अध्यात्म विराम १५८
ईश्वरी वासनांचं योग्यवेळी स्मरण व्हावं, हेच प्रत्येक जिवाचं परम कर्तव्य आणि त्याचा परम धर्म असला पाहिजे. आपलं कसं झालंय की, जत्रेत काही क्षणांसाठी जायचं ठरवून निघतो,काही क्षणात,जत्रेतील वातावरणा ला भुलतो आणि मग जत्रेतच हरवून गेलो. घरी कोणी वाट बघत आहे, हे पूर्ण विसरून गेलो. अशी परिस्थिती झाली आहे. यातसुद्धा काहीजण आहेत ज्यांना वेळेचं भान असतं आणि ते जत्रेत हरवून न जाता, योग्यवेळी स्वगृही जातात. त्यांना असे हरवलेले, मार्ग भ्रष्ट झालेले, मूळ आत्म स्व गमावलेले जन पाहून, खिन्नता, दुःख आणि औदासिन्य येतं.
कदाचित आपण ज्याप्रकारे वेळेत सावरलो, त्याप्रमाणे इतरांनी सावरून, आपल्या मूळ ईश्वराच्या मार्गाकडे जायला सुरुवात करावी आणि या जगाच्या जत्रेतील भूलभुलैयाला भुलून, मार्ग विसरू नये, यासाठी ते मार्ग दर्शन करतात, योग्य उपदेश देतात. अश्या लोकांना ईश्वरी मार्ग सापडलेला असतो. अशा सर्वांना भटकलेले जन पाहून, अपार दुःख आणि दया येते. म्हणून असेच संत महंत योग्य मार्गदर्शन करतात. त्यांच्यामधील अग्रणी असलेले संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी म्हटलंय, देवाचीये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या. याचा भावार्थ, आपल्या विषया संदर्भात जाणून, पुढे जाण्याचा प्रयत्न करूया.
ईश्वरी वासना व कामना म्हणजे, ईश्वराच्या चिंतनाची, भजनाची, पूजनाची, भक्तीची, ज्ञान ग्रहण करण्याची भूक, इच्छा व प्रेरणा. आपल्या मनात अनेक वासना व कामना असतात. त्यातील ज्या प्रभावशाली, बलशाली व जास्त उर्जावान असतात, त्या आपली भूक भागवण्या साठी, सतत कार्यरत राहतात आणि देह, वाचा, बुद्धी व मन यांना कार्यरत करून, आपली भूक शमवतात. पण यामधे आत्म्याची हेळसांड होते आणि ईश्वराला, संत महंत याना यातना होतात.
यावर मार्ग म्हणजे, आपल्या भुलोकीच्या, मार्ग भ्रष्ट करणाऱ्या, वासनांचा जोर कमी करून, ईश्वराचं श्रवण, स्मरण, पूजन या वासना व इच्छा मनात याव्यात आणि त्याप्रमाणे कर्म घडावं. पण हे साधायला आणि तशी बुद्धी व्हायला आणि कर्मात रुपांतरीत होण्यासाठी, आयुष्यात, पूर्वजन्मातील काही सत्कर्म, दानधर्म व ईश्वरी स्मरण अत्यंत आवश्यक आहे. एका क्षणासाठी चुकूनसुद्धा घडलेल्या अश्या ईश्वरी स्मरणाचं महत्व सांगणारी एक कथा सांगतो, त्यावरून क्षणभर केल्याने किंवा घडल्याने काय होऊ शकतं ते कळेल.
एकदा एका गावात असलेल्या एका रागीट आणि इश्वरावर श्रद्धा नसलेल्या वृद्ध गृहस्थाला मृत्यू प्राप्त झाला. अर्थातच अत्यंत रागीट, कद्रू, कृपण, वृत्तीचा असल्यामुळे पापांच्या राशीच्या राशी जमा होत्या. त्यामुळे मृत्यू पश्चात, यमदूत आक्रंदन करत, हजर झाले. प्राण घेऊन निघाले, तितक्यात वाटेत शिवदूत सुद्धा, त्वरेने हजर झाले व यमदुतांना म्हणाले की,हे प्राण आम्हाला कैलासावर घेऊन जाण्याची आज्ञा आहे. त्यामुळे ते आमच्या स्वाधीन करा. अन्यथा आम्ही युद्ध करून, हे प्राण घेऊन जाऊ.
अर्थातच शिवदूत असल्यामुळे, यमदुतांनी त्यांना प्रणाम करून,विचारलं की,इतक्या पापी माणसाला तुम्ही कैलासा वर कोणत्या कारणाने नेत आहात, ते कारण तरी सांगा. त्यावर शिवदूत म्हणाले की, याचा पुत्र मोठा शिव भक्त आहे आणि त्याला या कार्यातून परावृत्त करण्या साठी आणि रोज कुत्सित बोलताना, हा गृहस्थ दोन वेळा म्हणाला होता की, काय सारखं सारखं नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय करतोस, जरा व्यवसायात लक्ष दे. या प्रकारे, रागात का होईना, याने शिवनाम तीन वेळा म्हटलं आहे.
त्यामुळेच, प्रत्यक्ष भगवान शंकरांनी आम्हाला, याला कैलासावर आणून,याच्या पुण्यायीच्या खात्यातील शिलकीपर्यंत कैलास उपभोग घेण्यासाठी,घेऊन येण्याची आज्ञा केली आहे. असं म्हणून, त्या यमदुतांना पिटाळून, ते प्राण शिवदूत कैलासावर, घेऊन गेले.
यावर आपण पुढील चर्चा उद्याच्या भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment