Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३३

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
मनीची वेदना सांगू कुणाला
कुणास दृढइच्छा मी सांगू
कुणी असा आहे का जगती
माझी व्यथा जाणे त्या सांगू

कृष्ण कृष्ण मज पिसे लागले
जळीस्थळी मज दिसे कृष्ण
वदवून घेई नाम मुखी या 
किती दुष्ट तो आहे कृष्ण

जरी म्हणवतो जगतपती
समजेना ही व्यथा कशी
आणिक पत्रा धाडूनही
जाणीव त्याला नाही कशी

किती चिंतावे किती भजावे
किती किती त्याला स्मरणे
नामाच्या वाहून पखाली
प्रारब्धी मज आहे झुरणे 

हे श्रीकृष्णा किती विनवावे तुला. तुझ्यावाचून आता अन्न पाणी गोड लागत नाही. फक्त तुझ्या भेटीची आस लागली आहे. काय माझे पूर्वपुण्य कमी म्हणून मला कृष्णाने अव्हेरलं असेल का, की मी त्याच्या पात्रतेची नाही असाही विचार त्याने केला असेल का, मी तर वेडी एकटीच झुरत आहे त्याला स्मरत आहे. आता फक्त कृष्णाशिवाय कशावरही वासना उरली नाही आणि हा द्वारकेचा राणा काही येण्याची सुचिन्हे दिसत नाहीत. 

हे विधात्या एकच मागणं आतापर्यंतच्या आयुष्यात मी तुझ्याकडे केलं आहे आणि तेदेखील तू पूर्ण करू शकत नाहीस. इतकी मी दुष्ट आणि पापी आहे का.  हे श्रीकृष्णा तू तर भक्तरक्षक असं ब्रीद मिरवतोस आणि तू ही मला अव्हेरलेस तर मग आता माझा कोण त्राता या जगात. आता तर मला हे जगणे आणि तेसुद्धा यदुवीराशिवाय अशक्य होऊन गेले आहे. सर्व शरीरातील शक्ती हळूहळू नष्ट होत चालली आहे असाच भास होतोय. 

आता कसली हळद लावता मला. आता तर जगेन का मी हासुद्धा यक्षप्रश्न आहे माझ्यापुढे. आता का जायचं  अंबेच्या मंदिरात कारण स्वये अंबेनेच मला झिडकारले आहे असेच दिसते. कृष्णभेटी तर आता या जन्मी अशक्य वाटते. आता मला कशातच आसक्ती उरली नाही. मला अचानक विरक्तीचा अनुभव येऊ लागला आहे. 

का हे जगणे हरीविना हा गहन प्रश्न येतो आहे मनात. इतकं बोलून रुक्मिणीच्या नयनातून सहस्त्रधारा सुरू झाल्या. हे शिवरूपिणी भवानी तू देखील मला माझे इच्छित देऊ शकत नाहीस का. अश्या अनेक विचारांनी रुक्मिणी सतत अश्रूयुक्त लोचनांनी व्याकुळ होऊन धरणीवर बसली आहे. 

याच समयी तिचा डावा डोळा फडफडू लागला आणि बाहू स्फुरण पावू लागले. तिला जाणवले की ही तर कृष्ण येण्याची सुचिन्हे आहेत. असं का व्हावं. याचवेळी श्रीकृष्णाने द्विजास त्वरेने रुक्मिणीकडे जाऊन तिला माझ्या येण्याची वार्ता द्यावी असे सांगितले. तिला आश्वस्त कर की उद्या तिचे लग्न आहे आणि याच दिवशी मी तिचे पाणीग्रहण करीन.  हे ऐकून द्विज रथातून उडी मारून शीघ्र गतीने रुक्मिणीप्रत पोहोचता झाला. 

रुक्मिणीने द्विजास पाहिले आणि तिला  हर्षोल्हास झाला.

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

०१/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...