भोग आणि ईश्वर ५३३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मानव हा ईश्वर निर्मित स्वयंचलित रोबो आहे असं म्हणणं एका अर्थाने योग्यच ठरेल. कारण त्या रोबोप्रमाणे मानवाला सर्व स्वयंचलित व्यवस्था दिलेली आहे. जन्मा पासून ते मृत्यूपर्यंत अविरत व अव्याहतपणे चालणारं हे मानवी देहाचं यंत्र, अनेक बाबतीत स्वनि यंत्रित आणि स्वयंचलित असतं. म्हणूनच ते यंत्र आपला निर्माता असलेल्या इश्वराशी प्रतारणा करो वा ऋण व्यक्त करो वा न करो, पण हे यंत्र व्यवस्थित चालतं.
पण याची गाडी किंवा मोट, कर्माशी अर्थात केलेल्या प्रत्येक कर्माच्या गतीशी बांधून, ईश्वराने या यंत्राला एका सूत्रबद्ध आयुष्यात गुंतवलं आहे. म्हणजे असं की या यंत्राच्या निर्मितीचं हेच गुपित आहे की, जशी आणि जितकी गुंतागुंतीची ही कर्मगती असेल, तितकच गुंता गुंतीचं आयुष्य असेल. यातसुद्धा ईश्वराने काही गोष्टींचा गुंता अश्या प्रकारे गुंफला आहे की, कोणत्या कर्माचं फल कधी मिळेल हे समजण्याची कोणतीही सोय वा सवलत, ईश्वराने ठेवली नाही.
म्हणजे आपण केलेल्या कोणत्या कर्मामुळे, आजचं फलित आपण भोगत वा उपभोगत आहोत, हे कधीच कळणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. म्हणून एखाद्या दुष्ट बुद्धी व्यक्तीला असत्याने, दुष्टपणे वागताना, गतकर्मांमुळे उत्तम दिवस दिसतात, तर त्याचवेळी एखाद्या सज्जन सद्गृहस्थ व्यक्तीला गतकर्मां मुळे हालाखीचे वा दुःखाचे दिवस काढावे लागू शकतात.
हाच एक प्रकारे निर्माण करण्यात आलेला संभ्रम आहे. ज्याला मायेचा पडदा वा आच्छादन म्हणता येईल. या संभ्रमामुळे, बहुतेक जीव, या गुंत्यात अडकून, नेहमी चुकीचा विचार वा मार्ग अवलंबतात. कारण अनेकवेळा लोकं, प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा मोहाच्या मायेच्या मागे लागून, सद्यस्थितीचा विपर्यास करतात. ज्यामुळे, निर्णय, कर्म, विचार व आचार चुकतात. एकदा, एखाद्या गणितात एक पायरी चुकली की, पुढच्या सर्व पायऱ्या आणि उत्तर चुकतं.
पण प्रत्येक परीक्षेला जसे मार्गदर्शक, येऊन, मार्गदर्शन करतात आणि चुकीच्या निर्णयापासून, वाचवतात. तसच आयुष्याच्या गणितात सुद्धा, ईश्वराने, ज्यावेळी गणित घातलं, त्याचवेळी, त्या गणिताचं उत्तर देण्यासाठी, त्याची कठीण, पण महत्वाची बाजू, समजावून सांगण्यासाठी, त्यातील कठीण गोष्टी, गुह्यता हे माहीत व्हावं, यासाठी सद्गुरू रूप साधुसज्जन रूप, संत महंत रूपातील मार्गदर्शन नेमले आहेत. ते वेळोवेळी, मानवाला किंवा मानवी यंत्राला या मार्गाची रहस्यं, खाचाखोचा, कठीण मार्ग आणि या सर्वातून बाहेर पडण्याच्या युक्त्या इत्यादी सांगून, शहाणं करून सोडतात.
या सर्वांचं महत्व, सांगड व संगती कशी लावावी, यावर उद्याच्या भागात विचार करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment