Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७०

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७०

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

श्रीकृष्ण पुढे राजा भीमक यांना म्हणाला.

" हे महाराज , आपल्या इच्छेचा मान आहेच. परंतु माझे दादासाहेब अर्थात बलरामदादा यांना आपण विचारणं इष्ट होईल. कारण सांप्रत काळी आणि या स्थळी तेच ज्येष्ठ आहेत. तद्वत त्यांच्या अनुमतीनेच आपल्याला पुढील गोष्टी ठरवता येतील." 

श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून राजा भीमक सार्थ आणि यथार्थ भावाने संतोष पावले. अर्थात लगेच ते श्रीबलीभद्र यांच्याकडे वळून त्यांचे चरणस्पर्श करते झाले. त्यांच्या या आदरयुक्त सदभावाने हर्षभरीत झालेले दादा , त्यांना खांद्याला धरून उठवून, श्रीकृष्णाकडे वळून नर्म विनोदाने आणि स्मितवदन म्हणाले.

" कान्हा सर्व इच्छिलेस तू, घडवलेस तूच आणि करवून घेतोस माझ्याकडून. तुझी ही तुझी चतुरता मला भावली. अर्थात राजन या त्याच्या इच्छेत आमचाही हर्ष आहे आणि तो हर्ष आम्हाला कान्हामुळेच प्राप्त होतो प्रत्येक वेळी. म्हणूनच कितीही खट्याळ असला तरी तो मला अनुज म्हणून अतिप्रिय आहे." 

या क्षणी , दादांच्या या मोहक आणि भावपूर्ण शब्दांनी श्रीकृष्ण भारावले. अर्थातच श्रीकृष्णाने आपल्या उपरण्याने आपल्या लोचनात आलेले आनंदाश्रू पुसत , दादांचे पुढील बोल ऐकण्यासाठी लक्ष दिले. दादाही थोडे भारावले गेले. कान्हाला डोळे पुसताना पाहातच आपलं बोलणं पुढे नेत म्हणाले.

" सर्व यथाविधीच व्हावं ही आमचीदेखील आंतरिक इच्छा आहे. त्यात या दोघांच्या इच्छेचाही सन्मान होईल. सोहळा विधिवत संपन्न व्हावा हेच सुयोग्य आहे. आपण तयारीला लागा आम्हाला देखील त्यानुसार ठरवता येईल." 

दादांचे अनुमतीयुक्त बोल ऐकून राजा भीमक आनंदाने डोलू लागले. त्यांना तर जणू तिन्ही लोकींचे राज्य जिंकल्याचा आनंद प्राप्त झाला होता. त्याच हर्षात ते म्हणाले.

" आपली सर्वांची मनीषा इच्छित कार्य सुयोग्यरित्या संपन्न व्हावं हेच असेल तर मग माझी आपल्याला विनंती आहे की, आपण सर्व आपल्या समस्त स्नेही परिवार, द्वारकाजन यांसह या कार्याला कौंडिण्यपुराला यावं. तिथे समारंभपूर्वक हा सोहळा थाटा माटात पार पाडू." 

त्यांचे हे वचन ऐकून रुक्मिणी म्हणाली.

" हे तात, ज्या ठिकाणी हे कृष्णचरण आहेत तेच सर्वात परम पावन आणि इष्ट धाम आहे, हे जाणून येथेच हे कार्य संपन्न करण्याचे योजा. आता परत मागे जाणे नको आणि अपव्यय नको. सर्व सामग्री व तयारी येथेच मागवून घ्यावी आणि कार्य संपन्नता येथेच करावी." 

रुक्मिणीचे हे वचन ऐकून , राजा भीमकाने त्यास त्वरित मान्यता देत आपल्या पत्नीकडे अर्थात राणी शुद्धमतीकडे प्रश्नार्थक भावात पाहिले. राणीने त्यास स्मितवदन होकार देताच , राजाने हात जोडून श्रीबलरामदादा यांना पृच्छा केली. 
रुक्मिणीच्या बोलांनी संतोषलेले दादा अर्थातच त्वरित यांस तयार झाले. तिकडे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या कथनाने अतिहर्षित होऊन कौतुकाने आणि सूचक स्मित करत रुक्मिणीस पहात होते. 

दोघांचीही दृष्टादृष्ट झाली आणि कृष्णाच्या नजरेतील खट्याळपणा लक्षात येऊन , रुक्मिणी हसून लटक्या रागाने कृष्णाकडे पाहू लागली. दादांना या नजरेतील खेळाची गम्मत वाटली आणि अर्थात ज्या कान्हाला त्यांनी लहान पाहिलं होतं , त्याचा आता विवाह संपन्न होणार आणि त्याची पुढची तयारी आपल्यालाच करायची आहे याची जाणीव झाली. त्याच जाणीवेतून ते राजांना म्हणाले.

" आपण पुढील तयारीला लागा. रुक्मिणीच्या इच्छेनुसार कार्य येथेच प्रभासक्षेत्री संपन्न करू.आमचे सर्व नातेवाईक द्वारकेतील समस्त जन यांना येथेच पाचारण करून आमची देखील कार्याची सिद्धता सुरू करतो." 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
१२/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...