख्यतः ईश्वराप्रप्ती एक कर्तव्य आहे, या पाच तत्वाने घेतलेला हिस्सा मी त्यांना परत करून टाकला.
आत्म्याने पंच तत्वांचे हे काही अंश, ऋण रुपात अर्थात कर्जावू घेऊन, देह निर्मितीसाठी त्यांचा उपयोग करून, त्यामध्ये स्वतःला स्थापित केलं. म्हणजे ईश्वराकडून घेतलेलं ऋण किंवा कर्ज हे त्या क्षणापासून सुरू होतं, ज्याक्षणी आत्म्याला, अश्या विशिष्ट देहात स्थापित होण्या साठीची परिस्थिती निर्माण होते.आता ही स्थिती कशी निर्माण होते, तर ती आत्म्याच्या संचीतातील भोग आणि उपभोग यांच्या शिल्लक गाठोड्यातून निर्माण होते. आपण एखादी रक्कम ऋण किंवा कर्ज म्हणून घेतली की त्यावरील व्याज आणि ती मूळ रक्कम आपल्याला धनकोला परत करावी लागते.
हे आपल्या ध्यानात कायम नोंदलेले असतं. त्याची तजवीज आपण कायम करत असतो आणि महिन्याच्या हप्ता या माध्यमांतून, ही परतफेड आपण करत असतो. आता देहात येण्यासाठी ईश्वराने पंचमहाभूत रूप दिलेली रक्कम आपण ईश्वराला मरणोपरांत देहाच दहन करून, परत करतो. पण ही तत्व वापरायला देण्याआधी, खरा करार, जो आत्म्याशी ईश्वराचा झालेला आहे, त्याचं काय, हा प्रश्न शिल्लक राहतो. कारण कोणत्या कारणांसाठी ईश्वर ही एवढी व्यवस्था निर्माण करतो आणि पंचतत्वा तील काही हिस्सा आपल्याला ऋण रुपात प्रदान करून, देहाची निर्मिती करतो.
कारण ईश्वर हा काही घेतल्याशिवाय, काही देत नाही आणि काही घेतलं की काहीतरी देतोच. म्हणजे ही देह निर्मिती करताना मूळ अंश असलेल्या आत्म्याला, काही तरी सांगून, पढवून या कर्जावूं देहाच्या गाभाऱ्यात ईश्वराने पाठवलं असणार,स्थापित होण्याची आज्ञा केली असणार हे नक्कीच. म्हणजे हे मी तूला ऋण तत्वाने देत आहे, पण बदल्यात तुला, त्या देहात गेल्यावर, हे हे कार्य करायचे आहे. ते काय कार्य असावं, यावर आपण उद्याच्या भागात सविस्तर बोलूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment