भोग आणि ईश्वर ५३० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनाला कोणतीही गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य ईश्वराने बहाल केलं. त्याचबरोबर, त्याला मोह लोभ इत्यादी शापसुद्धा सोबत दिले. त्यांना शाप की वरदान काय म्हणायचं, हे त्या मनाचा वापर माणूस कसा करतो, त्यावर ठरतं. पण माणसाला ते कळण्याचं तंत्र जाणीव या रूपात ईश्वराने दिलं. जाण, जाणीव या प्रगल्भ झाल्या की, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि कर्म व कर्माचं तंत्र हळूहळू कळायला लागतं. पण मन हे सर्व आकलन करतं ते ज्ञानेंद्रियांचा वापर करून. म्हणजे एकप्रकारे ही ज्ञानेंद्रिय मनाचे मदतगार किंवा सहाय्यक आहेत.
यांच्याशिवाय, मनाला बाहेरचं जाणणं शक्य नाही. पण मनाची स्वतःची काही धारणा असते वा जाणीवा असतात. त्याआधारे, बाहेरून आकलन झालेल्या गोष्टी, मन आपल्या धारणेवर पडताळून पाहतं. ज्ञानेंद्रिय फक्त, माहिती, घटना, संवाद इत्यादी गोष्टी मनापर्यंत पोचवतात. या धरणांमुळे एकाच गोष्टीचं आकलन दोन वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या प्रकारे करून, त्याचं अनुमान त्यानुसार काढतात.
म्हणून प्रत्येकाची विश्लेषण पद्धत वेगवेगळी असते. यामध्ये त्या ज्ञानेंद्रियांचा दोष काही नाही. तोच प्रकार कर्मेंद्रियांचा.वास्तविक त्यांना जी आज्ञा मेंदू देतो, त्यानुसार ती कर्मेंद्रिय कार्य वा कर्म पार पाडतात. वास्तविक देहाची मालकी, कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय या दोहोवर आहे. जोपर्यंत बुद्धी किंवा सर्वार्थाने देह कर्मेंद्रिय चालवत असतो, बुद्धिनुसार, कर्मेंद्रिय कार्य करतात आणि सहसा, चुका घडत नाहीत. मन मेंदूला सल्ला देतं, मेंदू स्वतः त्यावर तर्कवितर्क करून, कर्मेंद्रिय कामाला लावून, कार्य सिद्ध करतं.
ज्यावेळी मनातील प्रचंड ऊर्जा व शक्ती, या, बुद्धीला काबीज करून, त्यावर नियंत्रण मिळवतात, त्यावेळी कर्मेंद्रिय मनाच्या ताब्यात जातात आणि मनाच्या आज्ञेनुसार वागायला लागतात. इथे मनाला मिळालेल्या स्वायत्ततेचा गैरवापर होतो. म्हणजे मनात आलं म्हणून रस्त्याने जाताना, मी एखाद्याच्या कानाखाली मारली, तर नक्कीच मलाही मार खावा लागणार. म्हणजे मनाला हे स्वातंत्र्य वा स्वायत्तता, वापरायची मुभा वा सुट किती व काही द्यायची हे बुद्धीला ठरवावं लागेल.
पण ज्यावेळी हे काम बुद्धी करत नाही किंवा बुद्धीच्या हातून, लगाम सुटतो, तेंव्हा मन कर्मेंद्रिय ताब्यात घेतं. पण विवेकाची चावी, बुद्धीच्या ताब्यात असल्यामुळे, जेंव्हा हा विवेक बुद्धीच्या हातून गायब होतो, मन उत्शृंखंल होतं. याची तुलना घटनेतील स्वायत्तता या अधिकाराशी करता येईल. ही स्वायत्तता कशी कुठल्या क्षेत्रात द्यायची, हे केंद्र आणि राज्य मिळून ठरवतात. यात योग्य अयोग्य यांची मर्यादा ही प्रसंगानुरूप ठरते. पण जर असं काही बंधन सरकार घालत नाही, त्यावेळी या व्यक्ति स्वातंत्र्याचं उल्लंघन होण्याचे प्रकार घडतात.
म्हणून या देहाच्या, मनाच्या, बुद्धीच्या स्वायत्ततेचा अजून खोलात जाऊन, संबंध, साखळी, मर्यादा व उल्लंघन याबाबत उद्याच्या भागात विचार करूया. पण तोपर्यंत नामाने मनाला मर्यादा घालण्याचा नेम सुरूच ठेवूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment