Skip to main content

अध्यात्म विराम १६६

अध्यात्म विराम १६६

सगुण रुपातील ईश्वरी प्रतिमा ही व्यक्ती परत्वे भिन्न असते आणि असणार. यात दोन गोष्टी प्रामुख्याने म्हणता येईल. एक म्हणजे प्रत्येकाची आवड, ज्याच्या त्याच्या संचित, पुण्यफळ आणि कर्णगती यानुसार, जसे विचार कल्पना येतील, त्याप्रमाणे ठरतं किंवा ठरतं असावं,असच म्हणावं लागेल. दुसरं म्हणजे आपल्या मनाच्या कल्पना शक्तीला जे शक्य आहे,तेच आपल्याला सगुणात दिसू आणि प्राप्त होऊ शकतं. याचं कारण म्हणजे, कुणाला, श्रीकृष्ण रूप, कुणाला श्रीराम रूप किंवा कुणाला अन्य काही रुपातील, स्वरूप भावतं.रुपातील स्वरूप यासाठी म्हटलं की, बाह्यांगी भिन्न रुपात दिसणारं, प्रकट झालेला ईश्वर, अंतरंगी अनेक रुपात एकच आहे. किंबहुना, आपण कोणत्याही नामाने, रूपाने भजत, पुजत असलेला ईश्वर हा तत्वतः आणि मूलतः, एकच आहे. 

हे सर्व खरतर अनेकदा अनेकांनी सांगितलं आहेच. पण मग आपण सगुण ईश्वराच्या रुपाला का पुजतो, हा एक प्रश्न निर्माण होतो. पण याचं उत्तर सुद्धा अनेक संतांनी आपल्या कार्यातून, भक्तीतून सांगून ठेवलेलं आहे. हा एकतर मायेचा प्रभाव आहे आणि देहाच्या मर्यादांच तत्व इथे लागू पडत.  फक्त आपल्यात आणि त्यांच्यात भेद हा जाणीवेच्या जागृतीचा आहे. म्हणजे असं की,ते जाणतात त्यांना तशी जागृती, त्यांच्या भक्तीने प्राप्त झालेली आहे. त्या जागृतीमुळे, त्यांना माहीत असतं की, आपण साधना करत असलेला मूळ विठ्ठल, राम, कृष्ण हे तत्वतः एकच आहेत. हा भेद दृष्टीचा, चर्मचक्षुंचा आहे. पण त्यांच्या आत्म चिंतनातील जाणीवा अष्टौप्रहर जागृत असल्या कारणाने, त्यांना या भेदातील मूळ तत्व ज्ञात असतं, माहीत असतं आणि तरीही ते नित्य त्याचं रुपाला भजतात. 

पण आत्म्याची जागृती आणि चित्ताची शुद्धता त्यांना, नेहमी त्या तत्व स्वरूपाच्या समीप असल्याची जाणीव देत असते. म्हणजे देहारुपात भिन्न असलेल्या मातांच्या हृदयात एकच मातृतत्व ज्याप्रमाणे, स्थापित असतं, त्याचप्रमाणे या सगुण निर्गुण भेदाला जाणल पाहिजे आणि त्याचं मर्म ओळखलं पाहिजे. आपली खरी समस्या ही ओळखण्याची नाही. क्षणिक आपण जाणतो की, तत्वरुपात हे सर्व विश्व एकाच शक्तिस्वरुपातून प्रकट झालेले आहे. पण आपण सदासर्वदा मायेच्या प्रभावात असल्यामुळे, जाणलेलं, समजलेलं लगेच विस्मृतीत जातं आणि पुन्हा मायेचा, संभ्रम निर्मितीचा खेळ सुरू होतो. 

म्हणजेच आपण त्या शक्तीला जाणणं आणि विस्मृतीत जाणं, हे सर्वथा त्या शक्तीच्या हातात आहे. पण मग हे साधत का नाही,याचं उत्तर आपल्याच साधनेच्या फलीतात आहे. गीतेत भगवंतांनी स्वतः याचं उत्तर देऊन ठेवलं आहे. भगवंत म्हणतात की, माझ्या ज्या रुपाला भजशील, त्या रुपाला प्राप्त करशील. पण एका अर्थाने हे संकुचित प्राप्त करण्यासारखं आहे. कारण जर पूर्ण तत्व स्वरूप अस्तित्व असताना, आपण एका विशिष्ट शक्तीला प्राप्त करण्यासाठी, त्या रुपाला पाहून, त्या प्रतिमेत रत होऊन किंवा ते रूप मन आणि डोळे यांच्यासमोर योजून भक्ती करतो. 

त्यामुळे त्याचं रुपातील, शक्तीच्या उपासनेचा परीणाम स्वरूप आपण त्याचं शक्तीचा लाभ प्राप्त करतो. यामधे अजून एक गुह्य असं आहे की, सगुण रुपातील ईश्वरी शक्तीची उपासना करताना, त्या रुपातील शक्ती मर्यादित स्वरूपात फलप्राप्ती देते आणि तीदेखील भौतिक जगताच्या मर्यादेत आणि मायेच्या अस्तित्वात जे शक्य आहे तितकीच प्राप्ती होते. ती प्राप्ती भौतिक जगतात काही साध्य करून देईलही, पण आत्म्याच्या देहातील प्रवासाच्या योगात खरी ज्ञानप्राप्ती आणि खरी आत्मशुद्धी घडवू शकत नाही. 

कारण प्रत्येक सगुण रुपातील अस्तित्वाला ब्रम्हांडातील सर्व मर्यादा लागू होतात आणि त्यांना त्या पाळाव्या लागतात. म्हणूनच सगुणातील ईश्वर कर्माच्या बंधनांना आणि मर्यादांना टाळू शकत नाही. आता यावर काय उपाय आणि अशी कोणती भक्ती आहे वा साधन आहे, ज्यामधे सगुण निर्गुण दोन्हींचे लाभ प्राप्त होतात, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...