Skip to main content

भोग आणि ईश्वर ५१८

भोग आणि ईश्वर  ५१८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

ज्याप्रमाणे अर्पण होणं ही खरी आणि योग्य संज्ञा आहे, त्याप्रमाणे, शरण जाणं, ही योग्य स्थिती आहे. खरंतर शरण या विषयावर, अनेकांनी अनेकदा लिहिलंय आणि मी स्वतःदेखील या मालिकेत, याआधी, शरण या विषया वर, विषयानुरूप लिहिलं आहेच. पण आता पुन्हा विषयाला धरून आणि अर्पण, शरण आणि स्मरण या संदर्भात, पुन्हा एकदा लिहिण्याचा मोह आवरता येत नाही. 

शरण जाणं, ही कृती किंवा संज्ञा मुख्यतः रणात आपल्यापेक्षा शक्तीवान वा बलवान शत्रूशी युद्ध करताना, पराभूत होऊन, पूर्ण नामशेष होण्याची शक्यता वा वेळ आली असेल, तर अक्कल हुशारीची गोष्ट किंवा डाव पेचांचा भाग म्हणून योजली जाते आणि अवलंबली जाते. यामध्ये मुख्य सूत्र असतं सर्वनाशे समुत्पन्ने. अर्धं त्यज्यती पंडित: म्हणजेच जेंव्हा आणि जिथे किंवा आयुष्यात, रणात ज्यावेळी सर्वनाश होण्याची स्थिती निर्माण होते, त्यावेळी अर्ध्यावर पाणी सोडून देऊन, बाकीचं व जीव वाचवणं, हा पुरुषार्थ किंवा बुद्धीची गोष्ट किंवा उत्तम विचार गणला वा मानला जातो. 

म्हणजेच शरण जाणं हे एकप्रकारे काहीतरी वाचवण्या साठी आणि काहीतरी त्यागण्यासाठी करण्यात येणारी, एक कृती आहे किंवा असते. आता सहसा ही स्थितीत आल्यावर किंवा असा काळ उद्भवल्यावर, माणूस आधी सर्व शक्यता तपासून पाहतो, सारासार विचार करून पाहतो. त्यानंतरच, अश्या प्रकारची त्यागाची कृती व शरण जाण्याचा विचार करू शकतो. म्हणजेच तो सर्वार्थाने शेवटचा उपाय आहे हे लक्षात आल्यावरच अशी कृती घडते. 

आता वरील चिंतनातून, एक गोष्ट लक्षात येईल की, शरण जाण्यात दोन गोष्टी अंतर्भूत होतात किंवा दोन कृती अपेक्षित असतात. एक म्हणजे त्याग आणि शरण. मुळात रणांगणावर अपेक्षित कृतीचा संबंध अध्यात्मिक वा आत्मिक पातळीवर का जोडला गेला असेल, याचा शोध घेऊ. रण म्हणजे असं क्षेत्र जिथे शत्रूंशी झुंझावं लागतं आणि असामान्य परिस्थितीवर मात देण्या साठी अनेक गोष्टी कराव्या वा करवून घ्याव्या लागतात. 

या भूलोकी, पंचमहाभूतरुप देहात, हृदयस्थ वसलेलं आत्मरूपी तत्व, या देह, बुद्धी व मनरुप रणांगणात, याच तीन आयुधांचा वा सैनिकांचा उपयोग करून, या जीवन रूपी युद्धात, काळ, कर्मफल यांच्याशी सामना करताना, काही मिळवतो आणि बरच काही गमावतो. मिळवतो पाप वा पुण्य. पण गमावतो, काळ, वेळ, देह इत्यादी अनेक गोष्टी. यात शत्रू अनेक आहेत. माया, षड्रिपु, हे मुख्य दुर्जन. पण यामध्ये, त्यांच्या नादी लागून, त्यांनाच साथ देणारे, स्वकीय अर्थात, देह बुद्धी व मन. हे तीन स्वकीय बरेचदा, आत्मा सोडून अर्थात आत्मन सोडून, माया व षड्रिपु यांच्या आधीन होऊन, नित्य या आत्म्याला जन्ममृत्युच्या सापळ्यात अडकवून जातात. 

कर्म तर देह, बुद्धी, मन व वाचा करतात. पण त्याचे परिणाम हा वा पुढील अनेक देह व मन भोगतात. हा खेळ नित्य, अविरत, युगेयुगे सुरूच राहतो. या युद्धाचा अंत तेंव्हाच होतो वा होऊ शकतो जेंव्हा, आत्मरूपी अर्जुन परमांशरूप परम आत्म्याचा आवाज ऐकून, त्याच्या आज्ञेनुसार कर्म करत पुढे जात राहील. पण असा परम आत्मा, संपूर्ण शरणागत झाल्याशिवाय हाती लागत नाही. म्हणजेच या किंवा कोणत्यातरी जन्मात त्याला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण या देह मन बुद्धी यांचा लगाम, माया व षड्रिपु यांच्या हाती देऊन कर्मफल रूपी सागरात हरवत जाऊन, नाश पावण्यापेक्षा, परमांश रूप आत्म्याच्या हाती हाच लगाम देणं, हाच खरा पुरुषार्थ आहे. 

शरण जाण्यावर आपलं चिंतन उद्याच्या भागात सुरू ठेवू, पण नामाच्या माध्यमातून क्षणक्षण शरण जाण्याचा योग साधत पुढे जात राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...