Skip to main content

अध्यात्म विराम १६०

अध्यात्म विराम १६०
 
वास्तविक पाहता कर्मगतीच्या फेऱ्यात फिरणारा आत्मा, आपल्या कर्मानुसार त्या त्या देहात जाऊन, कर्मभोग भोगून, पुन्हा पुढच्या देहासाठी निघतो.आता या प्रवासात त्याला, ईश्वरी वासनांची आवड, गोडी तेव्हाच लागू शकते, जर तशी ओढ त्याच्या अंतरातम्यात वसलेली असेल. म्हणजे जर त्याने कधीही आपल्या पूर्वआयुष्यात, अशा प्रकारची भक्ती अर्चना पूजन शरण स्मरण हे केलं असेल तर,त्याचा लाभ निश्चितपणे पुढील एखाद्या जन्मात त्याला प्राप्त होतो.आता हे कसं हे पाहूया. समजा एखाद्या इसमाने कोणते तरी पुण्य कर्म किंवा चांगलं काम केलं आहे आणि ते जाणणारा त्याला पुढील आयुष्यात कधीतरी भेटला तर, तो त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना सांगू शकतो की, हा एक चांगला इसम आहे माणूस आहे

असं समजा की काही कारणास्तव आपल्या कर्माच्या आधारावर, ती पहिली व्यक्ती कोणत्यातरी समस्येत अडकली आहे आणि त्याचवेळी, हा ओळखणारा इथून इसम तिथून जात आहे. तर तो इसम आजूबाजूच्या व्यक्तींना नक्की सांगू शकतो की, या माणसाला मी ओळखतो. हा खूप सज्जन गृहस्थ आहे. कदाचित परिस्थितीवश, तो आज चुकीचं वागत असेल. पण मी त्याला चांगला ओळखतो. त्यामुळे त्याला सोडून देण्यात यावं. म्हणजेच आपण केलेल्या चांगल्या कर्माची फळ कुठे ना कुठे, कधीतरी, योग्यवेळी, एखादी व्यक्ती किंवा एखादी घटना या स्वरूपामध्ये आपल्याला समोर येते आणि आपल्या अडचणीतून काही मार्ग निघूच शकतो.

कर्माच्या प्रवासात, आत्म्यासोबत असलेली शिदोरी किंवा संचित, काही ना काही तरी चांगल्या कर्माची बीज घेऊन जातात आणि ती बीज कधी ना कधी, आपल्या समोर चांगल्या फळांच्या स्वरूपात येतात. पण ती योग्य वेळी येण्यासाठी, त्या प्रत्येक चांगल्या कर्माला, काही ईश्वरी अधिष्ठान जर असेल तर, आपल्या योग्य वेळी, ती चांगली कर्म आपल्यासमोर येऊन, आपल्या अडचणीतून किंवा भोगातून बाहेर यायला सहाय्यभूत ठरतात. आता हे कसं ठरेल की प्रत्येक चांगल्या कर्माला ईश्वरी अधिष्ठान प्राप्त होईल, हे जाणून घेऊया. मुळामध्ये चांगल्याच कर्माला ईश्वरी अधिष्ठान प्राप्त होतं, हे कसं काय ठरवायचं. तर याचं उत्तर माऊलींनी, ज्ञानेश्वरी मध्ये सातव्या अध्यायात देऊन ठेवलेलं आहे.

माऊली असं म्हणतात की मूळ स्वरूपामध्ये एखाद्या गोष्टीत किंवा बीजात ईश्वर वास करतो. पण ज्यावेळी तिथे वासनेचा शिरका होतो, त्यावेळी तेथील ईश्वराचं अस्तित्व नाहीसं होतं.म्हणजेच आपण केलेल्या कोणत्याही चांगल्या कर्मात ईश्वराचं पाठबळ आपल्या मागे असावं, यासाठी काय केलं पाहिजे ते पाहूया. त्याआधी बुद्धी व वाचा यांची दोन विभागात विभागणी करता येईल. एक म्हणजे सद्बुद्धी आणि चांगली वाणी त्याचप्रमाणे दुर्बुद्धी आणि वाईट वाणी. आता याचे विश्लेषण करूया. मूळ बुद्धी ही ईश्वराने दिलेली आहे, पण त्याचा सकाम, दुष्काम किंवा निष्काम वापर, मानव स्वतःच्या प्रेरणेने किंवा वासना व कामना यांनी करतो. याचाच अर्थ मूळ बुद्धी ही ईश्वरी देणगी आहे. पण त्याचा योग्य किंवा अयोग्य वापर हे प्राण्याच्या हातात आहे, तिथे देव काहीही करू शकत नाही.

याचं एक मोठा उदाहरण महाभारतात सापडत, ज्यावेळी कृष्ण शिष्टाई करण्यासाठी धृतराष्ट्राच्या सभेत गेला. त्यावेळी दुर्योधन स्वतः त्याला म्हणाला की, हे कृष्णा जर तू खरच देव असशील तर, मला पांडवांना काहीही न देण्याची जी बुद्धी आहे, ती तू पालटून दाखव. यावर श्रीकृष्ण फक्त स्मित करते झाले. पण महाभारत युद्धात अर्जुनाला हितोपदेश करताना श्रीकृष्णाने याचे उत्तर दिलेलं आहे. ज्याचा टीकात्मक ज्ञानेश्वरीत, माऊलींनी उल्लेख करून, विस्तार पूर्वक, सांगितलं आहे. यावरच उद्याच्या भागात आपण पुढे चिंतन करूया आणि आजच्या पुरतं इथे थांबूया.

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...