श्रीरुक्मिणी स्वयंवर ७१
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
श्रीबलरामाचे वचन ऐकून राजा भीमक संतोषले. कृतार्थ भावात दोन्ही बंधू आणि आपली आत्मजा रुक्मिणी हिच्या कडे कृतकृत्य चेहऱ्याने पाहून दोन्ही हात जोडून दोन्ही भावांना म्हणाले.
" आपल्या या वचनांनी मी शांतचित्त जाहलो. रुक्मिणी म्हणाली ते सार्थ आहे. जिथे प्रत्यक्ष माधवचरण आहेत, तेच परमधाम , परमतीर्थ आणि परमपावन क्षेत्र आहे. तेच पुण्यबीज आहे. तिथेच अर्थात या प्रभासक्षेत्रीच हे इच्छिलेले शुभकार्य संपन्न होवो हीच श्रीइच्छा आहे हे जाणून मागील सर्व हे याच परिणामाचा पूर्वभाग आहे वा होता हे ध्यानात घेऊन आता हे विहित कार्य सुसंपन्न करूया.
या हेतूने आपल्या दोन्ही बंधूंना , जे आता या स्थळी उपस्थित आहेत मी सस्नेह विनवू इच्छितो की , आपण देवकी वसुदेव यांसह समस्त द्वारकावासीयांना येथे आमंत्रित करावे. आम्ही देखील आमची सिद्धता त्वरेने करतो, जेणेकरून हे कार्य लवकरात लवकरच्या सुमुहुर्ती घडेल."
या नम्रतापूर्ण विवेकी आणि भक्तीपूर्ण कथनाने दोन्ही भ्राता कृतार्थ झाले. श्रीबलरामदादांनी रायांचे दोन्ही हात हाती घेऊन त्यांच्या वचनांना अनुमोदन देत पुढील तयारी साठी आपल्या स्थानी प्रस्थान केलं. राजा भीमक यांनी त्वरित सेवकांना आज्ञा दिली.
" सवेगे कौंडिण्यपुरला जाऊन विवाह कार्यासाठीची सर्व सामग्री, पुरोहित यांसह समस्त नगरवासीयांना येथे शीघ्रगतीने येथे या. कार्यास विलंब होणे अनुचित आहे. सेनापतींना आणि मंत्रीगणांना उचित पर्यायी व्यवस्था करून येथे येण्यास सांगा. त्वरित जा आणि सर्वांना घेऊन माघारी या."
राजाची आज्ञा घेऊन सेवक , काही सेवक व सेविकांना घेऊन व काही सेवक सेविका सैनिक यांना ठेवून , त्वरित कौंडिण्यपूर नगराकडे रवाना झाले. इकडे श्रीबलरामांनी आपले सैनिक , सेवक आणि मंत्री पाठवून द्वारकेला सांगावा धाडला. दादांच्या आमंत्रणाचे व निरोपांचे लखोटे घेऊन काही निवडक यादव द्वारकेस पोहोचते झाले. त्याचप्रमाणे राजा भीमक यांच्या सुरक्षेची देखील उचित व्यवस्था करायला दादा विसरले नाहीत.
द्वारकेला या आधीच, दादा विदर्भात रुक्मिणीस आणावयास गेलेल्या कृष्णाच्या मदतीला यादवसैन्य घेऊन गेले आहेत , या वार्तेने काळजी लागून राहिली होतीच. बरेच दिवसात काही समाचार नाही म्हणून चिंतेत असलेल्या द्वारकेतील जन आणि राजपरिवारातील सर्व सदस्य यांना प्रभास येथून दूत समाचार , घेऊन आले आहेत या वार्तेने अत्यंत आनंद झाला. अर्थातच दूतांनी निरोपांचे लखोटे मंत्र्यांच्या माध्यमातून वसुदेवांच्या हाती सुपूर्त केले. वसुदेवांना आमंत्रणपत्रिका रूप ते पत्र वाचून अत्यंत हर्ष झाला. त्यांनी त्वरेने द्वारकेत हा शुभसमाचार पाठवून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी त्वरित निघण्याची व्यवस्था करावयाची आज्ञा केली.
वरील सर्व कार्यवाही दादांनी धाडलेल्या सूचनेप्रमाणे घडली. समस्त द्वारकेत दीपावलीसम वातावरण तयार झाले. सर्वत्र गुढ्या, तोरणे, पताका, सजावटी यांना सुरवात झाली. अर्थातच जे मागे राहणार होते, त्यांनी हे कार्य हाती घेतलं. तर जे प्रस्थान करणार होते, त्यांनी प्रस्थानाची तयारी सुरू केली. मंडळी निघावयास तयार झाली. द्वारकेतून राजपरिवारासह, अनेक द्वारकाजन आपल्या लाडक्या कृष्णाच्या ,कान्हाच्या , गोविंदा, माधव याच्या विवाहाप्रीत्यर्थ प्रस्थान करते झाले.
आनंद पर्व सुरू झाले.
क्रमशः
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
१३/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment