Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६८

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६८

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

झाला प्रकार हा रुक्मिणीसाठी  अत्यंत क्लेशकारक आणि तिच्या हृदयाला पिळ देणारा आहे, हे जाणून श्रीहलधर अर्थात श्रीबलराम यांनी सर्वप्रथम रुक्मिला तात्काळ सोडून देण्याची आज्ञा केली. कृष्णाला क्रोध त्यागण्याची आज्ञावजा सूचना  करून ते रुक्मिणीकडे वळले. रुक्मिणीने त्यांना चरण स्पर्श करून नमन केले आणि आशिष घेतला. रुक्मिणीस उठावयास सांगून ज्येष्ठ भ्राता म्हणाले

" हे रुक्मिणी जे घडले ते अत्यंत चुकीचे घडले. ज्या गोष्टी सहजपणे होऊ शकल्या असत्या त्या व्यर्थ कर्मकठीण करण्यात आल्या. मुळातच तुझे पिताश्री जर या लग्नास सहर्ष तयार होते आणि तू देखील यांस सिद्ध होतीस तर मग जे रुक्मिने केलं ते अनाठायी होतं. 

अर्थात केल्या कर्माचा उचित दंड कान्हाने त्याला दिला आहेच. परंतु घडल्या प्रकाराने तू तुझं मन दुःखी करू नकोस. ज्या कर्माचा भोग रुक्मिने मागितला तोच त्याला प्राप्त झाला. या व्यतिरिक्त याचा कोणताही भाव मनात ठेवू नकोस. आता तू द्वारकेची स्नुषा , महाराणी आणि कान्हाची प्रिय पत्नी होणार आहेस. त्यामुळे आता काहीही किंतु मनात बाळगू नकोस.  आमच्या मनात सुद्धा घडल्या प्रकाराचा कोणताही राग, द्वेष वा दूर्भाव राहणार नाही. किंबहुना कोणीही याचा उल्लेख करून तुला क्लेश सुद्धा देणार नाही याची मी ग्वाही देतो." 

ज्येष्ठ भ्राता श्रीबलराम यांचे हे आस्थापूर्ण आणि आपले पणाचे बोल ऐकून त्याही मनःस्थितीत रुक्मिणीला धीर आला. तिने आपले डोळे पुसले. तिने कृष्णाकडे एकवार प्रेम , कौतुक आणि आदरयुक्त भावाने पाहिले, ज्याला अर्थात कृष्णाने प्रतिसादले आणि श्रीहलधर यांनी कान्हासह सर्वांना द्वारकेकडे कूच करण्याची आज्ञा केली. अर्थातच यादवसेनेने या अभूतपूर्व यशाबद्दल रामकृष्ण हे दोन्ही बंधू आणि यादव सेनेचा जयजयकार सुरू केला. ज्याचा नाद तिन्ही लोकी दुमदुमला. ढोल,मृदंग, तुताऱ्या, शंखनाद यांचा घोष स्वर्गापर्यंत पोहोचला. परतीचा प्रवास काही वेळातच सुरू झाला. 

इकडे कौंडिण्यपुरात राजा भीमक यांच्या कानावर सर्व प्रकार गेला. रुक्मिने केलेल्या गैरकृत्याबद्दल त्यांना खेद वाटला आणि हे सर्व टाळणं शक्य असून वृथा अहंगंड आणि दुराभिमान यांनी ग्रस्त रुक्मिने स्वतः सह विदर्भराज्य, जरासंध , शिशुपाल, शाल्व यांसह अनेक राजांना मानहानि कारक पराभव व मनःस्ताप यांच्या खाईत लोटलं होतं. याचं त्यांना अतीव दुःख झालं. परंतु आपली लाडकी कन्या रुक्मिणी हिला, तिच्या मनासारखा पती, प्रत्यक्ष नारायणा वतारी श्रीकृष्ण प्राप्त झाला, याचा त्यांना अत्यंत आनंद वाटला. 

युद्ध जिंकून आणि रुक्मिणीस प्राप्त करून निघालेली यादवसेना सवेगे प्रथम मुक्कामी श्रीक्षेत्र प्रभास येथे पोहोचती झाली. अर्थात श्रीकृष्ण रुक्मिणी श्रीबलराम यांसह समस्त यादवसेनेने सोमनाथ येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. राजा भीमक एका घटनेने व्यथित व दुसऱ्या घटनेने हर्षित झाले. दोन्ही माझीच अपत्ये पण एक कर्माने श्रीकृष्ण अर्थात पुरुषोत्तम प्राप्त करती झाली आणि दुसरा स्वकर्माने विरुपता प्राप्त करता झाला. तरीही कन्यादानाच्या सत्कार्यासाठी जाणे गरजेचे आहे हे ओळखून राजा भीमक प्रभास क्षेत्री जाण्यास प्रस्थान करते झाले. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
१०/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...