भोग आणि ईश्वर ५३२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
विवेकाने आणि विचाराने वागणं म्हणजे मनाला पूर्ण नियंत्रणात ठेवून वागणं. कारण विचारी आणि विवेकी मन, प्रत्येक गोष्टीचा पूर्ण जाणिवेने आणि सखोल विचार करतं. त्यामुळे, प्रत्येक कृती वा कर्म हे परिणाम विचारत घेऊन केलं जातं. तरीही त्या कर्माच्या परिणामात मन गुंतत नाही. विचार सुद्धा पूर्ण क्षमतेने केले जातात आणि जाणीवा नेहमी जागृत असतात.
जागृत जाणीवा परिस्थितीचं योग्य आकलन करतात. प्रत्येक क्षणी त्या जागृत असतात आणि ऐन मोक्याच्या क्षणी त्या पूर्ण सक्षमतेने मनाला बुद्धीला मार्गदर्शन करतात. म्हणून विचार पूर्वक केलेली कृती वा कर्म सहसा पश्र्चाताप करायला लावत नाही, परिणाम काहीही येवो. आता असं विचारी व विवेकी असायला मनाला शांत आणि स्थिर ठेवणं गरजेचं आहे. जे मन नित्य शांत आहे आणि जे कठीण परिस्थितीतसुद्धा आपला तोल जाऊ देत नाही, तेच शांत मन म्हणता येईल.
मनाला शांतता अनेक कारणांनी मिळू शकते. पण त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आसक्ती कमी करणं, विचारांची अस्थिरता हळूहळू नियंत्रणात आणून त्यांना स्थिर करणं, गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न मनापासून करणं. पण जरी गोष्टी, कर्म वा निर्णय नियंत्र णाच्या बाहेर गेले, तरी त्याबाबतच्या अन्य विकल्पांचा विचार आधीपासूनच मनात योजून ठेवणं. मनाला सातत्याने आग्रहपूर्वक, एकाच गोष्टीचा विचार करत राहण्याची सवय लावत जाणं.
म्हणजे जेणेकरून, मनात विचारांचं काहूर माजणार नाही. कारण डोक्यात वा लोकांत, ज्यावेळी गर्दी होते, त्यावेळी ती नियंत्रणात आणणं अशक्य होऊन बसतं. म्हणून सुनियोजित विचार करण्याची मनाला सवय लावून घ्यावी. यासाठी चित्त स्थिर राखण्याचा प्रयत्न करत जावा. प्रत्येक प्रश्नावर वा गोष्टीवर विचार करण्याआधी दोन चार मिनिटं, स्थिर आणि शांत बसून,मनातील विचार स्थब्ध किंवा एकाग्रित करण्याचा प्रयत्न करावा.
यासाठी नामस्मणाचा किंवा ध्यान धारणे सारख्या तंत्रांचा आधार घ्यावा. एक लक्षात घ्या, ध्यान धारणा, जप मंत्र, स्तोत्र इत्यादी उत्तम अशी mind control techniques आहेत. कारण सर्व चांगल्या वा वाईट गोष्टींचा मार्ग हा मनातून जातो. अगदी नराचा नारायण करण्याचं सामर्थ्य मनामध्ये आहे. मनात आणलं तर, हा वाक्प्रचार त्यामुळेच वापरला गेला. It is mind that gets everything done from brain and body. म्हणून मन जितकं स्थिर शांत तितकंच देह व बुद्धी यांचा सदुपयोग होऊन, जीवनात अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात.
शांतपणे विचार करण्याची मनाला सवय लागली की, योग्य व अयोग्य याचा मन विचार करायला सुरवात करता. तिथेच विचारातून विवेकाकडे वाटचाल सुरू होते वा करता येते. यावर अजून सखोल विचार उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामातून स्थिरतेकडे जाण्याचा प्रयत्न करू.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment