अध्यात्म विराम १६९
नाम हे मुळात हळूहळू मनात झिरपत जातं. नाम हे ठिबक सिंचन या नैसर्गिक प्रकारातील आहे. ते सतत आणि शांत चित्ताने घेत गेल्यास, अत्यंत सावकाशपणे ते मनातील सर्व कप्प्यात प्रवेश करतं. त्याच्या परिणाम रूपाने, मनातील अनेक नकारात्मक, विकारी, वासनामय केंद्रे हळूहळू परावर्तित होऊन शांत होतात किंवा सकारा त्मक स्वरूपात बदलतात. मुळात नाम हे मनाला स्थिरता देतं, ज्यामुळे मनाला चिंतनाची सवय लागते. चिंतन हे प्रत्येक व्यक्तीला अत्यंत जरुरीचं आहे. चिंतन माणसाला विचार प्रवृत्त करतं. योग्य चिंतन माणसाला हळूहळू योग्यतेकडे नेते. एकदा विचारांची सवय स्थिर मनाला लागली की, त्या मनाला चांगलं व वाईट, उत्तम व हीन, योग्य व अयोग्य, काम्य व आवश्यक, वासना व नैसर्गिक गरज या सर्वांचा विचार करायची सवय लावते.
त्यायोगे माणूस, प्रत्येक इच्छा मनात उत्पन्न झाल्यावर, ती कृतीत उतरवण्या आधी,त्यावर चिंतन करतो.त्या वासनेची, इच्छेची आवश्यकता किती आहे, खरच आपली ओढ, आकर्षण हे सुयोग्य आहे की आता याची आवश्यकता नाही. असे अनेक प्रकारचे चिंतनशील विचार मनामध्ये तेंव्हाच येऊ शकतात, ज्यावेळी मन असं चिंतन आणि असे विचार पेलण्याचा स्थितीत असतं. विचार पेलण्याची स्थिती म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीवर शास्त्रशुद्ध आणि तर्काने केलेले विचार. त्या विचारांना विशिष्ट दिशा व वेग प्रदान करतात.
ज्याला सद्सदविवेक बुद्धी म्हणतात, ती स्थिती किंवा ती गुणवत्ता आपल्या मन व बुद्धी यांमध्ये नामाच्या अखंड साधनेने दृढ होते. एकदा सद्सदविवेक बुद्धीने विचार करून कार्य करण्याची प्रेरणा प्राप्त झाली व सवय लागली की, माणसाला त्याचा अनेक प्रकारे व अनेक क्षेत्रात लाभ होतो. वासनांची, काम क्रोधादी विकारांची, लोभ मोह यांची सर्वाची भ्रम निर्माण करण्याची क्षमता हळूहळू कमी कमी होत जाते. जशी ही क्षमता कमी कमी होत जाते, विकारांची मारक शक्ती व क्षमता कमी होत जाते.
जर विकार मनामधे उत्पन्न झाले जरी, तरीही, त्यांना, मनाचा ताबा घेऊन, देह बुद्धी इंद्रिय यांच्या मार्फत गैर, चुकीची आणि अनावश्यक कर्म करण्याची बुद्धी निर्माण होत नाही. जरी अशी इच्छा यदाकदाचित निर्माण झालीच, तरीही त्यांची कार्यक्षमता आणि क्रयशक्ती नियंत्रित राहते. नामाचा अजून एक लाभ म्हणजे हे माणसाला प्रत्येक बाबतीत अतिरिक्त चिंतन करून, मगच कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असल्यामुळे, अचानक येणारा क्रोध, कामाचा ज्वर, लोभ मोह, मत्सर यांचं अचानक उद्भवण आणि आपल्या विचार क्षमतेला कार्यरत करण्यापासून रोखण्यासाठी नामाचा हळूवार घेतला जाणारा डोस आपल कार्य करतं.
यामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नाम हे प्रत्यक्ष ईश्वराचं स्वरूप असल्यामुळे, निर्गुण निराकार ईश्वराच्या अस्तित्वाच्या लहरी व त्या लहरींचं अस्तित्व आपल्या अवतीभोवती सतत घेरून कवच रुपात असतं. त्यामुळे कर्म करताना आपण या कर्माने बंधनं निर्माण करतोय की, मुक्तीच्या दृष्टीने काही मार्गक्रमण करणार आहोत का, हे विचार करण्यास मनाला प्रवृत्त करण्याचं सत्कर्म करण्याची बुध्दीप्रेरणा, नामाच्या नित्य औषधाने, प्राप्त होते.
नामाला स्वतःची आत्मशक्ती भगवंताच्या प्रेरणेने मुळातच असल्यामुळे, ती शक्ती नाम साधन करणाऱ्याला नित्य जागृत ठेवून, सकारात्मक लहरींचा लाभ प्राप्त करून देते. हीच सकारात्मकता, अनेक नकारात्मक लहरी उत्पन्न होण्याची संधीच देत नाही. नामाचे अजूनही अनेक रंग आणि प्राप्ती व त्यांची महती आपण उद्याच्या भागात पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment