भोग आणि ईश्वर ५२४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कालच्या विषयातील उदाहरण आज पुढे सुरू करूया. काही आत्मे, प्रगत देशात काही अतिप्रगत देशात काही विकसनशील देशात तर काही मागास देशात देहप्राप्ती करतात. यात कर्माच्या गतीचा संबंध कसा येतो हे पाहू. साधा विचार करा, काही जण भारतासारख्या लोकशाही देशात स्वातंत्र्यप्राप्ती नंतर जन्म घेते झाले, आताच्या काळात.
जिथे सर्वकाही करण्याचं इच्छित स्वातंत्र्य आहे. पण काहीजण हुकूमशाही देशात किंवा हुकूमशाही व्यवस्थेत जन्म घेतात, जिथे बोलणं, काम करणं, पाहणं अश्या सर्वांसाठी कडक नियम, निर्बंध आणि अतिकृर शिक्षा आहेत. जसं सीरिया, लिबिया, यांसह आफ्रिका व मध्या शियातील काही हुकूमशाही देश किंवा उत्तर कोरिया सारखा देश किंवा चीनसारखा एकतंत्रि व्यवस्था असलेला देश. अश्या प्रांतात त्यांचाच जन्म होतो वा होईल, ज्यांची कर्मगती अतिशय खडतर आहे. कारण अश्या प्रांतात, प्रत्येक श्वास हा, दुसऱ्याच्या आदेशावर।अवलंबून आहे.
आता अश्या प्रकारच्या व्यवस्थेत जन्म झाल्यावर, आयुष्य आहे तोपर्यंत किंवा ती व्यवस्था संपेपर्यंत जगणं इतकंच तिथल्या व्यक्तींच्या हातात उरतं. म्हणजेच कुठेतरी पूर्वकर्म, संचित, प्रारब्ध, त्या प्रारब्धाने प्राप्त होणारे भोग, या सर्वांवर विश्वास ठेवावाच लागतो. कारण जन्म व मृत्यू या दोन गोष्टी विधात्याने अश्या पद्धतीने रचल्या आहेत आणि एकमेकांत गुंफल्या आहेत की, ही साखळी कर्माशी सुत्रबद्धतेने जोडली आहे.
यात सुज्ञ व सुजाण जनांना कर्मगतीने व विशिष्ट साधनेने, यातील मर्म लक्षात येत गेलं. कदाचित हासुद्धा ईश्वरी व्यवस्थेचा भाग असेल, जेणेकरून यातील गुह्य, गहनता लोकांपर्यंत पोचून, त्यांना कर्मगतीत सुधारणा व त्याद्वारे कर्मफल व्यवस्थेत चढती कमान हळूहळू साधता येईल. यात एक सूत्रबद्ध तत्व यासाठी जाणवतं की,आपणही अशी मांडणी शालेय जीवनात अनुभवली असेल.
जसं, गुणांच्या श्रेणीनुसार, जर वर्गव्यवस्था असेल तर, कमी गुण असणाऱ्या तुकडीत,शाळा व्यवस्थापन जाणून बुजून काही हुशार विद्यार्थ्यांना सामील करते. ज्यामुळे कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून, त्यांच्या गुणश्रेणीमध्ये वाढ होईल. त्याचा योग्य परिणाम बरेच वेळा दिसून येतो. याच धोरणा नुसार भूलोकीच्या व्यवस्थेत, ईश्वर, असे काही उच्च श्रेणी प्राप्त प्रगल्भ, उन्नत उध्दारीत जिवात्मे येण्याची व्यवस्था करतो, ज्यायोगे, आपल्यासारख्या आत्मिक व आध्यात्मिक दृष्टीने अप्रगत जीवांच्या उद्धाराचा मार्ग निर्माण होईल.
यातून जे आत्मे प्रेरित होऊन, ज्ञानप्राप्तीने उन्नत व उद्धरीत होतील, त्यांना पुन्हा, त्या व्यवस्थेनुसार, जगतात, जडजीवांना प्रेरित करून, आत्मउध्दार व आत्मउन्नती यांचा मार्ग सांगण्या साठी वा जगून दाखवण्यासाठी याच व्यवस्थेत पाठवतो. बर या सर्वात ईश्वर आपल्या स्वतःच्या नियमात वा जगतात ढवळा ढवळ करतो, अश्यातला भाग नाही.
कारण तशी शंका मनात येऊ शकते. पण हादेखील ईश्वरी ब्रह्मांड व्यवस्थेचाच भाग आहे. ज्यायोगे असे प्रगत जिवात्मे आपल्याच कर्मगतीनुसार, या जगतात पुन्हा पुन्हा येऊन, या जगातील जडजीवांना प्रेरित करून, आत्मउद्धाराकडे घेऊन जातील.
याच विषयावरील, यापुढील चिंतन आपण उद्याच्या भागात पाहूया आणि तोपर्यंत आपण ईश्वर स्मरणाचा अभ्यास करतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment