भोग आणि ईश्वर ५२६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
काल आपण हे पाहिलं की, भावात्मक प्रकटन मनाकडून होतं. म्हणजे ज्याप्रकारचे भाव मनात असतील, त्याच प्रकारच्या लहरी मनाकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्याच प्रकारचं कर्म हे काया वाचा बुद्धी व मन यांकडून होतं. याचाच अर्थ आपण असा निष्कर्ष आपण नक्कीच काढू शकतो की, सर्वात प्रथम मनाला, मनाच्या स्थितीला व त्याच्या भावाला सुधारणं जरुरी आहे. एकदा भाव सुधारला की मग, त्या भावाप्रमाणे, त्याला मिळणारा प्रतिसाद अर्थातच त्या भावाकडे आकर्षित होणाऱ्या लहरी देखील सुधारतील.
याची दुसरी बाजू आपण पाहूया. दुसऱ्या अर्थाने जर आपलं मन वा मनाची स्थिती ही सकारात्मक व उत्तम प्रकारची असेल, पण आजुबाजूच वातावरण हे आपल्या मनाच्या विरुद्ध असेल तर, त्या विरुद्ध भावाच्या लहरी, आपल्या मनात प्रवेश करणार नाहीत. कारण जसा भाव तसेच विचार वा विचार लहरी त्या मनाकडे आकर्षित होतात. म्हणूनच ज्यावेळी घरातून, रागावून वु डोक्यात राग घालून आपण बाहेर पडतो,त्यावेळी,तश्याच प्रकारची माणसं वा घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि नेमके त्यात अडकतो आणि दिवसाचा खेलखंडोबा होऊ शकतो.
या सर्व दीर्घ चिंतनातून, एक गोष्ट लक्षात आली असेल, की जस आपण आपल्याबद्दल अपेक्षित असतो, त्याच प्रकारची वागणूक आपण दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा द्यायला हवी, जेणेकरून तशीच वागणूक कर्मफल म्हणून आणि उत्तम भावाला प्रतिसाद म्हणून, आपल्याला मिळू शकते. आता या सर्वातून आपण या मुद्द्याकडे येऊया की, ज्या प्रकारचा प्रतिसाद आपण इतरांकडून आपल्या साठी इच्छितो, त्याप्रकारचं वर्तन आपण इतरांसाठी आधी केलं पाहिजे.
यावरून हेसुद्धा लक्षात आलं असेल की, ईश्वरी कृपेच्या लहरी प्राप्त करण्यात आपणच आपले कसे शत्रू आहोत. कारण आपण आपले भाव, वागणूक, विचार व उच्चार, यावर अपेक्षित लक्ष न देता, ईश्वरी कृपेच्या संदर्भात चुकीचा दृष्टिकोन बाळगतो. उदाहरणार्थ आपण राग द्वेष मत्सर, दुष्टावा अहंकार, गर्व, लोभ, काम इत्यादी भाव त्याग न करता ईश्वर माझ्याप्रती कसा दूजा भाव धरून आहे किंवा मला कायम वेगळं वागवतो.
पण हे आपण लक्षातच घेत नाही की, यामध्ये सर्वस्वी चूक आपलीच आहे. कारण, आपण आपल्या मनातील चुकीच्या भावाने, चुकीचा प्रतिसाद आकर्षित करतो. म्हणूनच चुकीच्या लहरी आपल्याकडून अजून अजून चुका करून घेतात. चुकीची कर्मफल तयार होऊन, त्याच्या फेऱ्यात आपणच स्वतःला या व पुढील जन्मा साठी अडकवून घेतो. यासाठी प्रथम मनातील भाव विचार बदलून, ते सकारात्मक व उत्तम राहतील हे पाहिलं पाहिजे.
ते कसं साध्य करावं आणि त्याने हित कसं साध्य होईल, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. पण नामाला धरून राहण्याचा नेम व नियम पाळत राहून.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment