Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७३ (विवाह सोहळा १)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७३ (विवाहसोहळा १)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

अद्भुत अश्या विवाह सोहळ्याला अपूर्व तयारीने, अभूतपूर्व जल्लोषात आणि राजस थाटामाटात सुरवात झाली. लग्नाची सर्व सामग्री घेऊन राणी शुद्धमती आणि रुक्मिणीस घेऊन राजा भीमक मंडपाकडे निघाले. नख शिखांत सोन्याच्या दागदागिन्यांनी सजलेली रुक्मिणी मुळातच लक्ष्मीस्वरूप असल्याकारणे तिच्या रूपाची , स्वरूपाची आणि तेजाची प्रभा आसमंतात पोहोचली होती. तिचे ते दिव्य आणि तेजस्वी स्वरूप पाहून आणि त्याच्या प्रभेने सूर्याला संकोच होत होता. 

स्वर्गातील सर्व देव, यक्ष ,किन्नर, गंधर्व(जे गायन सादर करून या सोहळ्याचे साक्षी होण्यासाठी आले होते)  अप्सरा (ज्या नृत्य सादर करून या पर्वाचा आनंद द्विगुणित करू इच्छित होत्या), अष्टवरूण , आदित्य हे सर्व या श्रीनारायण व देवी लक्ष्मी यांच्या श्रीकृष्ण रुक्मिणी रूपातील विवाहाचा आनंद घेण्यास्तव पोहोचते झाले होते. दशोदिशाना नगारे, वाजंत्री, सनई ,चौघडे झडत होते. काळ स्वये काही क्षण थांबण्याची अनुमती मागण्यासाठी ब्रम्हदेवांची प्रार्थना करत होता. 

आनंदपर्वाला सुरुवात  झाली. अर्थात ही स्थिती वधूची तर तिकडे वर , अर्थात श्रीकृष्ण , मयूरमुकुटधारण करून, कानात कुंडलिनीची कुंडलं, कपाळी चंदनाचं ठसठशीत उभं द्विबोटी गंध, त्या मध्ये अष्टगंधाची उभी रेखा, डोळ्यात काजळ, काळ्या मेघासम काळेभोर कुरळे केस मुकुटातून बाहेर येऊन खांद्यावर रुळलेले , मुखी तेज शतसहस्त्र सुर्यांचे, विजेसमान तेजोमय कमरपट्टा, त्याखाली प्रत्यक्ष अग्नि देवतेच्या हातून घडवलेले पितांबर, पायात सूर्याशी स्पर्धा करतील अश्या सोन्याचे जाडजूड वाळे, त्याखाली चरणस्पर्श करत चरणामृत पिऊन स्वतःला पुण्यवान समजणाऱ्या कर कर वाजणाऱ्या आणि रत्नजडित काम केलेल्या मोजड्या, अंगावर भरजरी उपवस्त्र, हातात आठही बोटात रत्न, पाचू, हिरे, तसेच विविध ग्रहांच्या अंगठ्या, मनगटात सुवर्णाचं  आणि त्यावर सिंहाचं चित्र आणि नक्षीकाम केलेलं कडं, दंडात वज्राच्या वाकी , चालताना मोजड्यांची होणारी करकर अष्ट दिशातील दानव व असुर यांना भयकंपित करणारी आणि चेहऱ्यावर कृष्णस्मिताची अद्भुत मोहिनी. या अद्वितीय, अद्भुत आणि चराचर व्यापून उरलेल्या प्रभेने रुक्मिणी मोहित नसती झाली तरच नवल होतं. 

लग्नामंडपाकडे वऱ्हाडी निघायला सुरवात झाली.  सर्वप्रथम अग्रपूजेचा मान असलेले आणि आपल्या बुद्धीने जगतव्याप्त केलेले श्रीगणराय मूषकारुढ होऊन निघाले. त्यांच्या मागे अजस्त्र आणि विशालकाय सिंहावर आरूढ नवरूप धारिणी देवी दुर्गा  आपल्या तेजासह निघाली. याच नवरूपातील चंडिकेच्या रूपातील अक्राळविक्राळ स्वरूपाला पाहून वऱ्हाडी बोलू लागले की हिला का बोलावले ,या रुपाला पाहून व्याही आणि त्यांची मंडळी हसतील, त्यामुळे हिला मागेच ठेवा.  या टीकात्मक बोलांनी श्रीगणेश रुष्ट झाले. त्यांच्या क्रोधाने, देवी दुर्गा कोपली. या दोन देवांच्या कोपाने वऱ्हाडात विघ्न आले. 

वऱ्हाडी का येत नाहीत या चिंतेने श्रीकृष्णानी दूत पाठवून माहिती काढा म्हणून आज्ञा केली. दूत माहिती घेऊन आले आणि म्हणाले की काही वऱ्हाडी मंडळींनी चण्डिकारूपातील दुर्गेला बोल लावले, त्यामुळे आपल्या मातेचा हा अपमान श्रीगणेशांना सहन न झाल्यामुळे ते कोपलेत आणि त्यांच्या कोपण्याने देवी दुर्गा रुष्ट झाल्यात. कृष्ण स्वतः वऱ्हाड खोळंबलं होतं त्या ठिकाणी लगबगीने पोचला. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
१५/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...