भोग आणि ईश्वर ५२७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
खरं पाहिलं तर मनातील भाव बदलला की, सर्व त्या भावानुसार बदलत जातं. कदाचित संचित आणि प्रारब्ध यांच्या कर्म पुंजी नुसार प्रत्येकाला यामध्ये वेगवेगळा वेळ किंवा काळ लागू शकतो. पण एकदा एखादा मार्ग योग्य आहे, हे लक्षात आलं की, त्या मार्गावर पुढे जाणं इतकंच आपल्या हातात आहे. तेवढं आपण नेटाने करू शकतो. पण आणि हा पण महत्वाचा आहे. कारण हे करणं इतकं सहज असतं तर इतके अनंत ऋषीमुनी, संतं महंत यांनी पूर्ण आयुष्य, त्यासाठी खर्ची घातलं नसतं.
म्हणजेच यामध्ये काहीतरी गुह्य असणार, ज्यामुळे, ही गोष्ट वा हे कर्म वाटतं तितकं सहज शक्य होत नसेल. याचं कारण काय, याचं चिंतन करता हे लक्षात येईल की, या सर्व गोष्टी तेंव्हाच साध्य होतील, जेंव्हा मनाला हे पटेल आणि ते मन, त्यासाठी आवश्यक कर्म म्हणजे नित्य कर्में नेमाने व नेटाने देह, बुद्धी व वाचा यांच्याकडून करवून घेईल. म्हणजे पुन्हा आपण एका प्रश्नावर आलो.
याचं उत्तर अनेकांनी अनेक प्रकारे देऊन लिहून, कृतीतून दाखवून, जगून आपल्याला दिलं आहे. स्वतः भगवंतांनी त्याबाबतचा सर्वात सोपा मार्ग श्रीमद् भगवदगीतेत मांडून ठेवला आहे. अनेकांनी तो अनेकप्रकारे आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी अनेक प्रयास केले आहेत.यातील योग याग अष्टांग साधने, मंत्र तंत्र आदी विद्या, या महत्प्रयासाने साध्य होणाऱ्या आणि साध्य होऊन सिद्धीप्राप्ती झाली तरी, त्या टिकवून ठेवण्यासाठी, पुन्हा सतत मेहनत व जागरूकता आवश्यक असणाऱ्या आहेत.
त्यातही, त्यातील काही अगदी लहान वयात सुरू केल्या तरच, पूर्णत्वास जाऊ शकणाऱ्या आहेत. म्हणजे सर्व सामान्य मानवा साठी ईश्वप्राप्तीसाठी, मनःशांती साठी, उचित भाव प्राप्ती करून, त्यातून योग्य लहरींपर्यंत पोचण्यासाठी ईश्वरावरच अवलंबून राहावं लागणार. पण अश्या कृपेला व ती प्राप्त व्हायला, संचीता तील सारी कर्मफलगती सुधारणं अत्यंत आवश्यक आहे.
बरं त्या कर्मगतीत शिल्लक कर्म किती आहेत आणि अजून किती कर्मांची भर त्यात पडत राहणार आहेत, हेदेखील विधाता जाणे. पण यातून सुटकेसाठी काही मार्ग काही यंत्रणा नसणार हे संभवत नाही. कारण प्रत्येक मार्गाला काही विकल्प किंवा इतर मार्ग असतात, हा विश्वाचा नियम आहे. तसा मार्ग, ज्यायोगे आपण मनाचा वारू नियंत्रित करून, मनातील भाव नेटके करून, पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय यांना स्वनियंत्रणात ठेवून, अनुचित विचार व कर्म यांचा त्याग करून, फक्त उचित कर्में करत राहून, मोक्षमुक्तीच्या अंतिम उद्देशापर्यंत मार्गक्रमण करू शकतो.
यासाठीचे तीन मार्ग अर्पण, शरण व स्मरण यांच्यातील, अर्पण व शरण यावर आपण दीर्घ चिंतन मागेच केलं आहे आणि स्मरणाच्या चिंतनात मनाच्या स्थिती व भाव यावर विचार करत इथपर्यंत आलो आहोत. म्हणूनच यातील स्मरणासाठी आवश्यक भावस्थिती जाणून घेण्यासाठी, उद्याच्या भागात पुढे चिंतन करूया. त्यासाठी ईश्वराच्या नित्य स्मरणात रममाण होऊया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment