भोग आणि ईश्वर ५२० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
तुमच्या एक लक्षात आलं का की, अर्पण, शरण आणि स्मरण यापैकी, शरण व स्मरण या दोन शब्दांमध्ये रण शब्द समान आहे, तर अर्पण या शब्दात पण आहे. आता स्मरण या शब्दाकडे वळण्याआधी याचं चिंतन आधी करूया. मग पुढे जाऊया. रण म्हणजे युद्धभूमी, असं क्षेत्र जिथे शत्रूला पराजित केलं जातं. जिथे एखादं संकट वा आपत्ती यांवर विजय मिळवण्यासाठी युद्ध करावं लागतं. म्हणजेच सामना करावा लागतो किंवा दोन हात करावे लागतात.
आता प्रभूची आठवण काढण्यासाठी आणि त्याला सर्व त्यागून लीन होऊन, नतमस्तक होण्यासाठी श रण आणि स्म रण हे शब्द का योजले असतील, त्याचा विचार करूया. श म्हणजे शंकेने व्यापलेले मन जे शत्रूने व्यापलेल्या रणासमान असतं. अश्यावेळी मनातील, जीवनातील बरेचसे प्रश्न असे असतात, ज्यांची उत्तरं प्रारब्ध संचित आणि कर्म यांनाच माहीत असतात आणि बरेचदा प्रश्न हे उत्तराविना सोडवायचे असतात.
याचं कारण म्हणजे, त्यांची उत्तरं येणारा काळ ठरवणार असतो. म्हणून अश्या रणात आपण अस्त्र शस्त्र कोणतं वापरायचं, हे देखील आपल्याला ज्ञात नसतं. म्हणून अश्या शंकायुक्त रणात, एकच मार्ग शिल्लक राहतो. तो मार्ग म्हणजे या जगताच्या, या देहातील आत्म्याच्या स्वामीला शरण जाऊन म्हणजे शंकायुक्त मनातील रण बाजूला ठेवून, आपले सर्व भाव त्या ईश्वराला अर्पण करावे आणि त्याला सतत शरणागत राहण्यासाठी, त्याचं सतत स्मरण करावं.
स्मरण म्हणजे स म आणि रण अर्थात सद्विचार, सद् आचार व सद् वर्तनयुक्त मनाने या रणातील सर्व शत्रूंना परास्त करण्या साठी त्या विधात्याची करुणा भाकणे, त्याची भक्ती करणे. म्हणजे मनातील या रणात अर्थात रणांगणात, अनेक शत्रू उभे असतील, त्यांना नामोहरम करण्यासाठी, सतत ईश्वराशी संपर्कात राहणे, म्हणजे स्मरणे. मनाच्या या रणाला, चिंतन स्मरण शरण व अर्पण या मार्गाने ईश्वराला, मनातील या युद्धात, योग्य अयोग्य ठरवून, योग्य त्या गोष्टीची साथ घेण्याची प्रेरणा देण्याची प्रार्थना करणे.
स्मरण या शब्दात अजून एक अर्थ दडलेला आहे. जीवन हे क्षणभंगुर असल्यामुळे मरण वा मृत्यू कधीही अगदी कोणत्याही क्षणी येऊ शकतो. त्यामुळे या रणात कोणतीही बाजी अर्थात कोणतंही कर्म हे, या जन्मातील शेवटचं कर्म असू शकतं. म्हणजेच प्रत्येक कर्म हे या न्यायाने, शेवटचं असू शकतं. म्हणून घडणारं प्रत्येक कर्म, हे सद् विचाराने, विवेकाने व सद् वृत्तीने व्हावं, यासाठी विधात्याला शरण जाऊन, त्याची सतत आठवण काढत राहणं. जेणेकरून प्रत्येक कर्म हे त्या विधात्याच्या चरणी अर्पण होईल. यावर अजूनही चिंतन अपेक्षित आहे, ते उद्याच्या भागात पाहूया. तोपर्यंत नामाच्या द्वारे त्याचं स्मरण करत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment