श्रीरुक्मिणी स्वयंवर ६५
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
रुक्मि पुढे वदतो आहे
" अरे यादव कुळात जन्म घेऊन त्यांचाच नाश करण्यास आला आहेस. सर्व भोग भोगून स्वतःला योगी म्हणवतोस. तुझ्या कपटाची झाडणी करण्यास या रणांगणी मी सद्गुणी म्हणून आलो आहे. "
इतके बोलून रुक्मिने तीन बाण धनुष्यास लावून कृष्णाच्या रोखाने सोडला. श्रीहरीने सहा बाण धनुष्यास लावून रुक्मिच्या दिशेने सोडले. तीन बाणांनी रुक्मिचे तीन बाण विंधले बाकीच्या तीन बाणांनी रुक्मिच्या हातातील धनुष्य मोडून काढले. मग श्रीकृष्णाने आठ बाण लावून सोडले त्यातील चार बाणांनी रुक्मिच्या रथाचे चारही घोडे छेदले आणि उरलेल्या चार बाणांनी सारथी धरणीवर पाडून ध्वजस्तंभ छेदला.
रुक्मिला क्रोध अनावर झाला हा प्राथमिक अपमान बघून. त्याने त्वरेने दुसरे धनुष्य उचलले आणि वेगाने पांच बाण लावून कृष्णाच्या दिशेने मारले. कृष्ण गाढा धनुर्धर होता. त्यानेही त्वरेने पांच बाण मारून रुक्मिचे पाच बाण मोडून काढले. त्यानंतर कृष्णाने चपळगतीने बाण सोडून त्याचे धनुष्य मोडले. रुक्मिने रागाने तिसरे धनुष्य उचलले. कृष्णाने त्याला बाण लावायची उसंत न देता , तेही धनुष्य बाण मारून मोडले. तदपश्चात चवथे, पाचवे अशी अनेक धनुष्ये कृष्णाने उचलतात क्षणी मोडून काढली.
रुक्मिने चपळाई करत एक धनुष्य उचलून वेगात त्याला अग्निअस्त्र लावले. त्याच्या धुराने सर्व दिशा झाकोळल्या गेल्या. सर्वत्र ज्वाळा पसरायला लागल्या. कृष्णाने लगोलग पर्जन्यास्त्र सोडले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. अग्निअस्त्र निष्प्रभ झाले. मग कोपलेल्या रुक्मिने वायव्यास्त्र सोडले. सगळीकडे झंझावात सुटला. त्या वाऱ्याच्या वेगाने अवनी हलत आहे असाच भास होत होता. श्रीकृष्णाने पर्वतास्त्र सोडून झंझावात शांत केला आणि वज्रास्त्र सोडून पर्वत निष्प्रभ केला.
संतापलेला रुक्मि क्रोधात म्हणाला "थांब आता तुला रुद्रास्त्राने परास्त करतो." असे बोलून त्याने रुद्रास्त्र सोडले. त्याबरोबर तिथे महारुद्र प्रकट झाले. अक्राळ विक्राळ दाढा , माथी मोकळ्या जटा , रक्तवर्णी नेत्र, कंठ काळाकभिन्न सर्प आणि पिंगट मिशा असा त्याचा अवतार होता. श्रीकृष्ण हा महाचतुर अस्त्रधारी होता. त्याने त्वरित भस्मासुरास्त्र सोडले. भस्मासुराला पाहताच रुद्र भयाने पळून गेला. यापश्चात रुक्मि विचार करत होता कि, आता कोणते अस्त्र योजावे. परंतु त्याआधीच श्रीकृष्णाने बाण सोडून रुक्मिचे धनुष्य भेदून ते रथाबाहेर पाडले. आता रुक्मिकडे काही शस्त्र उरले नाही.
धनुष्य उरले नाही हे पाहून रुक्मीने परशु बाहेर काढला आणि त्याने कृष्णावर चाल करून आला. कृष्णाने चपळ गतीने एक बाण सोडून परशु भेदला. त्या बरोबर रुक्मि पट्टीश घेऊन आला, कृष्णाने तेदेखील एकाच बाणात गगनात उडवून दिले. रुक्मिने लगेच शूळ अर्थात भाला घेतला आणि वदला आता तुला याने घायाळ करतो पाहताच राहशील आता. कृष्णाने एकाच बाणाने शूळ भेदून त्याचे तुकडे केले. शूळ देखील वाया गेलेला पाहून रुक्मि क्रुद्ध झाला. त्याने मग तोमर घेतले आणि धावत कृष्णाकडे येऊ लागला आणि वादला आता या तोमराचा वार सहन कर. त्याने फेकलेला तोमर वाटेतच बाणाने भेदून कृष्णाने त्या तोमराचे देखील तुकडे उडवले.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०६/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment