भोग आणि ईश्वर ५१७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
स्वाधीन होणं म्हणजे अर्पण होणं. यामध्ये सर्वात मोठा लाभ हा आहे की, आपल्यातील स्व म्हणजेच ग किंवा आताच्या भाषेत इगो, हा आपण पूर्ण स्वाधीन करतो. कारण अर्पण होणं म्हणजे एखाद्याच्या स्वाधीन होणं, यात मूलभूत गोष्ट म्हणजे आपण स्वतःचं अस्तित्व झुगारुन ज्याला आपण स्वतःला अर्पण करतो, त्याचं अस्तित्व आपल्याजागी मानणं किंवा जाणणं, हे अपेक्षित आहे. किंबहुना आपल्यातील देहाचं अस्तित्व सोडल्यास, मन बुद्धी व आत्मा यांचं अस्तित्वशून्य कल्पून, आपल्या आराध्याच्या अस्तित्वात स्वतःला मिसळून टाकणं म्हणजे अर्पण होणं.
स्वतःचा स्वल्पसुद्धा स्व शिल्लक न राहणं म्हणजे अर्पण होणं. वास्तविकपणे अर्पण हा शब्द सहसा एखादी आवडती गोष्ट आपल्या आराध्याला किंवा ईश्वर वा सद्गुरु यांना वाहणं किंवा भेट म्हणून देणं याला आपण अर्पण करणं असं संबोधतो. पण त्यामध्ये, त्या वस्तूवरील आपला मोह, लोभ, माया वा आसक्ती हे काढून घेऊन, ती वस्तू वा पदार्थ आपण, ईश्वर वा सद्गुरू यांना भेट म्हणून, त्यांच्या चरणी ठेवतो.
ईश्वराचं सगुण अस्तित्व आहे हे गृहीत धरूनच अश्या गोष्टी म्हणजे प्रसाद वा नैवेद्य किंवा भोग म्हणून वाहिल्या किंवा अर्पिल्या जातात. म्हणजे आपल्याप्रमाणे ईश्वर ही एक सगुण साकार व्यक्ती आहे, हे समजून वा मानून आपण, एखाद्या देहप्राप्त व्यक्तीला काही भेट द्यावी, नैवेद्य द्यावा, त्याप्रमाणे ती वस्तू वा एखादा अन्नपदार्थ अर्पण करतो. म्हणजेच त्या वस्तूवर वा पदार्थावर आपला असलेला हक्क किंवा मन काढून घेऊन, ते सदर शक्तीच्या स्वाधीन आपण करतो.
याचाच अर्थ आपण त्यावरील आसक्ती व इच्छा काढून घेतल्या वर मगच ती, त्या देवतेला वा शक्तीला अर्पण करतो. थोडक्यात, जेंव्हा एखादी गोष्ट अर्पण करायची असेल, तेंव्हा मन, त्या वस्तूवरून काढून घेणं किंवा असक्तीविरहीत होणं हे आवश्यक आहे. आता यावरून लक्षात येईल की देवाला प्रसाद, भेट वा स्व अर्पण करताना, त्यावरील।आपला असलेला हक्क काढून घेणं महत्वाचं आहे.
Contract Act च्या कायदेशीर भाषेत सांगायचं तर, it is transfer of interest in a thing or self, infavour of our beloved entity called either God or Sadguru. म्हणजेच एखाद्या वस्तूवरील आपली आसक्ती नष्ट करून, तिथे त्या दैवताची वा सद्गुरूंची आसक्ती निर्माण करणं किंवा स्थापित करणं.
याचाच पुढील अर्थ, जरी ती चीजवस्तू वा स्व वस्तू म्हणून किंवा देह म्हणून, आपल्या ताब्यात असेल तरीही, त्याची मालकी ही सद्गुरूंची वा देवाची आहे, हे मनाने व मनापासून मानणं. याचा अजून गर्भित व गहन अर्थ हा आहे की, आपण ज्यावेळी स्व हा सद्गुरू वा भगवंत यांच्या सुपूर्द करतो, त्याक्षणापासून आपण आपले राहातच नाही.
आपल्यावरील आपला हक्क, पूर्णपणे संपतो. याचाच गहनार्थ वा गुह्यर्थ हा की अर्पण केल्या क्षणी आपण फक्त आणि फक्त त्यांचाच विचार करायला बांधील होतो. तरच ते अर्पण होणं, सार्थ ठरतं. अर्पण या शब्दाचा अर्थ गहनार्थ, गुह्यर्थ जाणून घेतल्यावर आता सुपूर्द स्वाधीन व अर्पण हे आपण योग्य प्रकारे अंमलात आणूया. उद्या पासून आपण शरण जाणं म्हणजे काय हे चांगल्याप्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. पण नामाचं कार्य सुरू ठेवूनच पुढे जात राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment