Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३५

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३५ 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
इकडे श्रीकृष्ण व बलराम यांची भेट झाली. अर्थातच कृष्ण काही न सांगता सवरता द्वारका सोडून , तेदेखील येथे विदर्भी जेथे सर्व शत्रूपक्ष एकत्रित आहेत , अश्या प्रदेशी एकटा निघून आला. काही सैन्यभार, काही संरक्षण, काही अंगरक्षक न घेता निघून आला या कारणे बलभद्र अर्थात बलरामदादा यांचा पारा चढला होता. 

रथातून उतरून हलधर श्रीकृष्णाला गाठून त्यालाही रथातून उतरण्याची आज्ञा देऊन खाली घेऊन आले. कृष्णाने अर्थात पुढील प्रसंग ओळखला व त्याच हेतूने काही बोलणार इतक्यात दादाच क्रोधायमान होऊन कडाडले. 

" माता यशोदा , माता देवकी आणि माता रोहिणी यांनी विश्वासाने तुझी जबाबदारी माझ्या शिरावर दिली आहे. हे जाणतोस ना कृष्णा." 

कृष्ण काही बोलणार, परंतु त्याला अडवून दादा पुन्हा क्रोधातच वदले.

" शत्रू बलाढ्य त्यात जरासंध, शिशुपाल, शाल्व आदी सर्व आपल्या मित्रांसह एकत्रित आणि सैन्यासह आहेत,  याचं काहीच भान नाही का तुला. सर्व गोष्टी मीच लक्षात ठेवून असायचं का. घडू नये ते अघटित घडलं असतं आणि युद्ध परिस्थिती उद्भवली असती तर काय उत्तर दिलं असतं आम्ही सर्वांना. विचारणा मलाच झाली असती,  काय.  आपल्याला कोण काय बोललं असतं , कारण आपण कनिष्ठ आम्ही ज्येष्ठ, त्यात जबाबदारी ओळखून वागणारे." 

दादा एक क्षण थांबले त्याचा फायदा घेत कृष्ण त्वरित कान पकडून बोलता झाला

" दादा , आपली आज्ञा घेऊन , सैन्यभार जमवून येण्याइतका समय हाती नव्हता. त्याचप्रमाणे आपण मला जाणता की, उचित समयी मी कितीही बलाढ्य शत्रू असो त्यास भारी पडलो असतो. हे तर आपणासही माहीत आहेच आणि रुक्मिणीने सांगितल्यानुसार रुक्मिला काही करण्याची संधी न देता त्याच्या डोळ्यासमोर मी रुक्मिणीला घेऊन वायूवेगे द्वारकेस येणार होतो." 

" आणि दैव प्रत्येक वेळी आपलीच साथ देणार , बरोबर ना." 

" हो बघा की, आपल्याला सैन्यासह येथे धाडले ते दैवानेच ना." 

या उत्तरावर काही न बोलता बलभद्र तेथून जाण्यास निघाले. अर्थात कृष्ण देखील आज्ञाधारक मुलाप्रमाणे त्यांच्या मागून निघाला. कृष्ण आणि बलराम नगराबाहेर आंबेच्या मंदिरा जवळ येऊन पोहोचले आहेत हे राजा भीमक याला समजले आणि राजा स्वये त्यांचे स्वागत करून आमंत्रित करण्यास्तव नगराबाहेर पूजा व स्वागताची यथोचित सामग्री घेऊन हजर जाहला. 

दोन्ही बंधूंची यथासांग पूजा करून झाली. रायाने दोघांनाही हात जोडून नम्रपणे विनंती केली.

" विवाहासाठी येणाऱ्या  सर्व अतिथी व गणमान्य व्यक्तींना उतरण्याची व राहण्याची उत्तम व्यवस्था नगरात करण्यात आली आहे. आपण नगरात येऊन आम्हास उपकृत करावे." 

कृष्ण बलरामदादांकडे एकवार पाहून म्हणाला 

" हे राजा भीमक , आपली विनंती यथार्थ आहे. आम्ही आपल्या म्हणण्यानुसार नगरात आलो देखील असतो. परंतु आपण जाणता की, मगधनरेश, चेद्यराज आदी आमच्याशी वैरभाव ठेवून असलेले सर्व आपापल्या सैन्यासह नगरात उपस्थित आहेत. आपण समजू शकाल की जर काही शाब्दिक देवाणघेवाणी झाल्या तर क्षुल्लक कारणाने विवाहात युद्ध प्रसंग उद्भवेल. म्हणून या अंबामातेच्या मंदिर परिसरातच आम्ही राहणं उचित आणि योग्य राहील." 

सर्व परिस्थिती ज्ञात असलेले राजा भीमक या गोष्टीला नाकारू शकत नव्हते आणि रुक्मि या आपल्या पुत्राला सुद्धा ते ओळखून असल्याकारणाने काही अधिक न वदता, आपल्या मंत्र्यांना यांची मंदिरातील अंबाभवनात उत्तम सोय करण्यास सांगून आपण नगराकडे रवाना होण्यासाठी निघाले , मात्र काही विचार करून पुनः परत आले. बलरामदादा व यादवनरेश कृष्ण यांना हात जोडून म्हणाले

" हे रामकृष्ण आपल्या दर्शनाने समस्त नगरजन व आमचे कुटुंबीय हर्षित होतील. आपण उभयता नगरात येऊन पुनः आपल्या मतानुसार येथे येण्याचे करावे. यावर एक क्षण विचार करून बलभद्र म्हणाला की, 

" आपण कृष्णाला घेऊन जावे, आम्ही सेनेसह येथेच थाबतो." 

कृष्ण व राया दोहींनी त्यास संमती देताच, कृष्ण आपल्या रथाकडे रायास घेऊन गेला व शेजारी राजास बसवून रथ नगराकडे नेण्यास सारथ्याला आज्ञा केली. कृष्ण , राजा भीमक, राजाचा लवाजमा आणि कृष्णाचे निवडक साथीदार कौंडिण्यपूर नगराकडे निघाले. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

०३/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...