श्रीरुक्मिणी स्वयंवर ७९ (विवाहसोहळा ७)(प्रसंग चोदावा समाप्त)
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
या सर्व स्वादिष्ट पदार्थांचा स्वाद व आस्वाद घेताना वऱ्हाडी इतके मग्न , गुंग आणि दंग झाले की कळीकाळाचाही पाड राहिला नाही. स्वये श्रीकृष्ण इतक्या रुचकर आणि सर्वोत्तम भोजनाच्या तृप्तीचा आनंद घेण्यात हरवून गेले.जिथे ईश्वराची ही स्थिती तिथे सामान्यांची काय कथा.
या सर्व भोजनोत्तर सर्व भोजनांचा प्राण जिरेसाळ भात आणण्यात आला. वाढणाऱ्यांनी एक शीत देखील खाली न सांडता आणि एक खंड देखील न फोडता प्रत्येकाला खंडी खंडी भात वाढला. यावर पदार्थांची महाराणी अर्थात वरांन्न म्हणजेच ज्याला वरण म्हटलं जातं त्या वरान्नाचे वाडगेच्या वाडगे येऊ लागले.
या रुखवताच्या भोजनात लेह्य , पेय आणि चोश्य या सर्व प्रकारचे अन्नपदार्थ करण्यात आले होते. जे पदार्थ जिभेने चाटून पोटात जातात त्याला लेह्य म्हणतात. जे घटा घटा पिऊन पोटात जातं त्याला पेय प्रकार म्हणतात आणि ज्यातील रस चोखून बाकीचा चोथा टाकून दिला जातो त्याला चोश्य प्रकारचं अन्न म्हणतात. अश्या या तिन्ही प्रकारातील आणि नऊ रसातील सर्व भोजनप्रकार यादवांनी रांजणच्या रांजण ,परातीच्या पराती, वाडगेच्या वाडगे रिचवले, अर्थात स्वादामुळेच.
कृष्णासोबत या पंगतीत , भोजनाची अवीट गोडी , रसास्वाद घेऊन खाणारी मंडळी विशेष व बहु असल्यामुळे रुचकर भोजन बनवून वाढण्याचे बळ आणि स्फूर्ती कौंडिण्यपुर करांना अजून अजून चढत होतं. प्रत्यक्ष कृष्ण, स्वादाचा प्रत्येक ग्रासाचा, आनंद घेत श्रध्दायुक्त भावाने आणि करणाऱ्या हातांना दाद देत खात होता.
कृष्णाच्या या समाधानीवृत्तीने अन्नग्रहण करण्याचेच अनुकरण अर्थातच समस्त यादवांनी केलं नसतं तरच नवल. शुद्धमतीच्या , आपल्या जावयाला अर्थात जगतपतीला समाधान देण्याच्या इच्छेखातर प्रत्यक्ष चारी मुक्ती , तीन लोक आणि सप्त स्वर्ग स्वतः शुद्धमतीच्या हाताखाली राबत आहेत. जे अर्थात फक्त श्रीकृष्णच पाहू शकत होता. त्यांना क्षीरसागरात समाधिस्थ असलेल्या भगवंतांच सदेह अवनीवर दर्शन , ते सुद्धा इतक्या जवळून म्हणजे युगायुगात एकदा घडणारा योग , असा योग मुक्ती, लोक आणि स्वर्ग सोडूच शकत नव्हते. अर्थात त्यांना तसं राबताना पाहून श्रीरंग खुलून गेले होते. त्याच आत्मिक समाधानाचं तेज त्यांच्या चर्येवर दिसत होते. कारण त्यांच्या उपस्थितीमुळे भोजन करणारा कोणीही असमाधानी राहणार नाही याची श्रीकृष्णाला देखील खात्री होती.
या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज यांच्या कृपेने चतुर्दश प्रसंग समाप्त होत आहे. पुढे प्रसंग पंचदश.
क्रमशः
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२१/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment