Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७७(विवाह सोहळा ५)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७७ (विवाहसोहळा ५)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

 आज श्रीनाथकृपेने कृष्ण रुक्मिणीच्या अद्वितीय विवाह सोहळ्यातील रुखवत पाहू आणि अनुभवूया.

नाथांनी याची सुरवातच इतकी अद्भुत केली आहे. ते म्हणतात 
" झळकती खावार्थाची ताटे , स्वानंदरसे भरली वाटे"
मनातील भाव ज्यावेळी प्रत्यक्ष प्रकटुन, उलगडून, विस्ताराने  मांडला जातो आणि समोरचा त्यातील आनंदरसाचा स्वाद घेतो तेंव्हा तो झाला भावार्थ. त्याचप्रमाणे खाद्याचा आनंद त्या त्या पदार्थातील रस जाणून खाणे, त्यातील स्वादाचा आणि नवरसांचा आनंद म्हणजे खावार्थ. म्हणजेच फक्त खवय्ये नव्हेत तर त्यातून होणाऱ्या रसनिष्पत्तीचा आस्वाद घेऊन त्यानुसार त्याची गोडी चाखणारे म्हणजे खावार्थी. 

कृष्ण, माता देवकी, पिता वसुदेव, पितामह उग्रसेन, दादा, वहिनी, भगिनी यांसह सर्वांना रुखवतापाशी घेऊन आल्यावर राजा आणि राणी यांनी त्यांना स्थानग्रहण करून रुखवताचं भोजन सुरू करण्याची विनंती केली. या सर्व मान्यवरांसह समस्त यादव वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची उत्तम व्यवस्था राजाने केलेली आहे. याच पंक्तीत खावार्थींची ताटे अर्थात अत्युत्तम भोजनव्यवस्था करून बोलावण्यात आलेल्यांना त्याचा रसास्वाद घेता यावा यासाठीची व्यवस्था, ही अभूतपूर्व आहे.

प्रत्येक मान्यवर व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या मानानुसार उत्तम रत्नजडित, मोतीजडीत, सुवर्णहारजडीत अशी महिरप घातलेली ताटे मांडली आहेत. त्यात उत्तम भोजन आहेच पण त्यातून मिळणाऱ्या स्वानंदरसाने त्या ताटातील वाटे अर्थात ताटातील अणूरेणू ओतप्रोत भरलेला आणि भारलेला आहे. कारण भोजनास प्रत्यक्ष जगतपालक  बसले आहेत आणि जोडीला शेष स्वये आहेत. तो स्वानंदरस ताटातून वाटीत वाटीतून ताटात आणि ताटाबाहेर ओसंडून वहात आहे. कारण करणारे हात, वाढणारे हस्त ,  जेवणारे कर, हे सुखी समाधानी आणि निजानंदी रत असे भक्त आणि सोबतीला भक्त वत्सल कृष्णनाथ आहेत. 

खाणीवा म्हणजेच खणून अर्थात जमिनीखालील , खुडीवा म्हणजेच  खुडून अर्थात फांदीवर वा वेलीवर लागलेले, तोडीवा म्हणजेच तोडून काढलेल्या शेंगा अश्या तिन्ही प्रकारच्या व सोलून आतील बिया काढून केलेल्या प्रकारातील 
सर्व भाज्या केलेल्या आहेत. अश्या भाज्या मोठमोठ्या पात्रात भरून सुखेनैव समाधानी असलेले कौंडिण्यपुरातील सेवकवर्ग निजानंदे वाढत आहेत आणि वाढताना प्रत्येकाशी शर्करायुक्त बोल बोलून पूर्ण आग्रह करून, सुहास्य वदनाने वाढत आहेत. 

यातील पदार्थांचे गुणविशेष म्हणजे यात नवरसातील सर्व रसाचे अन्नपदार्थ आहेत. गोड पदार्थ, लवणयुक्त, तुरट, आंबट, कडू रसातील , अतिजहाल तिखट, नुसती करकरीत हिरवी मिरचीयुक्त पदार्थ त्याच्या त्याच्या रुचिनुसार तयार आहेत आणि सढळ हस्ते वाढले जात आहेत. तळणाचे कित्येक जिन्नस मांडले आहेत आणि मोठ्या मोठ्या ताटातून वाढले जात आहेत. शत प्रकारच्या अनेक रंगांच्या कोशिंबिरी आणि पंचदश प्रकारची व विविध कलाकुसर केलेली रायते वाडगीच्या वाडगी रिकामी होत आहेत. यातील तिखट पदार्थांचा जहालपणा इतका आहे की खाणारे, कानातून धूर आणि नाक, डोळे व तोंडातून पाणी येत असूनही त्यातील स्वादामुळे अजून मागून मागून खात आहेत. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
१९/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...