भोग आणि ईश्वर ५४१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
प्रत्येक जीवांश मुक्त होऊन, पुन्हा परम अंशात विलीन व्हावा, ही ईश्वराची, ब्रम्हांड रचनेवेळची इच्छा होती आणि कल्पांतापर्यंत ती असणार. पण सर्व स्थळी, सर्व काळी आपण उपस्थित राहू शकणार नाही,या अपरि हार्यतेतूनच, सद्गुरू तत्वाची निर्मिती झाली. कारण इश्वरेच्छा बलीयसी, हे तर सत्य वचन आहेच. म्हणून या ईश्वराच्या प्रतिनिधींना या जगतात, सामान्य माणसाच्या कल्याणार्थ धाडण्यात आलं. किंबहुना त्यांचं अस्तित्व हे जगतजीवन सुलभ, सुसह्य करून, मुक्ती व मोक्ष मार्गाची वाट साध्य करून देणं, यासाठीच आहे.
पण यासाठी आवश्यक तयारी प्रत्येक जीवाकडून, करून घेणं, हे महद् कार्य या भूतलावर, अव्याहत, म्हणजे काळाच्या आदी पासून ते कल्पाच्या अंता पर्यंत, निरपेक्ष भावनेने, निष्काम कर्म योग्या प्रमाणे करण्यासाठी, चैतन्य रूप ते मानवी देह धारण करण्याची शक्ती, सिद्धी, पात्रता मिळवण्यास योग्य असलेले, परम साधक, गुरू तत्वाचे आद्य श्रीदत्तगुरू यांच्या परम कृपेने, गुरुपद प्राप्ती करतात.
यासाठीची घोर साधना, तप, त्याग, वैराग्य, निष्ठा, ध्येयासक्ती हे सर्व काही साध्य करायची ज्यांची तयारी आहे, असे आत्मे, ईश्वरी कृपेने घडतात. पण यामध्ये अवतारी व नरातून परम पदाला पोचलेले साधक, असे ढोबळमानाने दोन प्रकार म्हणता किंवा गणता येतील. जे अवतारी लोकोत्तर पुरुष असतात, ते प्रत्यक्ष ईश्वराचा अंश, चैतन्य स्वरूपातून, देहरुपात प्रकट होतात.
यांच्या चैतन्य शक्तीमुळे, अनेकवेळा, निसर्गाचे नियम यांना बद्ध करू शकत नाहीत. हे ईश्वरी स्वरूपातील असल्यामुळे, माया, शड्रीपु हे, यांच्या आज्ञेत असतात. त्यामुळे, आपल्याला मायेमुळे अगम्य व गुह्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी, यांना लीलया साध्य व वश असतात. आपण मायेच्या प्रभावामुळे अश्या गोष्टींना, कृत्यांना, कर्मांना चमत्कार म्हणतो किंवा लीला म्हणून संबोधतो.
यांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त असल्यामुळे, यथा योग्य कारणांसाठी त्यांचा वापर करून, जनहित साधणं वा भक्तांचं कल्याण व रक्षण करणं, यांच्यासाठीच केला जातो. तरीही होता होईल तितकं, चमत्कार वा लीलेचा वापर न करण्यावर, यांचा भर असतो. भक्तांना, त्यांच्या त्यांच्या वाट्याचे, भाग्यातले भोग भोगायला लावावे, हे विधात्याचं मूलतत्व, पाळण्यासाठी पूर्ण तत्पर राहणं, हा यांचा धर्म असतो.
कोणत्याही प्रकारे, साधक व धर्ममार्गी जनांना, या जगता तील, त्यांचे भोग, गत कर्माची फळं, प्राप्त करून, त्यांचा भोग व उपभोग घेऊनच ती शांत करावी, हा मुख्य धडा घालून देण्याकडे, यांचा कटाक्ष असतो. त्याचप्रमाणे, साधकांची, भक्तांची खरी निष्ठा, साधना जोखणं हा खऱ्या सद्गुरुंचा धर्मा व त्यांचं कर्तव्य असतं. कारण ईश्वराच्या सांनिध्यात येण्यासाठी खरी निष्ठा, भक्ती, तळमळ, ओढ लागते आणि ती साधकांकडून घडवून घेणं, ही सद्गुरूंची जबाबदारी असते.
सद्गुरूंच्या महतीबद्दल चिंतन आपण उद्याच्या भागात सुरू ठेवू, पण आपलं हित साधून देणारं नाम घेतच राहून.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment