भोग आणि ईश्वर ५२८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
अर्पण शरण आणि स्मरण, या त्रयीचा विचार करताना, एक गोष्ट त्वरित लक्षात येते की, तिन्हीचा संबंध किंवा धागा हा मनाशी बांधला आहे. म्हणजेच हे तिन्ही घटक मनाला कुठे ना कुठे तरी एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतात. किंवा त्यांचा तोच उद्देश आहे. याचं कारण म्हणजे मन हे सहजासहजी कोणत्याही बंधनात बांधलं जाऊ इच्छित नाही. त्यामुळे जर त्याला मुद्दामहून काही यमनियम वा नियंत्रण घालण्याचा केलेला प्रयत्न बरेचदा फोल ठरतो.
कारण मन हे मुळातच उत्शुंखल असतं. त्याला बंधनाची मर्यादा रुचत नाही आणि झेपतही नाही. जितकी त्याला नियमांची सवय लावण्याचा प्रयत्न करू, तितकं ते मन अजून अनियंत्रित होत जातं. उदाहरणार्थ जेंव्हा आपण प्रयत्नपूर्वक वा नियमाने, त्याला एखाद्या अभ्यासाला लावण्याचा प्रयत्न करू, तितकीच उसळी मारून, ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल.म्हणजे अनियंत्रित वागणूक वा वागणं,हा त्याचा मूळ स्वभाव आहे.या मूळ स्वभावाला ज्यावेळी मुरड घालावी लागते, त्या त्यावेळी, ते मन प्रतिक्षिप्त क्रिया किंवा प्रतिक्रिया देत.
याचं मनाच्या मूळ स्वभावाला जर नियंत्रित करता आलं, किंवा योग्य मार्गाकडे वळवता आलं, तर त्याला उत्तम मार्गावर नेता येईल. एकदा उत्तम मार्गावर जाऊन बघितलं की, मनाची शांती म्हणजे काय हे कळेल आणि ती मिळवून, टिकवण्यासाठी, माणूस सर्वतोपरी प्रयत्न करेल. याचसाठी यमनियम यांसह शास्त्रीय व शास्त्रोक्त मार्ग आहे किंवा सर्वसामान्य माणसासाठी ईश्वराने स्वतः आखून दिलेला, आश्वासक, सहजसुलभ मार्ग म्हणजे, अर्पण शरण व स्मरण.
याचं मार्गावर मनाला मार्गस्थ करण्यासाठी, मनाला मात्र काही त्याग करायची सवय लावावी लागेल. त्याग म्हणजे काय तर काही त्याज्य भाव कृती अर्थात कर्म हे पूर्णपणे सोडून द्यायची आहेत. असे भाव वा अशी कर्म कोणती तर, ज्यांयोगे मन अती क्रोध, अती काम, अती लोभ, अती मोह यात सापडत ती. कारण हे शत्रू अती अती करून सर्व कर्मांची माती करतात. मग यातून चुका, पुन्हा भोग, पुन्हा अजूनच चुका आणि सरतशेवटी भोगातच अंत, हे चक्र आत्म्याला ग्रासून टाकतं.
याचं चक्राचा भेद करण्यासाठी, मनाला या सर्व अतीच्या असुरांना नामोहरम करण्याची सवय हळूहळू लावावी लागेल. यासाठीच अर्पण व शरण या माध्यातून वा सवयी तून काही अनावश्यक व काही अनिष्ट सवयी सोडून द्याव्या लागतात. त्या ईश्वराला अर्पून आपण त्या भावात त्याला शरण जावं. या शरण साधनेत, ईश्वराला स्मरत गेल्यास, मनातील अनेक त्यागण्या योग्य भाव, विचार नष्ट होतात.
मुळात मन हे असं इंद्रिय आहे की जे, इतकं विशाल होऊ शकतं, ज्यामुळे कितीही मिळत गेलं तरी ते या मनाच्या भुकेमध्ये स्वाहा होऊ शकतं. मनाच्या या गुणाला किंवा वृत्तीला आसक्ती म्हंटलं जातं. या आसक्तीतून, काही चांगली तर काही वाईट कर्म घडतात. पण या चांगल्या वाईटाचा तोल वा ताळमेळ मानवी मनाला साधेलच असं नाही. म्हणून अर्पण, शरण व ईश्वर स्मरण या त्रिसुत्रितून हा ताळमेळ साधला जातो.
या ताळमेळा बद्दल आपण उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत नामाचं औषध घेतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment