भोग आणि ईश्वर ५३५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
याचं कारण, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असलेला हा ईश्वर, प्रत्येक देहात व निर्जीव वस्तूंमध्येसुद्धा आपल्या अंश रुपाने स्थित आहे. अनेकरुपात व्यक्त होऊनही, त्या प्रत्येक रूपात प्रकट झालेला ईश्वर, त्या त्या देहाचं भिन्नत्व मन व बुद्धीरूपात टिकवून, वृत्ती रुपात ती भिन्नता प्रकट करतो. म्हणजे आत्मारुपात असणारं निर्गुणत्व पंचमहाभूतरूपात सगुण साकार करतो.
ही,सर्व रूपात सर्व देहात प्रकट असलेला अंततः एकच असण्याची खूप मोठी साक्ष "एकोहं द्वितीयो नास्ती" या सार्थ वचनात त्याने मांडून ठेवलं आहे. माझ्यामते हे जगत भगवंताचं
प्रकट चिंतन आहे. चिंतन हे मनात केलं जातं आणि ते निर्गुण असतं. म्हणजे त्या चिंतनाला देह नसतो, तर विचार लहरी यास्वरुपात आपण हे चिंतन मनात करतो. पण ज्यावेळी हे अप्रकट चिंतन,वाणीरूपात, चित्ररूपात, शब्दरूपात, भाव रुपात प्रकट होतं, त्यावेळी त्या चिंतनाला सगुणत्व प्राप्त झालं असं म्हणता येईल.
हे जगत म्हटलं तर सगुण आणि म्हटलं तर निर्गुण आहे. ईश्वराच्या चिंतनात अप्रकट असणारं हे विश्व ब्रम्हरूपात साकार झालं. ब्रम्हरुपात साकारल्यानंतर, त्या ब्रम्हरूपाने ईश्वराच्या चिंतनातून प्राप्त आदेशानुसार, ईश्वराच्या मना तील निर्गुण भाव आणि रूप गुणातीत असलेलं ब्रम्हांड, सगुण रूपात साकारून, परब्रम्ह परम ईश्वराला समाधान मिळवून दिलं.
या ब्रम्हरूपाने साकारलेल्या जगताला पाहून सुखप्राप्ती झालेल्या ईश्वराने, पुन्हा आपल्या चिंतनातून, या ब्रम्हरूप जगताचा कारभार सुरळीत चालण्यसाठी, सर्व व्यवस्था निर्माण करवून घेतली.ही ईश्वर निर्मित व्यवस्था, काळाचा युगांचा, त्यातील क्षणाक्षणातील बदलांचा विचार करून घडवण्यात आली होती. अनेकत्वातून एकच असलेल्या या जगतात, अनेक प्रकारच्या देहातून अनंत प्रकारच्या वृत्ती आपलं सगुणत्व दाखवून, जगतातील लहरींच्या स्वरूपात भार वाढवत जातात.
या भारालाच हलकं करण्यासाठी, ईश्वरी हृदयातून जगत कल्याणार्थ उत्तमोत्तम आणि शुभ सांकेतिक लहरी नित्य, या जगतात, या भाराला नष्ट करण्याचा किंवा त्यांना शक्ति हीन करण्याचा प्रयत्न करतात. हा भार कमी अधिक होत राहतो. ज्या ज्यावेळी हा भार प्रमाणाबाहेर जातो, त्या त्या प्रत्येक वेळी, ईश्वर आपल्या लहरींच्या माध्यमातून आपल्या चिरंतन अस्तित्वाची साक्ष जगताला पटवून देतो.
माझ्या मते सध्या, ज्याप्रकारे विघातक आणि विधायक शक्तींचा संघर्ष जगात सर्वत्र नित्य पण सध्या वेगवान पद्धतीने होताना दिसतोय. ज्यावेळी अशी अशांत आणि असुर सहाय्य परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी ईश्वरी हृदयातून निर्माण होत असलेल्या शुभ संकेत लहरी, अति प्रमाणात निर्माण होऊन, हा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतात.
यावर अजून चिंतन उद्याच्या भागात करूया. पण तोपर्यंत नामाच्या माध्यमातून, या ईश्वरी लहरी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment